Wednesday, October 26, 2011

हत्ती आणि गेंडा




कामानिमित्ताने मी नुकतीच नैरोबीला (केनिया) जाऊन आले. दोन दिवसांची कार्यशाळा आटपल्यावर हातात अर्धा दिवस मोकळा होता. एव्हाना अन्य सहभागींशी छान मैत्री झाली होती आणि अर्थातच दक्षिण आशियातून आलेल्यांशी अधिक मित्रत्वाचं नातं निर्माण झालं. मग आम्ही एकूण आठ जणांनी मिळून तो वेळ सत्कारणी लावायचं ठरवलं. चौकशी करून मसाई मार्केट, elephant center आणि Jiraff center असा कार्यक्रम ठरला.

David Scheldrick elephant center ला पोचायला ४५ मिनिटे लागली. त्याची वेळ ११ ते १२ अशी असते. ११ च्या थोडं आधी पोचलो नि भराभर रांग गाठली. प्रवेश मिळाला आणि आतमध्ये गेलो. चारी बाजूंनी तार लावलेला मोठा चौकोन. जाऊन जरा थांबतोय तो लांबून हत्तीची सहा-सात पिले (अक्षरश:) दुडूदुडू धावत येताना दिसली आणि सगळ्यांच्या तोंडून आनंद-आश्चर्य-कौतुकमिश्रित सीत्कार बाहेर पडले. हत्तीची पिल्ले धावत आली आणि त्यांच्यासाठी बाटल्यातून ठेवलेलं दूध त्यांनी गटागटा पिऊन टाकलं. मग ती बागडू लागली. त्यांच्या काळजीवाहकांबरोबर ती मजेत होती. सोंडेने त्यांना सारखे स्पर्श करणे, हळूच ढुशी मारणे, अंग घासणे, मागे मागे जाणे असे प्रकार चालू होते. प्रत्येकाचा काळजीवाहक म्हणजे त्याची आईच. एका पिल्लाला प्रेक्षकांच्या जवळून फिरवले. ते बेटे कुरवाळून घेत होते, लाडिकपणे सोंड गळ्यात टाकत होते. त्या १० महिन्याच्या, सर्वात छोटया पिलाच्या मी प्रेमातच पडले, त्याला कुरवाळलं, थोपटलं, त्याचं अंग खाजवलं. तेही मजेत सारं करून घेत होतं. मधेच आपली सोंड माझ्या हातात देत होतं. इतर पिल्लांचा पाणी उडवणे, वेगवेगळे आवाज काढणे असा कार्यक्रम जोरातच चालू होता, त्याला मात्र माणसाची पिल्ले घाबरून रडत होती. 



मग एक कर्मचारी  David Scheldrick Wildlife Trust ची माहिती सांगू लागला. David Scheldrick हा निसर्गवेत्ता, केनियातील प्राणी जीवनासाठी ते आयुष्यभर कार्यरत होते. (अधिक माहितीसाठी http://www.sheldrickwildlifetrust.org इथे भेट द्या.) हा ट्रस्ट हत्ती आणि गेंडा या धोक्यात आलेल्या प्राण्यांसाठी काम करतो. हस्तीदन्तासाठी हत्तींची चोरटी शिकार सुरूच आहे. यामुळे छोटी पिल्ले अनाथ होतात आणि वेळीच त्यांची काळजी घेतली गेली नाही तर मृत्युमुखी पडतात. अशा प्रसंगातून त्यांना सोडवायचं आणि वाढवायचं काम ही संस्था करते. दोन वर्षापर्यंत ही पिल्लं पूर्ण सुरक्षित वातावरणात असतात. मग त्यानंतर त्यांच्यासाठी योग्य कळपाचा शोध चालू होतो. हे अत्यंत चिकाटीचं काम. नवीन हत्तीला स्वीकारण्याची प्रक्रिया पाच वर्षापर्यंतही चालू शकते. अशी सगळी माहिती देताना त्याने भावनिक आवाहन केलं ते हस्तीदंती वस्तू न वापरण्याचं, कारण अशा वस्तूंची मागणी पूर्णत: बंद झाल्याशिवाय हत्तींची शिकार थांबणार नाही.

हत्तींची पिल्लं मजेत खेळत होती. ती फार मोठया भावनिक कदाचित शारीरिक आंदोलनातून गेली होती. आता प्रेमळ हातात ती सावरली होती. हे सगळं कुठेतरी आत खोल खोल पोचलं आणि डोळे खळखळून वाहायला लागले, आनंद, दु:ख, आदर, दिलासा, आशा या साऱ्याचं मिश्रण होतं त्या प्रतिक्रियेत. माझा हात हळुवारपणे दाबला गेला, तो समजूतदारपणा मला स्पर्शातूनही जाणवला. बाजूला पाहिलं तर एक उंच, सणसणीत काळी तरुणी उभी होती. तिच्याही डोळ्यात पाणी होतं. सहभावाने आम्ही दोघी गलबललो, त्या पिल्लांना डोळे भरून पाहत राहिलो. नंतर ‘अग्नेस’ शी औपचारिक ओळख झाली (आणि कदाचित आम्ही इमेल वर संपर्कात राहू.) 

