Tuesday, July 5, 2011

टेन्शन (फ्री)

सातवीची वार्षिक परीक्षा झाली. सुट्टीत छान आराम झाला आणि फिरणंही. आठवीत आता अभ्यासाचे विषय वाढले आहेत आणि इतरही काही गोष्टी. म्हणजे 'ते' काहीतरी होतं ना मुलींना या वयात. वर्गात काही मुलींची तर इतकी खुसपूस चालते ना? काही मुली म्हणजे ‘तशा’... स्वत:ला खूप मोठं झाल्यासारखं समजतात. अधून मधून पी. टी. च्या तासाला त्यातली एखादी तरी ‘ते’ कारण सांगून आराम करणारच. त्यांच्या गप्पा तर काय, काही तरी चावट बोलत असतात. एकदा सहज कानावर पडलं की आमच्या वर्गातल्या सुविला एका मुलाने friendship मागितली आहे. अशी friendship मागतात हे मला नवीनच होतं. मला वाटायचं ज्यांच्याशी आपलं पटतं, त्यांच्याबरोबर हळूहळू आपली मैत्री होत जाते, दिप्या, राणी, संगी आणि कितीतरी जणांशी माझी मैत्री आहे तशी. पण काहीजणींकडून कळलं ही friendship वेगळी. Friendship, प्रेम, लग्न असं ते असतं. त्यांना याबाबत असलेल्या माहितीबद्दल मला आदरच वाटला. कोण कुठल्या गोष्टींचा अभ्यास करेल सांगता येत नाही.  
मलाही आपल्याला ‘तसं’ होण्याची भीती वाटत होती. पण नंतर आई आणि आमच्या डॉक्टरबाईंनी समजावून सांगितलं. सगळं कळलं नाही पण भीती कमी झाली. आता प्रत्यक्ष होईल तेव्हा बघायचं. कधीकधी टेन्शन येतं, काळजी घेता येईल ना. त्यात मनात कायकाय वेगळंच येत असतं. मधूनच घाबरायला होतं. एकदा TV वर एक सिनेमा पाहत होते तर ते हिरोहिरोईन एकमेकांच्या इतके जवळ आले की माझ्याच छातीत धडधडायला  लागलं. या सगळ्या सिनेमात प्रेम हाच विषय कसा असतो? हा प्रश्न पडला तरी ते आपल्याला पाहायला आवडतं, ते का?
मला शाळा आवडते पण शाळेत यायला जायला नाही आवडत, म्हणजे तो रस्ता नाही आवडत. शाळेजवळच्या चौकात कायम मवाली पोरं उभी असतात आणि मुलींची टवाळी करत असतात. ते काय बोलतात त्या सगळ्याचा अर्थ कळत नाही पण काहीतरी घाणेरडं बोलतात. अस्सा राग येतो ना, पण भीतीही वाटते, कसली? जाऊदे किती त्रास होतो डोक्याला, हे विचार करून? तेवढ्यात शेजारची निमावहिनी आली. डोळे लाल झालेले, तिला सासुरवास आहे म्हणे. हे आणखी एक टेन्शन. बाईला असा त्रास का होतो, आणि तो सहन का करायचा? पेपरमध्ये हुंडाबळीच्या बातम्या येतात. कुठेतरी अशी काही वाईट लोकं असतात असं मला वाटायचं पण आमच्या शेजारच्या वाड्यातही असं घडलं. 
त्यानंतर लगेचच पुण्यात अशी एक घटना घडली, सुनेला मारून टाकण्याची आणि त्यावर पेपरमध्ये खूप लिहून आलं. महिला संघटना की काय असतात त्यांनी आवाज उठवला. त्या दिवशी शाळेतून येताना लक्ष्मी रोडवरून खूप मोठा मोर्चा चालला होता आणि आश्चर्य म्हणजे घोषणा, आवाज काही नव्हतं. त्यातल्या बायांनी स्वत:ची तोंडं बांधली होती. मूक मोर्चा, निषेधाचा. शांतताच होती सगळी, ती बघ्यांमध्ये पण पसरली होती. नेहमीच्या गडबड गोंगाटाच्या रस्त्यावरच्या त्या शांततेची मला भीतीच वाटली एकदम. अंगावर सरसरून काटा आला. शेजारच्या वाड्यातली घटना आठवली, निमावहिनी आठवली. बापरे म्हणजे असं कुठेही होऊ शकतं. छातीत धडधडत होतं तरी मोर्चा पाहताना बरंही वाटत होतं, का बरं वाटतंय ते नीट कळत नव्हतं.    
चौकातली ती मवाली पोरं, मोर्चा निघून गेला तरी गप्प उभी होती. तिथे जवळच बसणारी भाजीवाली एकदम उठली आणि कडाकडा त्या पोरांना बोलू लागली. ‘तुमच्या डोक्यात काही प्रकाश पडतोय का, दिवसभर उभं राहून पोरीबाळींची छेड काढता, सुधारा पोरांनो. उद्यापासून इथे आलात तर बघा, त्या मोर्चा काढणाऱ्या संस्थेतच तक्रार करते, पोलीसातच देते तुम्हाला’, अशा अर्थाचं काहीतरी ती त्यांना बोलत होती. आजूबाजूची माणसंही तिला दुजोरा देत होती. त्या पोरांनी तिथून काढता पाय घेतला.
त्यानंतर शाळेत जाता येता ती पोरं फारशी दिसायची नाहीत, असली तरी पानटपरीजवळ गप्प उभी राहायची. हळूहळू आम्हालाही तो त्रास थांबल्याची खात्री झाली. त्या दिवशी मोर्चा पाहताना नेमकं काय बरं वाटलं ते मला आता समजलं होतं, मोर्चा पाहून भाजीवालीला धाडस आलं आणि त्यामुळे मुलींची होणारी टवाळी थांबली. आम्ही मजेत शाळेत जातयेत होतो, त्या रस्त्यावरून जायचं टेन्शन आता उरलं नव्हतं.    

5 comments:

  1. Comment received from Rajashree through email;

    "Khup Chan . Photo tar excellent !!! Keep it up and keep sending us the link."

    ReplyDelete
  2. Comment received from Sonali Madikunt through email;
    खूपच छान! प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अनुभव अगदी सोप्या भाषेत. सही!......keep going.......BEST LUCK !

    ReplyDelete
  3. Thank you Mayura, Rajshree, Shantanu and Sonal. Keep giving the comments.

    ReplyDelete