हॉगवर्टझ शाळेत जाण्यासाठी किंग्स क्रॉस स्टेशनवरची लगबग, नवीन विद्यार्थ्यांची पावणेदहा नंबरचा प्लॅटफॉर्म शोधण्यासाठीची गडबड, त्या प्लॅटफॉर्मवर पोचल्यावर टाकलेले सुटकेचे नि:श्वास, कोणाचे अवजड समान, कुणाचं घुबड, कुणाचा बेडूक, कोणाचा उंदीर तर कुणाचा बोका. आईबाबांच्या असंख्य सूचना अर्थातच हॅरी सोडून. हॉगवर्टझच्या जादुई दुनियेकडे जायला सुरुवात होते ती प्लॅटफॉर्म नं. पावणेदहापासून. केशरी रंगाची, झुकझुक गाडीसारखी धुराचे शुभ्र ढग सोडणारी हॉगवर्टझ एक्सप्रेस. सगळा माहोल उत्साह, उत्कंठा नि थोड्या भीतीचाही.
सर्वसामान्य घरातल्या लहान मुलांसाठी आगगाडी म्हणजे भावविश्वाचा एक विशेष हिस्सा असतो. हेच नेमकं हेरून जे. के. रोलिंगने ही सुंदर कल्पना केली असणार. आपल्याकडेही मामाच्या गावाला जाणारी झुकझुक गाडी तर गाण्याच्या रुपात अमर झाली आहे, आता ती तशी नसली तरी.
सर्वसामान्यांसाठी आगगाडी हे प्रवासाचं साधन. स्टेशन आणि त्यावरचे प्लॅटफॉर्म म्हणजे आपल्याला हवी ती गाडी पकडण्याची जागा. आगगाडीचा प्रवास एकवेळ आपण एन्जॉय करतो, मात्र प्लॅटफॉर्म कधी एकदा सोडतोय असं आपल्याला होतं. गाडीत डबे झाडून पैसे मागणारी मुलं अनेकांना अस्वस्थ करतात. नाईलाज म्हणून काहीजण दुर्लक्ष करतात, काहीजण पैसे काढून देतात तर काहीजण त्यांना हाकलून देतात.
अनेक कारणांमुळे घर सोडून बाहेर पडलेली ही मुलं प्लॅटफॉर्मचा आधार शोधतात आणि स्टेशनच्या चक्रव्यूहात अडकतात. कधीच इष्टस्थळी पोचू न शकणाऱ्या या मुलांचं आयुष्य तिथेच गोलगोल फिरत रहातं. हे वास्तव चपखलपणे दर्शवणारं अमिता नायडूचं 'प्लॅटफॉर्म नं. झीरो' हे पुस्तक. काही कारणामुळे निराधार झाल्याने स्टेशनचा आसरा घेणारी मुलं, पांढरपेशा समाजाकडून – पोलिसांकडून होणारा छळ, त्यातूनही जगण्याची धडपड पण बहुतेकदा उपेक्षेच्या अंधारात हरवून जाणारं त्यांचं आयुष्य. प्लॅटफॉर्मवरचं त्यांचं वास्तव्य आणि वास्तव सांगणाऱ्या, विलक्षण अस्वस्थ करून सोडणाऱ्या काही मुलांच्या कहाण्या या पुस्तकात आहेत. त्यांच्यातली दुष्मनी, नवीन मुलांना सांभाळून घ्यायची वृत्ती, पाच-सात वर्षाच्या मुलांना मोठ्या मुलांनी दिलेली माया, त्यांचे कष्ट, पौगंडावस्थेत निर्माण होणारे प्रश्न, समाजाने केलेला त्यांचा वापर.... त्यांच्या उपेक्षित जिण्याच्या या साऱ्या पैलूंवर हे पुस्तक प्रकाश टाकतं. प्लॅटफॉर्मवरच्या मुलांचं काही बरं करायची कळकळ आणि त्यातून काही काळ केलेल्या कामाच्या अनुभवातून हे पुस्तक उभं राहिलं आहे, हे विशेष. ते मुळातून वाचायला हवं.
मन विषण्ण होतं ते या मुलांची यातून सुटकाच नाही की काय, ह्या निराश भीतीने. जगण्याच्या चटक्यांमधून ही मुलं करकरीत वास्तवाचा, त्यापासून कसं सुटता येईल याचा विचार करतात. प्लॅटफॉर्म नं. पावणेदहाबद्दल त्यांना विचारलं तर ती काय म्हणतील? "क्या येडा बनते क्या, ऐसा नंबर कैसे होंगा?" किंवा असंच काही.
पण प्लॅटफॉर्म नं. पावणेदहा आहे की नाही, हा प्रश्नच मुळी गौण आहे. खरा प्रश्न आहे प्लॅटफॉर्म नं. पावणेदहाच्या दुनियेत रंगू शकणारं बालपण ह्या व्यवस्थेत त्यांना मिळेल का?