तिथून बाहेर आल्यावर एक गेंडा दिसला. त्याच्या शिंगासाठी झालेल्या चोरट्या शिकाऱ्याच्या हल्ल्यात त्याला आपले डोळे गमवावे लागले. त्याचा सांभाळ इथे केला जात आहे. माणसांचा लोभ, स्वार्थ पाहून दु:ख झालं, निराशा आली. पण माणसांचेच असे विलक्षण प्रयत्न पाहून मी ती निराशा निववीत राहिले. 

              

Monday, September 12, 2011

गोळी (२)



इंदिरा गांधींना गोळ्या मारल्या. तशा गोळ्यांनी धडकी भरली तरी या गोळ्यांचा आपला संबंध येण्याचे कारणच काय, हा दिलासा वाटायचा. बहुतेक वेळा गोळ्या म्हणजे खायच्या किंवा औषधाच्या गोळ्या. डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी ताप यावरच्या गोळ्या माहीत होत होत्या. औषधाच्या या गोळ्यांमध्ये काही गोळ्या मजेशीरच वाटायच्या. जुलाब थांबवायची जशी गोळी असते तशी जुलाब होण्यासाठी पण असते हे कळल्यावर हसून पोट दुखायला लागलं. अनेक दुकानांवर म्हणजे औषधाच्या, Pergolax ची जाहिरात रंगवलेली असायची. त्यावर अनेक विनोदही प्रसिद्ध होते म्हणजे आमच्याआमच्यात.
झोपेच्या गोळ्या, हिंदी सिनेमामुळे आणि रहस्यकथांमुळे कळल्या. पहिल्यांदा ऐकलं तेव्हा वाटलं, काय मस्त झोप लागत असेल ना या गोळीनी. कुठल्यातरी सिनेमात त्याला गोळ्या खायला देऊन त्याचा काटा काढून टाका असे काहीतरी डायलॉग होते. म्हणजे ही गोळी पायात काटा गेला तरी उपयोगी असते असं वाटलं. असं मी बोलून दाखवल्यावर जो काय हसण्याचा स्फोट झालाय की बास. मग कळलं की जास्त गोळ्या घेतल्या तर जीवही जाऊ शकतो. बाप रे! म्हणजे फक्त बंदुकीची गोळीच डेंजरस नसते तर अशी गोळी पण असते. आणि एखाद्याचा काटा काढणे म्हणजे त्याला मारून टाकणे? मला आपलं वाटत होतं, पायात गेलेला काटा.
फुटाच्या गोळीबद्दल प्रथम ऐकलं ते एका सिनेमाच्या गाण्यात, ‘कजाग बायको झालीस तर मी देईन फुटाची गोळी’ असे काहीतरी शब्द होते. मग फुटाची गोळी म्हणजे एखाद्याला फुटवणे अशी ज्ञानात भर पडली. म्हणजे बायको कजाग असेल तर नवरा तिला ‘फुट’ म्हणतो? आणि नवरा कजाग असला तर? पण पुरुष कुठे कजाग असतात? म्हणजे तसं कोणी म्हणत नाही. मग ते नक्की कसे असतात?  
यथावकाश महिन्याचे ‘चार दिवस कटकटीचे’ चालू झाले. हळूहळू ‘त्या’ बाबतीतलं विशेष ज्ञानही प्राप्त व्हायला लागलं. इतर वेळेला या दिवसात बाजूला बसणे हा प्रकार नव्हता पण गणपती किंवा काही पूजा असली तर मात्र..... शी! मग सगळ्या जगाला कळणार आणि वर मोठी माणसं काहीतरी म्हणणार; तांब्या उपडा घातलाय नाहीतर कावळा शिवलाय. बारक्या पोरंपोरींना तर काहीच कळायचं नाही, मग ती बावळटसारखी काहीतरी विचारत बसायची, सगळ्यांना कावळा शिवतो का? मला शिवेल का? मग शिवला तर काय होतं? एक ना अनेक. 
आजूबाजूला कुठेच अशा पूजा वगैरे प्रसंगी घरच्या बाईची अडचण आली असं दिसत नव्हतं. मग एक दिवस आईचा पिच्छाच पुरवल्यावर कळलं, हे पुढे ढकलायच्याही गोळ्या असतात. ऐकावं ते नवलच. पुढे कधीतरी कळलं, मूल होऊ नये म्हणूनही गोळ्या असतात. वर्गात काही मुलींची खुसफुस चालायचीच. त्यांच्यामुळेच खरं तर मला टी.व्ही. वरच्या ‘त्या’ जाहिराती, म्हणजे माला डी आणि निरोधच्या, कळायला लागल्या.
एकदा शेजारच्या आजी औषध घेत होत्या. मी कुतूहलाने त्यांना गोळ्यांबद्दल विचारत होते. त्या बोलता बोलता म्हणाल्या, अगं आता याच खऱ्या माझ्या मैत्रिणी. आता मरेपर्यंत, खरंतर मरण लांबावं म्हणून तर ह्यांची साथ.................!!   

