Wednesday, December 2, 2015

शिक्षणाची गाडी चालली.....


जुलैचा महिना, स्थळ: देवगढ, जि. प्रतापगढ, उत्तर प्रदेश
पावसाळ्याचे दिवस असले तरी चटका देणारं ऊन. हवेतली उमसही वाढलेली, परिणामी घामाने अखंड स्नान. पावसाने विश्रांती घेतल्याने शेतीची कामे थंडावलेली. भाताची रोपं लावणीसाठी तयार आहेत, प्रतीक्षा आहे ती दमदार पावसाची. गाडी रस्त्याकडेला थांबते. तिथून गावातले रस्ते (?) संकऱ्या गल्ल्या पार करत आमची टीम एका घरासमोर उभी रहाते. कनकलताबहेन चटकन बाहेर येऊन स्वागत करते आणि मला आत घेऊन जाते. मुख्य घराच्या ओटीवर, एका बाजूला गवताने शाकारलेली छोटीशी खोली. खोलीत वीज नाही, एक खिडकी आहे त्यामुळे थोडासा उजेड. आत गेल्यावर आणखीनच उकडायला लागलं कारण साधारण १०x१५ च्या खोलीत २० महिला, एक शिक्षिका आणि मी. माझ्या येण्याने थोडीशी चुळबुळ सुरु होते. शिकणाऱ्या महिलांचा वयोगट साधारण १८ ते ५. काही महिला कुतुहलाने माझ्याकडे पाहतात. मीही हसून त्यांच्याकडे बघते आणि कनकलताकडे लक्ष वळवते. दोन-चार मिनिटात साऱ्या महिलाही शिकण्यात रमून जातात. 
उजळणीचे पाठ सुरु आहेत. कनकलताबहेन शांतपणे पाठ सुरु करते, ‘द’ की पहचान. ‘द’ दिसतो कसा हे ती कढून दाखवते. छापील कार्डवरील ठसठशीत द चे सगळे वेढेवळसे समजावून सांगते. मग प्रत्येकीला द ने सुरु होणारा एक एक शब्द सांगा, असं म्हणताच खणखणीत आवाजांची मालिका सुरु होते.