Friday, August 19, 2011

गोळी (१)

समोरच्या वाण्याच्या दुकानात मस्त गोळ्या मिळतात, दुधाच्या गोळ्या म्हणतो आम्ही त्यांना. १० पैशाला १०. चघळायला मस्त वाटतं. शाळेतही खाऊ विकायला एक बाई येतात, त्यांच्याकडे पाच पैशाला एक अशी मस्त लिमलेटची गोळी मिळते. ही गोळी म्हणजे सहल किंवा स्पोर्ट स्पेशल, शाळाच वाटणार आम्हाला. माझे मामाआजोबा घरी येतात तेव्हा नेहमी आम्हाला रावळगाव टॉफी आणतात. पाणी सुटतं नुसतं तोंडाला.
शाळेच्या स्टोअर मधल्या पेपरमिंटवर तर आमचा कायम डोळा. स्टोअरअधून काही घ्यायचं असेल तर सुटे पैसे न्यायचे नाहीत. म्हणजे ८ रु. ५० पै. झाले तर आम्ही १० रु. च देणार. बहुतेकदा तिथे सुटे पैसे नसतातच त्यामुळे मग उरलेल्या दीड रुपयाच्या बदल्यात काय घ्यायचे याचे पूर्ण स्वांतत्र्य आम्हाला. त्या स्वातंत्र्यात पेपरमिंटचा नंबर वरती. वर्गातही तासाला जिभेखाली गोळी ठेवून बसलं तरी कोणाला कळत नाही. पण गोळी तोंडात टाकेपर्यंत फार काळजी घ्यावी लागते हं. नाहीतर चोंबड्या कोंबड्या काय कमी नाहीत वर्गात. एखादीने पाहिलंच, तर तिला एकतरी गोळी द्यायलाच लागते. काय करणार, गोळी तोंडात पडल्यावरच तोंड बंद राहतं ना. खूप काळजी घेऊनही त्या स्वातंत्र्याचे तुकडे असे काही वेळा वाटावे लागतात. पण हे सगळ्याच पोरी करतात त्यामुळे कधी ना कधी फिटंमफाट होतेच. तेवढंच दु:खात सुख.   
ह्या गोळ्या खूप आवडत्या तर काही गोळ्या खूप नावडत्या, बरोब्बर औषधाच्या. एकदा मला ताप आला होता. तर डॉक्टरबाईंनी गोळ्या आणि बाटलीतलं लाल औषध दिलं. तोपर्यंत औषधाची गोळी औषधालाही खाल्ली नसल्याने, ती चवीला वेगळी असते हे मला माहीतच नव्हतं. औषध म्हणून गोळी मिळाल्याने मी खुश! त्यातून त्या गोळीचा रंग इतका भारी होता ना की कधी खातेय असं झालं होतं. जेवण झाल्यावर बाबा म्हणाले आधी गोळी घे मग लाल औषध. पण मला वाटत होतं की गोळी चघळून खायची आहे, म्हणून मी हट्टाने आधी लाल औषध घेतलं. त्याची चव तर एकदम बेस्ट होती. गोळी गिळून टाक, चावू नको असं बाबा सांगत होते तरी तरी मी चाखून पहिलीच आणि मग काय थू थू च व्हायला लागलं. इतकी छान दिसणारी गोळी, इतकी कडू? शी याक! तरी ती गिळायलाच  लागली नि वर बाबांची बोलणीही. ही गोळी आजार बरा करायला चांगली असली तरी चवीला छान नसते हे मात्र कळलं.
आणखी एका गोळीबद्दल समजलं तेव्हा मला इतका आनंद झाला होता. एकदा रविवारी आळशीपणे उशिरा उठले. उठावंसं वाटतच नव्हतं. आई म्हणालीथोडी कसकस आहे, आंघोळ नको करू आज. मला काय बरंच. थोड्या वेळाने मामा आला, आमची लोळणफुगडी चालूच होती. कसकस वगैरे ऐकल्यावर तो म्हणालामग आज आंघोळीची गोळी तर!
आंघोळीची गोळी? अशी गोळी असते? ती घेता येते? ती घेऊन आंघोळ नाही केली तर चालतं? किती मज्जा! आईला भरपूर अशा गोळ्या आणून ठेवायला सांगितल्या पाहिजेत, माझ्या डोक्यात चक्र सुरु झालं.
दुसऱ्या दिवशी सकाळी आईला म्हणलंआज आंघोळीची गोळी. ती हसून बरं म्हणाली. मी वाट पाहत होते, ती कधी गोळी देतेय. पण ती काय देईना, तिच्या कामातच होती. माझी भुणभुण  सुरु, मला आंघोळीची गोळी दे, काल मामा म्हणत होता वगैरे. मग काय, सगळ्यांना हसायला आयतंच कारण मिळालं. मला कळेना, काय प्रकार आहे. मग बाबांनी सांगितलं की असं नुसतं म्हणतात, अंघोळ करायची नसेल तर. शी! कसली ही मोठ्या माणसांची भाषा. आम्हाला कळेल असं बोलतील तर शपथ, परत चेष्टा करायला कायम पुढे. वर अशी गोळी नसते हे ऐकून मला दु:ख्ख झालं ते वेगळंच.  
त्यानंतर काही दिवसांनंतर घडलेली घटना, छातीत धडकीच भरवणारी. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना, इंदिरा गांधींना गोळ्या मारल्या. बाप रे! ही गोळी भलतीच वेगळी होती. जीव घेणारी गोळी. खूप भीती वाटली आणि सगळ्या गोळ्या छान नसतात हे अगदी नीटच कळलं.
         

Sunday, July 31, 2011

RSP


आठवीत आल्यावर आमच्या वर्गाला RSP आहे हे कळलं. आधी ते काय असतं माहीतच नव्हतं. दादा मागे एकदा म्हणाला होता RSP म्हणजे रेल्वे संडास पोलीस. म्हणजे पोलिसांचा गणवेश करून रेल्वेचे संडास साफ करायचे. पण संडास साफ करायला पोलिसाचा ड्रेस कशाला ते मला कळत नव्हतं, मग मी त्याला हजार प्रश्न विचारले. तो वैतागला असणार, पण थोडक्यात मला कळलं ते असं, रेल्वेतून खूप माणसं तिकीट न काढता प्रवास करतात आणि TC आल्यावर संडासात लपतात. त्यांना पकडायचं काम RSP चं. मला कितीतरी दिवस हे खरंच वाटत होतं. पण हळूहळू RSP म्हणजे काय ते कळलं. आठवीची शाळा सुरु झाल्यावर आम्हाला RSPचा युनिफॉर्म आणायला सांगितला. हे आम्ही घरी जाऊन सांगितल्यावर दादाला त्या चेष्टेची आठवण झालीच आणि त्याचं चिडवणं संपेचना. मी गळा काढायच्या बेतातच होते तोच त्याच्या मित्राने हाक मारल्याने तो निघून गेला. 
मग तो युनिफॉर्म म्हणजे शिट्टी, टोपी आणि shoulders आणले. मग एक दिवस एक पोलीससाहेब शाळेत अवतरले. त्यांनी RSP म्हणजे रोड सेफ्टी पेट्रोलबद्दल बरीच माहिती सांगितली. त्यातला रस्त्यावरची सुरक्षा हा भाग कळला पण पेट्रोल ही काय भानगड आहे ते कळत नव्हतं आणि त्या साहेबांचा आवाज किंवा जीभ जड असल्याने काही शब्द कळतच नव्हते. त्यातून मागल्या बाकावरच्या मुली इतक्या खुसफुसत होत्या की बास.
पुढल्या आठवड्यापासून एक हवालदार यायला लागले, ते एकदम खणखणीत बोलायचे. त्यांच्याकडून ते पेट्रोल नसून patrol म्हणजे सुरक्षित वाहतुकीसाठी केलेली फेरी असं काहीतरी असल्याचं कळलं. ग्राउंडवर ते आमच्याकडून काही व्यायाम प्रकार करून घ्यायचे, एक........दोन........तीन......चार वाले. त्यांची एक सवय म्हणजे ते सतत बोलायचे. व्यायाम प्रकार करताना ते "एक.......दोन......तीन...." चालू करणार आणि मधेच बोलायला लागणार. मग त्यांनी ४ म्हणलं का? हात खाली घ्यायचे का? अशी आमची चुळबुळ सुरु व्हायची. त्यात काही हात वर, काही खाली; काही खाली की वरच्या दुग्ध्यात खांद्यावर असं चालू असायचं. एकदा असंच आमचे हात वर असताना त्यांचा लांबच्या लांब पट्टा सुरु झाला म्हणजे तोंडाचा. सहज वर आभाळात लक्ष गेलं तर एक निळाशार पतंग उडताना दिसला, इतकं मस्त वाटत होतं बघायला. मी इतकी दंग झाले की पतंगाशीच पोचले म्हणजे मनाने. जागी झाले, म्हणजे संस्कृतच्या बाईंच्या शब्दात 'मर्त्यलोकात' आले तेव्हा पट्ट्यातून जोरात आवाज येत होताचार चार चार. दचकून मी हात खाली घेतले. म्हटलं आता आहे आपली, पण ते काय बोलले नाहीत. बाकीच्यांना काय, दात काढायला संधीच.   
दुसऱ्या सहामाहीत आम्हाला शाळेबाहेरच्या चौकात traffic control साठी न्यायला लागले. रहदारीला शिस्त लावणे आणि आधी ती आपल्या अंगी बाणवणे असा दोन कलमी की काय तो कार्यक्रम होता. सुरुवातीला सगळी रहदारी म्हणजे माणसं आमच्याकडे वळून वळून बघायची. लोकांना शिस्त लावण्याचं काम जोरातच सुरू होतं. “हीच शिस्त तुमच्याही अंगी कायम राहायला हवी, असेच देशाचे आदर्श नागरिक बनतात” असं आम्हाला आमचे हवालदार सांगत असायचे.
शाळेतल्या मुली हे काम करतायत म्हटल्यावर लोक ऐकायचे. कोणी रहदारीचा नियम तोडला की शिट्ट्या वाजल्याच. शिट्टी वाजवायला जाम मजा यायची, त्यामुळे त्याबाबतीत आमचा उत्साह दांडगा होता. कधी कधी एखाद्या बाजूच्या पाचसहा शिट्ट्या एकदम जोरदार वाजायच्या.  माणसं दचकून इकडे तिकडे व्हायची, कुणीकुणी आहे तिथेच थांबायची. दोनतीन छोटी मुलं घाबरून रडलीही होती एकदा. शिट्ट्यांनी गोंधळ वाढतोच आहे हे पाहून मग आमच्या शिट्टी वाजवण्यावर गदा आली. मग त्यातली मजाही कमी झाली.
शाळेच्या जवळच एक काका होते. ते आसपास फिरून चिवडा विकायचे. त्यांना आमचं फार कौतुक वाटायचं. दर शनिवारी ते आम्हाला चिवडा खायला द्यायचे, पैसे न घेताच आणि मग चिवडा विकताना जोरदार म्हणायचे, “चिवडा खाऊन पोरी हुश्शार.”
वार्षिक परीक्षा जवळ आली होती. RSPचं एक दोन दिवसांचंच काम बाकी होतं. एका संध्याकाळी मी शाळेकडे गेले होते, तिथल्या दुकानातून वह्यापेन वगैरे घ्यायला. शाळेपुढच्या चौकात गर्दी जमली होती, अपघात झाल्यामुळे. त्या दृश्याने मला घेरीच यायला लागली. त्या माणसावर  पांढरा कपडा टाकला होता. तरी डोक्यापासून रक्ताचा मोठा ओघळ वाहिलेला दिसत होता. त्या माणसाच्या चपला कुठेतरी पाहिल्यासारख्या वाटत होत्या. मला खूपच भीती वाटायला लागली. तेवढयात लोकांच्या बोलण्यावरून कळलंच, ते चिवडेवाले काका होते. काकांना टेम्पोची जोरदार धडक बसून ते जागीच ठार झाले होते. माझे हातपायच लटपटायला लागले. कशीबशी घरी पोचले ती आजाऱ्यासारखीच. नंतर दोनतीन दिवस शाळेत जाऊ नाही शकले. trafficचं कामही तोवर संपलं होतं. पण RSP चा अर्थ आणि त्याची गरज मला नीटच समजली होती.       