‘द’ से दार
‘द’ से दिवाल
‘द’ से दर्द
‘द’ से दम
‘द’ से दोस्ती, इति प्रभावती सरोज. ती पुढे म्हणते, जैसे मेरी और मीरा की है ! 
सहजपणे प्रभावती तिची फाईल माझ्यापुढे धरते. प्राथमिक शाळेत घोटून घेतात तसं अक्षर पण अगदी रेखीव. आपली सखी मीरा विषयी माहितीपर लिहिलेल्या चार पाच ओळी. मी न राहवून त्याचा फोटो काढते. प्रभावतीची कॉलर टाईट. इतरजणी तिच्याकडे कौतुकाने पाहतायत. आतापर्यंत काय काय शिकलो हे बहनजीना सांगा असा कनकलता त्यांना आग्रह करते. सरलाबहन उठून मणी मोजायला लागते, अस्खलित एक से सौ! शर्मिलाबहन पुस्तक काढून एक छोटासा पाठ वाचून दाखवते. सीताबहन, मीराबहन, कुसुमबहन एकेकजणी येऊन आपले नाव फळ्यावर ठळकपणे लिहितात. 
“बहोत बढ़िया!” मी उस्फूर्तपणे उद्गारते आणि विचारते, “पढ़ने के बाद कैसा लगता है?”
“बहुत अच्छा लगता है, दीदी!” सगळ्यांचा एकमुखाने जवाब.
“क्या अच्छा लगता है?” माझा पुन्हा सवाल.
पुन्हा खणखणीत जवाबांची मलिका सुरु होते.
“बस कहाँ जाती है, यह अब पढ़के समझ लेते है दीदी, किसीसे पूछना नहीं पड़ता।”
“साईन कर सकत है।”
“बेटीके स्कूल के नतीजे समझ में आने लगे है।”
“पहले सब अनपढ़ बोलके मज़ाक उड़ाते थे। अब मै बैंक जाती हूँ, पर्ची खुद लिखती हूँ और पैसा भरती/निकलवाती हूँ।“
“वोट डालने के समय हम एक साथ ही चले गए। वहा के बाबूने अंगूठा देने के लिए स्याही दी। लेकीन पेन हाथमे लेके सबने साइन किया। वह बाबू लोग तो देखतेही रह गए दीदी!”
हसरे चेहरे झळकत होते, काय नव्हतं त्यात? अभिमान, कष्टाला आलेलं यश, आत्मसन्मानाची जाणीव.......
या केंद्रात एकूण २५ महिला शिकत आहेत. समाजातल्या सगळ्या थरातल्या, मांडीला मांडी  लावून बसलेल्या.  सरोज समाजाच्या महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. सरोज समाजाचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे डुकरे पाळणे. आज अनेकजणी शेतमजुरी करतात कारण स्वत:ची शेती नाही. कधी केंद्रात उपस्थिती कमी-जास्त होते आहे पण गळतीचं प्रमाण अत्यल्प. 
त्यांना शुभेच्छा देऊन निरोप घेत, आम्ही रास्तीपूरकडे निघतो. इथल्या केंद्रात मुस्लीम महिलांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्याबरोबरीने ब्राह्मण, ठाकूर, कुंभार महिला शिकत आहेत. आता इथे सगळ्याजणी खांद्याला खांदा लावून पढाईसाठी लढतायत. तो रमजानचा महिना होता. रोज़े असल्याने कुणाला अशक्तपणा आलेला, तिला बाकीच्या आधार देताहेत. एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सरस्वतीबहनची मेहरून्निसाबहन बरोबर गंभीर चर्चा सुरु आहे. दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या ईदचा उत्साह वातावरणात जाणवतो आहे.
मागल्या वेळी मी आले होते तेव्हा केंद्राच्या जागेला छप्पर नव्हतं. उन्हापासून बचावासाठी चार भिंतीवर मेणकापड बांधून घातले होते. तरीही उत्साहात खंड नव्हता. आता तर या खोलीवर छप्पर आले आहे. गेल्या वेळी अनुभवला तोच आनंद, तीच आत्मसन्मानाची चेहऱ्यावर झळकणारी भावना. काही १८-२० वर्षाच्या (लग्न झालेल्या) मुलीही आहेत, ज्यांनी कधीच शाळेचं तोंड पाहिलेलं नाही, पण त्यांच्या या स्कूलवर मात्र त्या फार खुश आहेत. काहींच्या मांडीवर लेकरं, काहींची आजूबाजूला खेळत आहेत. ह्या सगळ्यातून पढाई जारी आहे.... उत्साहाने, आनंदाने.