Tuesday, July 5, 2011

टेन्शन (फ्री)

सातवीची वार्षिक परीक्षा झाली. सुट्टीत छान आराम झाला आणि फिरणंही. आठवीत आता अभ्यासाचे विषय वाढले आहेत आणि इतरही काही गोष्टी. म्हणजे 'ते' काहीतरी होतं ना मुलींना या वयात. वर्गात काही मुलींची तर इतकी खुसपूस चालते ना? काही मुली म्हणजे ‘तशा’... स्वत:ला खूप मोठं झाल्यासारखं समजतात. अधून मधून पी. टी. च्या तासाला त्यातली एखादी तरी ‘ते’ कारण सांगून आराम करणारच. त्यांच्या गप्पा तर काय, काही तरी चावट बोलत असतात. एकदा सहज कानावर पडलं की आमच्या वर्गातल्या सुविला एका मुलाने friendship मागितली आहे. अशी friendship मागतात हे मला नवीनच होतं. मला वाटायचं ज्यांच्याशी आपलं पटतं, त्यांच्याबरोबर हळूहळू आपली मैत्री होत जाते, दिप्या, राणी, संगी आणि कितीतरी जणांशी माझी मैत्री आहे तशी. पण काहीजणींकडून कळलं ही friendship वेगळी. Friendship, प्रेम, लग्न असं ते असतं. त्यांना याबाबत असलेल्या माहितीबद्दल मला आदरच वाटला. कोण कुठल्या गोष्टींचा अभ्यास करेल सांगता येत नाही.  
मलाही आपल्याला ‘तसं’ होण्याची भीती वाटत होती. पण नंतर आई आणि आमच्या डॉक्टरबाईंनी समजावून सांगितलं. सगळं कळलं नाही पण भीती कमी झाली. आता प्रत्यक्ष होईल तेव्हा बघायचं. कधीकधी टेन्शन येतं, काळजी घेता येईल ना. त्यात मनात कायकाय वेगळंच येत असतं. मधूनच घाबरायला होतं. एकदा TV वर एक सिनेमा पाहत होते तर ते हिरोहिरोईन एकमेकांच्या इतके जवळ आले की माझ्याच छातीत धडधडायला  लागलं. या सगळ्या सिनेमात प्रेम हाच विषय कसा असतो? हा प्रश्न पडला तरी ते आपल्याला पाहायला आवडतं, ते का?
मला शाळा आवडते पण शाळेत यायला जायला नाही आवडत, म्हणजे तो रस्ता नाही आवडत. शाळेजवळच्या चौकात कायम मवाली पोरं उभी असतात आणि मुलींची टवाळी करत असतात. ते काय बोलतात त्या सगळ्याचा अर्थ कळत नाही पण काहीतरी घाणेरडं बोलतात. अस्सा राग येतो ना, पण भीतीही वाटते, कसली? जाऊदे किती त्रास होतो डोक्याला, हे विचार करून? तेवढ्यात शेजारची निमावहिनी आली. डोळे लाल झालेले, तिला सासुरवास आहे म्हणे. हे आणखी एक टेन्शन. बाईला असा त्रास का होतो, आणि तो सहन का करायचा? पेपरमध्ये हुंडाबळीच्या बातम्या येतात. कुठेतरी अशी काही वाईट लोकं असतात असं मला वाटायचं पण आमच्या शेजारच्या वाड्यातही असं घडलं. 
त्यानंतर लगेचच पुण्यात अशी एक घटना घडली, सुनेला मारून टाकण्याची आणि त्यावर पेपरमध्ये खूप लिहून आलं. महिला संघटना की काय असतात त्यांनी आवाज उठवला. त्या दिवशी शाळेतून येताना लक्ष्मी रोडवरून खूप मोठा मोर्चा चालला होता आणि आश्चर्य म्हणजे घोषणा, आवाज काही नव्हतं. त्यातल्या बायांनी स्वत:ची तोंडं बांधली होती. मूक मोर्चा, निषेधाचा. शांतताच होती सगळी, ती बघ्यांमध्ये पण पसरली होती. नेहमीच्या गडबड गोंगाटाच्या रस्त्यावरच्या त्या शांततेची मला भीतीच वाटली एकदम. अंगावर सरसरून काटा आला. शेजारच्या वाड्यातली घटना आठवली, निमावहिनी आठवली. बापरे म्हणजे असं कुठेही होऊ शकतं. छातीत धडधडत होतं तरी मोर्चा पाहताना बरंही वाटत होतं, का बरं वाटतंय ते नीट कळत नव्हतं.    
चौकातली ती मवाली पोरं, मोर्चा निघून गेला तरी गप्प उभी होती. तिथे जवळच बसणारी भाजीवाली एकदम उठली आणि कडाकडा त्या पोरांना बोलू लागली. ‘तुमच्या डोक्यात काही प्रकाश पडतोय का, दिवसभर उभं राहून पोरीबाळींची छेड काढता, सुधारा पोरांनो. उद्यापासून इथे आलात तर बघा, त्या मोर्चा काढणाऱ्या संस्थेतच तक्रार करते, पोलीसातच देते तुम्हाला’, अशा अर्थाचं काहीतरी ती त्यांना बोलत होती. आजूबाजूची माणसंही तिला दुजोरा देत होती. त्या पोरांनी तिथून काढता पाय घेतला.
त्यानंतर शाळेत जाता येता ती पोरं फारशी दिसायची नाहीत, असली तरी पानटपरीजवळ गप्प उभी राहायची. हळूहळू आम्हालाही तो त्रास थांबल्याची खात्री झाली. त्या दिवशी मोर्चा पाहताना नेमकं काय बरं वाटलं ते मला आता समजलं होतं, मोर्चा पाहून भाजीवालीला धाडस आलं आणि त्यामुळे मुलींची होणारी टवाळी थांबली. आम्ही मजेत शाळेत जातयेत होतो, त्या रस्त्यावरून जायचं टेन्शन आता उरलं नव्हतं.    

Sunday, June 19, 2011

संध्याकाळ


"दहा वीस तीस चाळीस . .. .. . . शंभर"
डबडा ऐसपैसमधे सुकडीवर राज्य होतं. सगळी मोठी मुलं नि आमच्यासारखी बारकीपण, एकत्र खेळत होती. मी, दिप्या, राणी आणि संगी आम्ही चौघंच बारकी. बाकी वाड्यातली सगळी मोठी पोरंपोरी. दादाला माझी काळजी. मला नेहमी सांगतो, एक कोणीतरी आऊट झाल्याशिवाय तू आउट होऊ नको. माझ्यावर  राज्य आलं तर मला पार पिदवतील ही त्याला काळजी. शाळांना सुट्टी असल्याने दुपारचा चहा झाल्यावर खेळ सुरू झाला होता.   
सुकडी जरा बावळटच आहे, आता किती वेळा डबडा उडतो नि किती वेळा तिला  राज्य घ्यायला लागतं” अशी चर्चा मोठया मुलीत चालली होती. मी तरी काय त्यांच्या तिथेच लपले होते म्हणून ऐकलं. सुकडी म्हणजे शकुंतला, संगी म्हणजे संगीता. चांगल्या नावांची वाट लावण्यात आम्ही एकदम बहाद्दर. दिप्याचा दादा खालून भसाया आवाजात माडीवरच्या सुरेशला ‘सुया अशी जोरदार हाक मारतो. दिप्याचे आजोबा म्हणतात, असली हाक म्हणजे पोटात सुरा खुपसल्यासारखंच वाटतं. तर असली ती नावं.
तेवढयात सुकडीचा आवाज आला,  म्या इस्टोप.  म्या बाहेर येईना. सुकडी शिरा ताणून ओरडत होती. मी लपले होते त्या माडीवरल्या कोप-यातल्या अडगळीतून खाली सुकडी दिसत होती. ती बोलत होती त्या दिशेला रम्याच्या शर्टची बाही दिसत होती. आश्चर्य म्हणजे तो हात हलत होता, सुकडीला बोलावत होता. सुकडी थोडी पुढे गेली. कचाकचा बोलण्यातिचं डब्याकडे दुर्लक्ष झालं आणि रम्याचा शर्ट दिसत होता त्याच्या विरुध्द दिशेनी येऊन रम्या डबडं उडवून पळाला. नक्कीच दुसऱ्या कोणीतरी त्याचा शर्ट घालून सुकडीला उल्लू बनवलं होतं. झालं, असं पाचसात वेळा तरी सुकडीला राज्य घ्यावं लागलं. पार रडायला आली. मग तिची ती कजाग (हा शेजारच्या काकूंचा शब्द) आज्जी बाहेर आली आणि तिनी मोठया पोरांचा जो उद्धार केला तो केला. सुकडीला घेऊन ती गेली. मग मजाच गेल्यासारखं झालं.
आम्ही बारकी पोरं लगोरी खेळायला लागलो आणि मोठया पोरंपोरी कट्ट्यावर बसल्या म्हणजे वेगवेगळ्या हं. हे एक मला कळत नाही, खेळतात तर एकत्र पण गप्पा मारताना मात्र वेगवेगळे. त्यातून पोरींची इतकी खुसपूस चालली होती की त्या बाजूने नुसताच फिसफिस आवाज येत होता. पोरांचा जोरदार गोंगाट सुरू होता. दिप्याचा दादा कधीतरी मारलेल्या सिक्सरची action करून दाखवत होता. “अय्या” सुमाताई एकदम म्हणाली. त्यावर ते साहेब एकदम गडबडले पण चेहऱ्यावरून एकदम खुश झालेले वाटले.   