पुढचा टप्पा आहे हुसैनपूर. ज्या गावांमध्ये बाया बचतगट चालवतात वा अन्य काही माध्यमातून एकत्र येत असतात, विकासकामात सहभागी होत असतात तिथे त्यांचा आत्मविश्वास, बोलण्यातली निर्भीडता लक्षात येते. हे थोडं तसं दूरचं गाव, जिथे आतापर्यंत फार कोणी पोचलेलं नाही. रस्त्याजवळच सेंटर आहे, निंबाच्या गार गार सावलीत. इतर सेंटर्सपेक्षा हे जरा उशीराच सुरु झालं. आत जाऊन मी जरा विसावते. बाया मात्र गप्प, काही दडपण असल्यासारख्या. काही चर्चा सुरु होते पण बाया मात्र नीट बोलत नाहीयेत. काही सांगताना अडखळताहेत. हे पाहून त्यांची शिक्षिका सुशीलाबहनही गोंधळली आहे. एकजण अडखळत पुस्तकातला पाठ वाचायला लागते. ‘चूका की कहानी’ (इथे च ‘चं’द्रातला वाचावा.) चूका ही छोट्या गावातली तरुण मुलगी, आई-वडील नाहीत, भावाबरोबर दूरच्या गावी मोलमजुरीसाठी जाते. खूप संकटांचा सामना करते अशी काहीशी ही गोष्ट. माझ्या डोक्यात थोडा थोडा प्रकाश पडतोय. मी त्यांना सांगते आहे, “पुस्तकं बाजूला ठेवा, लिहिता-वाचता येईल का, काही चुकणार तर नाही ना हे सगळे विचार जाऊ दे, इथे काही शाळेची परीक्षा नाही. चूकाचा दर्द तर आपल्याला जाणवतो ना? किती अडचणींचा सामना करत ती पुढे गेली. आपलीही अशीच धडपड चालू आहे ना?” बायांचे चेहरे गंभीर झालेत पण आता भीती-दडपण मावळलेय. एकेक करून त्या सांगताहेत....... 
“सही है दीदी, चूका के दुख तो हमारे दुख है।”
“हम भी कितनी मेहनत करते है दीदी, दिनभर काम तो लगाही रहता है।” 
“हम भी मजदूरी करते है, कड़ी धूप में, खेत में.....”
"हम मे से हर एक की ऐसी कहानी हो सकती है दीदी!!!"
“यह तो हमारी कहानी है...... ” 
आता अवघडलेपण संपलं होतं. बाहेरून कुणीतरी येणार म्हटल्यावर आता आपली परीक्षा असा त्यांचा समज झालेला होता. त्यामुळे सगळ्या घाबरल्या होत्या. आता दिलखुलास गप्पा सुरु झाल्या.
अक्षरं ओळखता येणं, लिहिता येणं हे महत्वाचं खरंच, त्यात या सगळ्या थोड्या पुढे-मागे असतील पण त्या अक्षरांचा अर्थ मात्र त्यांना अचूक कळला होता. त्यांना मनापासून शुभेच्छा देत, पुन्हा यायचं वचन देत मी बाहेर पडते. आता मला घामाची पर्वा नाही, जिवाची तलखी शांत होते आहे. त्यांच्याविषयीच्या आदराने मन भरून आलंय. उन्हाचा तडाखा कमी होऊन आभाळही भरून आलंय. तेवढ्यात आलाच तो, ज्याची सगळे वाट बघत होते. पाऊस बरसायला लागल्यावर सारेच चेहरे फुलले.
“पानी तो आ गया, अब खेती का काम शुरू होजाएगा” माझ्या तोंडून शब्द येतात, म्हटलं तर सहज पण आता केंद्रातल्या उपस्थितीविषयी वाटणारी काळजी त्यात डोकावते. ते जाणवून त्यांच्यातल्या एकदोघी पुढे येऊन मला दिलासा देतात, “ रोपाई के समय में कम-ज्यादा तो होगा दीदी, लेकीन हम खूब मन लगाके पढेंगे।” आणि पावसाकडे बघत पुढे म्हणतात, “जीवन तो आगे बढ़ना चाहिए ना?”
आणि त्या ‘जीवना’चे तुषार अंगावर घेत, आम्ही हसत हसत पुढे निघतो.


 

टीप: सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने हा महिला साक्षरता प्रकल्प उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ जिल्ह्यात राबवला जात आहे. बाएफच्या कार्यक्षेत्रात अशा ४० केंद्रात एकूण १००४ महिला शिकत आहेत. यापैकी ६२५ महिलांनी प्राथमिक अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आता त्या पुढच्या अभ्यासक्रमाची तयारी करत आहेत.    

4 comments:

  1. वा प्रीती मस्तच वाटलं वाचून. अशा संदर्भात अक्षरे ही निव्वळ अक्षरे राहत नाहीत तर जणू प्रगतीची, नव्या-अनोख्या जगाकडे जाण्याच्या वाटेची शिडीच बनतात

    ReplyDelete
  2. फोटोही सुंदर आहेत. आणि बायफ शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे हे वाचूनही आनंद झाला.

    ReplyDelete