सुकडी आणि तिची आजी बाहेर जाताना पोरांच्या तिथूनच गेल्या. “ताळतंत्र सोडलाय अगदी मेल्यांनी, आरडाओरडा काय करतील, फिदीफिदी काय करतील, घरातली इकडची काडी तिकडे करायला नको” आजींचा पट्टा जोरातच सुटला होता. तेवढयात शर्मा आंटींचा कमलेश त्याच्या जिमीबरोबर आला. जिमी म्हणजे तक्रारखोर, केसाळ कुत्रा, सारखा केकाटणारा. शर्मा आंटीच तेवढ्या आंटी आहेत, का कोण जाणे? बाकी साऱ्या काकू, मावशा नाहीतर माम्या. तेवढयात कमलेशच्या हातून जिमी सुटला आणि धावला तो थेट सुकडीकडेच. मग आजींचा लांब सुटलेला पट्टा एकदम छोटा होऊन थांबलाच. त्या भरभर चालत जाऊन दिसेनाशा झाल्या. पोरं हसून हसून पार पडायला आली.
जिमी परत आला आणि त्याने सम्याच्या पायाला खांब समजून आपला कार्यक्रम सुरू केला. मग सम्याची आणि कमलेशची चांगलीच जुंपली. आम्ही बारकी पोरं तर हसूनहसून लोळायला आलो होतो. मग सम्या आणखीनच चिडला. आमच्याकडे मोहरा वळवणार तोच त्याच्या बाबांची दणदणीत हाक ऐकू आली, मग तो पळालाच घरी.
मग कुणाकुणाचे बाबा आणि काही जणांची आईपण यायची वेळ झाली त्यामुळे  कुणीकुणी घराकडे जायला लागले. एव्हाना आम्ही कट्टयावर बसून पत्ते चालू केले होते. खेळायला जाम मजा येत होती. पण आता अंधारायलाही लागलं होतं. अजून आम्हाला कोणी बोलावलं कसं नाही हा विचार मनात येत नाही तोवर दिप्याला बोलावणं आलंच. आमची चौकडी मोडलीच. राणी म्हणाली म्हणून आम्ही पाच तीन दोन खेळायला लागलो पण काय मजा येईना. मग हळूहळू घरी निघालो ते उद्या संध्याकाळी कायकाय करायचं ते ठरवतच.    

Sunday, June 5, 2011

डबा

शाळेच्या दारापर्यंत पोचलेच होते तोवर शाळेची घंटा ऐकू आली. आमचं हे कायम असंच. कितीही लवकर निघा पण वाटेत मैत्रिणींना हाका मारतत्यांना बरोबर घेऊन येताना वेळ कुठे पळून जातो कळतच नाही. दारातल्या आजींकडून चिंचा घ्यायच्या होत्या पण घंटा ऐकून ताशी कितीतरी मैल की काय म्हणतात त्या वेगाने वर्गातच. पाचवीत आता कुठून कुठून आलेल्या मुली होत्या. वर्गात बरीच गडबड चालू होती. चष्मिस म्हणजे आमची मॉनीटर पोरींना शांत करत होतीतिला कोण दाद देत नव्हतं ते सोडा. तेवढ्यात प्रार्थनेचा टोल पडला. मग कायजादूची कांडी फिरवल्यासारखी शांतताच.

पाचवीत आल्यावर आपण फार मोठे झालोत असं वाटतंय. आज तर मी पोळ्याही लाटल्या आणि लाटताना आईला शंभर प्रश्न विचारले. त्यात पोळी गोल न होता माझंच बोलणं ऐकतेय असं वाटत होतं म्हणजे माझ्या बाजूनेच ती लांबलचक होत होती. मग आई म्हणालीचपोळी लाटता नाही आली तरी शिंगं फुटली आहेत म्हणून. बाबांनी पहिल्यांदा असं म्हटलं तेव्हा आमचा मुक्काम काळजीने आरशासमोरच. खूप खूप वेळ पाहूनही शिंगं दिसेनाच. तेवढ्यात नमीने हाक मारलीकाचा पाणी खेळायला. मग काय शिंगांचा विसरच. नमी माझ्या काचा घेऊन गेली आहे. आज तिच्याकडून घायच्याच.
मग वर्गातल्या सगळ्याजणी एकदम माझ्याकडे पाहायला लागल्याहाक मारू लागल्या. आपण तर काही नाही केलंमगतेवढ्यात बाईंचा आवाज आलाच, "झोप झाली नाही वाटतं." म्हणजे प्रार्थनाप्रतिज्ञा संपून हजेरीचा कार्यक्रम चालला होता. मी गडबडून हजर’ म्हणाले. आमचं हे असंच. डोक्यात काय काय सुरु झाल्यावर आपण कुठे आहोत हे विसरायलाच होतं. एकदा वर्गात खूप दंगा केला म्हणून बाईंनी मागच्या बाकावर उभं केलं होतं. बाई माझ्यापेक्षा बुटक्या दिसत होत्या. उंचावरून सगळ्या पोरींची डोकी मजेदार दिसत होती. कुणाच्या वेण्याकुणाचे बोसुटलेल्या रिबिनी. पुढच्याच बाकावर बसलेल्या सुलीच्या डोक्यातली ऊ पण दिसली. मजेत चालली होती बेटीजंगलातून पायवाटेकडे म्हणजे केसातून भांगाकडे. एकदम हसूच आलं मला. बाईनी रोखून पाहिलं एकदा. काही बोलल्या नाहीतपण त्यांना काय म्हणायचं ते मला नीट कळलं, “शिक्षा केली तरी पोरी दात काढतातकाय करायचं यांना इ. इ. तर आमची गाडी अशीच भरकटत असते.
हजेरी घेऊन बाई गेल्या. पाचवीत ही एक मजाच आहे. प्रत्येक विषयाला वेगळ्या बाई. इंग्लिशच्या बाई खूप छान आहेत. म्हणजे त्या बोलतात त्यातलं सगळंच कळत नाही तरी ऐकत रहावसं वाटतं. मग मधल्या सुट्टीपर्यंत कसले कसले त्रास म्हणजे तास झाले. तोपर्यंत पोटात कावळेच कावळे. कधी एकदा डबा खातोय असं झालं होतं. या शाळेत पारावर बसून डबा खायला मजा येते, गार गार सावलीत. 
डबा काढून बाकावर ठेवला तेवढ्यात पुढल्या बाकावरच्या शमी आणि सोनीचं भांडण सुरु झालंम्हणजे मारामारीच. दोघी ऐकेनात. झिंज्या ओढतचापट्या मारत मस्तच कार्यक्रम चालला होता. मग मला एकदम भुकेची आठवण झाली. डबा घ्यावा म्हणून पुढे झाले तोवर त्यांच्या झटापटीत तो लांब उडाला. टन टीन टन न्न्न्न्न्न्न्न्न...... डब्याने चांगलाच सूर लावला, निषेधाचा की काय तो. मी तर डोळे गच्च मिटूनच घेतले. डब्याचा आवाज थांबल्यावर डोळे उघडून पाहिलं तर तो आ वासून पडला होता, म्हणजे झाकण बाजूला आणि खाऊ सगळा बाहेर. मला तर रडूच फुटलं. तेवढ्यात क्लासटीचर आल्या, कशाला कोण जाणे? पण सगळा रागरंग बघून त्यांनी शमी सोनीची जी हजेरी घेतली ती घेतली. सांडलेला डबा आणि माझं रडणं पाहून त्या माझ्याकडे आल्या नि म्हणाल्या, "चल". “पण बाई मी काही नाही केलंअसं म्हणत मी जास्तच रडायला लागले. आज नेमकी डब्यात पोळी भाजी नाही हे वर्गात पसरलेला चिवडा सांगतच होता. 
"आता काय होणार? आपली आता वरातच की काय?" डोक्यात काय काय येत होतं. चालता चालता आम्ही मोठ्या बाईंच्या ऑफिसकडे जायला लागलो. मला भीतीच वाटायला लागली. पण बाई त्या बाजूनी मला टीचर्स रूममधे घेऊन गेल्या. कितीतरी बाई तिथे डबा खात होत्याच. आमच्या बाईंनी प्रेमाने मला त्यांच्या डब्यातला मसालेभात खायला दिला. माझा डबा सांडला हे कळल्यावर इतर बाई पण काय काय द्यायला लागल्याथालीपीठबर्फीचातुकडाकेळंराजगिरा वडीसाबुदाण्याची खिचडी आणि काय काय. मग तर काय एकीकडे रडू येत होतं आणि एकीकडे मस्त वाटत होतं. आग्रह करकरून त्यांनी मला खाऊ घातल्याने पोट टम्म भरलं. मग मी सगळ्यांना तो खाऊ खूप आवडल्याचं सांगितलं. त्यावर आता डबा सांडू नको असं सगळ्या म्हणाल्या. वर्गात परत येताना मी हवेतच. वर्गात आल्यावर रंगवून सगळ्यांना सांगितलं. न खाल्लेल्या पदार्थांचीही नावं ठोकून दिली. आपल्या बाई किती चांगल्या आहेत नाईअसं ऐकणारी प्रत्येकच मुलगी म्हणून जात होती. वर्गात माझी ऐट विचारूच नका.
घरी येऊन पुन्हा आमची रेकॉर्ड सुरुसगळ्यांनी माझ्या बाईना चांगलं म्हणल्यावर मगच टकळी थांबली. रात्री झोपताना डोक्यात तोच विषय. पण तेवढ्यात काहीतरी लखकन समजल्यासारखं वाटलं. दुपारी सगळ्या बाईंनी दिलेला खाऊ खाताना आणि नंतर ती गम्मत रंगवून रंगवून सांगतानाकोणत्याच बाईंच्या डब्यात पोळी भाजी नव्हती हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं.