Sunday, August 25, 2019

लंडन क्षणचित्रे - ब्रिटिश म्युझियम


१. गोष्ट माणसाची
माझा अभ्यासाचा विषय समाजशास्त्र, मानवी सांस्कृतिक-सामाजिक घडामोडींत मला विशेष रस आहे. ब्रिटिश म्युझियम म्हणजे माझ्यासारखीला पर्वणीच. इथे तब्बल ८० लाख वस्तू आहेत. मेसोपोटेमिया (सुमेरियन, असिरिअन, बाबिलोन साम्राज्य इ.), इजिप्त, युरोप, द. अमेरिका, अशिया अशा मुख्य संस्कृतींची दालनं इथे आहेत. त्यामुळे उपलब्ध वेळ पाहता guided tour करायची हे ठरवलं होतंच. रॉसेल हा आयरिश आर्किऑलॉजिस्ट टूर गाईड होता. या टूरसाठी एकूण आठ जण येणार होते पण पाच जण आले नाहीत. अजून दोन इटालियन होते, त्यांना फार रस आहे असं वाटलं नाही. सुरुवातीलाच रॉसेलने सांगितलं,  I am going to tell you stories of major civilizations. मला तरी दुसरं काय हवं होतं आणि ही जणू माझ्यासाठीची स्पेशल टूर सुरु झाली. रॉसेलकडून काही नवीन गोष्टी कळल्या, काही आधी वाचनात आल्याने माहीत होत्याच. म्युझियम पाहताना या  सगळ्याची संगती मनात लागत होती. मानवी समाजाची आणि वेगवेगळ्या संस्कृतींची गोष्ट थोडक्यात पण संगतवार लिहून ठेवायची हे मी तेव्हाच ठरवलं होतं. 

Entrance of British Museum
तर गोष्ट सुरु होते माणसाची. माणसाची उत्क्रांती आफ्रिका खंडात झाली, तिथून माणसं जगभर पसरली. होमो म्हणजे माणूस प्राण्यातही अनेक प्रजाती होत्या. कालौघात त्या नष्ट झाल्या आणि अनुकुलनासाठी अधिक सक्षम असे होमो सेपिअन्स म्हणजे Wise Man म्हणजे आपण टिकलो. सर्वात अलिकडच्या काळात म्हणजे अंदाजे ४० हजार वर्षापूर्वी नामशेष झालेली प्रजाती म्हणजे होमो निअँदोथॉल. एकोणिसाव्या शतकात जर्मनीतील निअँदो खोर्‍यात प्रथम या मानवाचे अवशेष मिळाले त्यावरून हे नाव पडलं. हिमयुगात शिकार करण्याचे तंत्र, शस्त्रे त्यांच्याकडे होती मात्र वातावरण बदलाबरोबर तंत्रज्ञान विकसित करण्यात ते कमी पडले. होमो सेपियन्सबरोबर त्यांचे संघर्ष झाले, यात अर्थात Wise Man वरचढ ठरला. मात्र अलीकडच्या संशोधनातून निअँदोथॉल आणि होमो सेपियन्सच्या संकराचे पुरावे समोर आले आहेत. बदलत्या वातावरणाशी अनुकूलन साधण्यातली असमर्थता, होमो सेपियन्सशी संघर्ष तसेच होमो सेपियन्सशी संकरातून याच प्रजातीत त्यांचे सामावून जाणे अशा तीन शक्यता त्यांच्या नामशेष होण्यामागे सांगितल्या जातात.  
  
होमो सेपियन्सच्या Hunter-gatherer टप्प्यात शिकारीसाठी योग्य डावपेच, अधिक चांगली शस्त्रे याबाबत माणसे शिकत गेली. साधारण १५ ते २० हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागल्यावर स्थैर्य आले आणि माणसांना उसंत मिळाली. चाकाच्या शोधाने माणसाच्या प्रगतीला चाकाचीच गती मिळाली. त्यातून तंत्रज्ञान, कला, कायदे, नागरी व्यवस्था असा सारा विकास होत गेल्याचं मानलं जातं. अशा अनेक समृद्ध संस्कृती/सभ्यता पृथ्वीवर नांदल्या, लुप्त झाल्या, नव्या संस्कृती आल्या आणि मानवी जीवनाचे चक्र अव्याहत सुरु राहिले.

२. इजिप्त दालन

काही वर्षांपूर्वी इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीबद्दल वाचताना रोझेटा स्टोनविषयी समजलं, तेव्हा हे पाहायलाच हवं अशी तीव्र इच्छा झाली होती. आताच्या ब्रिटिश म्युझियमच्या भेटीत रोझेटा स्टोनच नव्हे तर महत्वाच्या मानवी संस्कृतींचा मोठा ठेवा पुढे आला. प्रथम आम्ही गेलो ते इजिप्त दालनात, जे अपेक्षितच होतं. नील नदीच्या खोर्‍यात फुललेली ही पुरातन संस्कृती (इ. स. पूर्व ३००० ते इ.स. ६४०) मोठ-मोठ्या बांधकामांसाठी प्रसिद्ध, पिरॅमिड तर सात आश्चर्यांपैकी एक. पपायरस वनस्पतीवर प्रक्रिया करून त्याचा कागदासारखा वापर त्यांनी केला, त्यावरूनच पेपर हा शब्द आला आहे.

या दालनात रामसिस द ग्रेट (राज्यकाळ इ.स.पूर्व १२७९-१२१३) या फेरोचा (सम्राट) पुतळा लक्ष वेधून घेत होता. राज्य/देश या संकल्पना प्राथमिक अवस्थेत असताना या सम्राटाने धर्माच्या सूत्राने लोकांना एकत्र बांधलं. साम्राज्यविस्तार केला. राज्यव्यवस्थेची घडी बसवली. सरासरी आयुर्मान ३५-४० वर्षे असताना हा फेरो नव्वद वर्षे जगला आणि त्याने ६७ वर्ष राज्य केलं. अबू सिम्बेल सारखी अनेक मोठी बांधकामं याच्या काळात झाली. सर्वात शक्तिमान फेरो म्हणून हा ओळखला जातो.
रामसीस द ग्रेट 

रोझेटा स्टोन
बोलता बोलता आमची चर्चा इजिप्शिअन हायरोग्लिफवर आली आणि आता आपण इथली सर्वात प्रसिद्ध गोष्ट पहाणार आहोत असं रॉसेलने जाहीर केलं. ते काय याचा अंदाज होताच आणि माझी उत्सुकता शिगेला पोचली. मात्र रोझेटा स्टोनच्या आधी त्याने एक फलकसदृश्य वस्तू दाखवली ज्यावर जवळून हायरोग्लिफ पाहता आली. हायरोग्लिफ म्हणजे प्राचीन इजिप्शियन लिपी ज्यात अक्षरं, शब्द आणि चित्रं यांचा समावेश होतो. काळाच्या ओघात या लिपीचा वापर थांबला तसे कुणी जाणकारही राहिले नाहीत. नंतरच्या काळात इजिप्तमधील वास्तू जगासमोर आल्या तरी या अनाकलनीय लिपीमुळे कशाचाच अन्वयार्थ लागेना. नेपोलियनच्या इजिप्त मोहिमेदरम्यान इ. स. १७९९ मध्ये रोझेटा या गावी एक पाषाणस्तंभ फ्रेंच सैनिकांना सापडला. फ्रेंच अधिकार्‍याने त्याचे महत्व जाणले, यानंतर या मजकुरावर काम सुरु झाले. या अभ्यासातून लक्षात आले की एकच मजकूर प्राचीन हायरोग्लीफ, डेमोटिक आणि प्राचीन ग्रीक लिपीत आहे. तज्ञांच्या ३० वर्षांच्या मेहनतीतून हायरोग्लिफ उलगडत गेली आणि प्राचीन इजिप्तबद्दल जगाला माहीत झाले. इजिप्तवरील दालनात पुतळे, ममी, शवपेट्या अशा अनेक वस्तू आहेत, त्यावर नजर टाकली. पुन्हा एकदा  रोझेटा स्टोन डोळ्यात भरुन घेताना मनात येत होतं, आपल्या सिंधू संस्कृतीचीही अशी काही चावी सापडली तर काय बहार येईल !!

लंडन क्षणचित्रे: १. नॅचरल हिस्टरी म्युझियम


जुलै (२०१९) मध्ये एका प्रोजेक्ट मीटिंगच्या निमित्ताने लंडनला गेले होते. काम झाल्यावर चार दिवस लंडनमध्ये फिरायचा बेत आखला. काम आटोपल्यावर लंडनमध्ये सार्वजनिक वाहतूकीने एकटीने फिरायचा पहिलाच दिवस. मात्र ही व्यवस्था अत्यंत सक्षम आणि प्रवाशांसाठी सुलभ असल्याने माईलएंड ट्यूब स्टेशनवरून ट्रेन पकडून सुखेनैव साउथ केंझिंगटनला पोचले. सबवे पार करून गेल्यावर या म्युझियमची भव्य इमारत दिसली. आवारात प्रथम समोर आला एका झाडाचा बुंधा, जो डायनासोरपेक्षाही जुना असल्याचं माहितीफलकाने सांगितलं आणि आत काय खजिना पहायला मिळणार याची उत्सुकता वाढली. आत गेल्यावर ही इमारत आणखीच सुंदर भासली. कमानी, सुंदर रंगवलेल्या तावदानांच्या खिडक्या, मोठ्ठे वळणदार जिने इमारतीच्या प्रशस्तपणात भर टाकत होते. 


चार्ल्स डार्विन
Entrance of Natural History 














प्रवेश केल्यावर समोर चार्ल्स डार्विनचा (१८०९-१८८२)  सुरेख पुतळा दिसतो. अपार मेहनत घेऊन त्याने पृथ्वीवरील प्रजातींच्या उत्पत्ती आणि उत्क्रांतीवर संशोधन केले. त्याच्या प्रसिद्ध बीगल जहाजातून दक्षिण अमेरिका, आफ्रिका, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा विविध भूभागात जाऊन अभ्यास केला. असंख्य नमुने (Specimen) गोळा केले. सर्व प्रजातींची उत्पत्त्ती एका पूर्वजापासून झाली हे त्याचे गृहितक जगन्मान्य आहे आणि उत्क्रांतीवादाचा सिद्धांतही. अशा डार्विनला मानवंदना द्यायला यापेक्षा सुयोग्य जागा कुठली असणार? तर डार्विनने गोळा केलेले काही नमुने इथल्या संग्रहात आहेत, यावरून या ठिकाणाचं ऐतिहासिक मूल्य लक्षात येईल. सेन्ट्रल हॉल मध्येच ब्लू व्हेलचा सांगाडा आहे, तो लोकप्रिय आहे आणि डिप्पी हे त्याचं लाडाचं नाव आहे. इथल्या वस्तू, नमुने, अवशेषांची एकूण संख्या सुमारे आठ कोटी आहे. महत्वाचं म्हणजे म्युझियम पाहण्यासाठी काहीही शुल्क नाही. 

फॉसिल वूमन असं जिला म्हटलं जातं, त्या मेरी अनिंग (१७९९-१८४७) विषयी प्रथमच समजलं.  भूतकाळातील प्रजातींचे अवशेष शोधणं, साफ करणं, ओळखणं हे तिने अनेक वर्ष मनस्वीपणे केलं. तिने शोधलेले काही Jurassic marine fossils इथे आहेत. तिच्या या शोधांमुळे प्रागैतिहासिक काळातील जीवन आणि पृथ्वीचा स्वाभाविक इतिहास याबाबतच्या अभ्यासात मोठे बदल झाले. डार्विनचे ‘Origin of Species तिच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी प्रकाशित झालं, हे लक्षात घेतलं तर तिच्या कामाचं महत्व कळेल. कुठलाही नैसर्गिक बदल म्हणजे ईश्वरी इच्छा असं मानण्याच्या काळात ती नेटाने काम करत होती. अनेक शास्त्रज्ञ, अवशेष साफ करण्यासाठी आणि ओळखण्यासाठी तिच्याकडे आणत. पण कोणत्याच संशोधनात तिला श्रेय देण्यात आले नाही. स्त्री असल्याने Geological Society of London चे सदस्यत्व तिला मिळाले नाही. तिच्या मृत्यूनंतर १६३ वर्षांनी, विज्ञानाच्या इतिहासातील दहा प्रभावशाली ब्रिटिश स्त्रियांमध्ये तिचा समावेश करण्यात आला.    
     

डायनासोरवर इथे स्वतंत्र दालन आहे, त्यातल्या अनेक प्रजातींचे सांगाडे, त्यांची इत्यंभूत माहिती आहे. इथे लहान मुलांची गर्दी होती, त्यांना रिझवायला डायनासोरचे दोन हलते नमुनेही ठेवलेत, तिथे सर्वात जास्त गर्दी. अन्य दालनांत अनेक प्राणी, पक्षी, खनिजे यांचे नमुने/अवशेष आहेत. आठ कोटी गोष्टी पाहणं शक्यच नव्हतं. महत्वाच्या गोष्टी पहिल्या. दुपारी ब्रिटीश म्युझियमची टूर ठरलेली होती त्यामुळे ती वेळ गाठण्यासाठी तिथून निघाले.


Tuesday, March 5, 2019

#मीटू .... काय साधलं?

ऑक्टोबर २०१७ मध्ये मीटू हा हॅशटॅग व्हायरल झाला. लाखो महिलांनी हा हॅशटॅग वापरून लैंगिक छळाचे अनुभव सोशल मिडियावर मांडले. यावर अनेक आक्षेपही घेण्यात आले. या महिला इतक्या वर्षांनी का बोलत आहेत? कशावरून त्या खरं सांगत आहेत? ज्यांच्या हातात सोशल मीडिया आहे त्या व्यक्त झाल्या, पण कष्टकरी महिलांचे काय? इ. इ. खरे तर लैंगिक छळाच्या मुद्द्यावर महिला अनेक वर्षे आवाज उठवत आहेत. मीटू मध्ये आरोप झालेल्यापैकी बहुतेक घटना या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या आहेत. याच्या प्रतिबंधासाठी भारतात विशाखा मार्गदर्शक तत्वे आणि नंतर त्यावर कायदा आला. भँवरी देवी ही सर्वसामान्य ग्रामीण महिला, तिच्यावरच्या लैंगिक अत्याचाराबाबत ठामपणे उभी राहिल्याने हे शक्य झाले आहे. आता मीटू एवढे व्हायरल का झाले, याचा धांडोळा घेताना अनेक कारणे लक्षात आली.
पाश्चात्त्य स्त्रीवादी चळवळीची चौथी लाट[1] साधारण २०११ पासून सुरु झाल्याचे मानले जाते, यामध्ये इंटरनेट हे माध्यम ठळकपणे वापरले गेल्याचे दिसते. त्यापूर्वीच २००६ साली Me Too चा वापर तराना बर्क या आफ्रिकन-अमेरिकन नागरी हक्क चळवळीतील कार्यकर्तीने केला होता. तेरा वर्षाच्या एका मुलीने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविषयी सांगितले, त्यावेळी तिला Me Too असे म्हणायला हवे होते, असे तरानाने नोंदवले आहे. यातूनच लैंगिक छळाबद्दल जागरूकता आणण्यासाठी तिने Me Too चा वापर करायला सुरुवात केली. त्यातून अनेक पीडितांना बळ मिळाले. १५ ऑक्टोबर २०१७ रोजी अमेरिकन अभिनेत्री आलिसा मिलानो हिने हा हॅशटॅग वापरला. हार्वे विन्स्टन या अमेरिकन चित्रपट निर्मात्यावर बलात्कार, लैंगिक छळाचे आरोप झाले. त्या संदर्भात पीडितांना पाठिंबा देण्यासाठी आलिसाने हा हॅशटॅग  वापरला. हा हॅशटॅग लाखो वेळा वापरला गेला, अनेक स्त्रिया हा  हॅशटॅग वापरूनव्यक्त होऊ लागल्या आणि #MeToo ही चळवळ म्हणून उभी राहिली. मात्र लैंगिक छळ वा लिंगभाव विषमता याबाबतचा सोशल मीडियातला हा काही पहिलाच हॅशटॅग नव्हता. (हॅशटॅग म्हणजे विशिष्ट शब्दाआधी # हे चिन्ह लावणे, जेणेकरून तो वापरून विशिष्ट विषयावरील सोशल मीडियातले विखुरलेले लिखाण एकत्रित बघता येऊ शकते.)
मीटूच्या आधी लैंगिक छळाच्या संदर्भात वापरलेल्या काही महत्वाच्या हॅशटॅगविषयी थोडक्यात जाणून घेऊ.
Yes All Women:  २०१४ मध्ये कॅलिफोर्नियामध्ये सहा खून झाले आणि तेरा जण जखमी झाले. हत्येपूर्वी बावीस वर्षाच्या तरुण गुन्हेगाराने इंटरनेटवर स्त्रीद्वेष्टया क्लिप्स टाकल्या होत्या. या घटनेमुळे स्त्रीद्वेष्ट्या मानसिकतेवर वादळी चर्चा झाल्या. काही पुरुषांनी सगळे पुरुष स्त्रीद्वेष्टे नसतात हे सांगण्यासाठी  #NotAllMen हा हॅशटॅग वापरला. त्यावर #YesAllWomen हा हॅशटॅग वापरण्यात आला. जरी सगळे पुरुष तसे नसले तरी बहुतेक स्त्रियांना लिंगभेद आणि स्त्रीद्वेष्टेपणाला तोंड द्यावं लागतं हे सांगण्याचा हा प्रयत्न होता. चार दिवसातच हा हॅशटॅग १२ लाख वेळा वापरला गेला.
Bring Back our Girls:  एप्रिल २०१४मध्ये नायजेरियातील चिबॉक शहरातून २७६ मुलींचे बोर्डिंग स्कूलमधून अपहरण करण्यात आले. यामागे बोको हराम ही संघटना होती. या घटनेमुळे जगभर खळबळ झाली. सोशल मीडियावरही हा हॅशटॅग वापरुन कँपेन उभे राहिले. मिशेल ओबामा यांनी हा हॅशटॅग वापरून अमेरिकन अध्यक्षांतर्फे निवेदन केले. त्यात त्यांनी म्हटले, “चिबॉक अपहरण ही एकमेव घटना नाही. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपडणार्‍या मुलींना अशा धोक्यांना जगभरच तोंड द्यावं लागतं आहे.”  मुलींची सुटका हा मुद्दा कँपेनच्या केंद्रस्थानी होताच, त्याचबरोबर मुलींचा शिक्षणाच्या हक्काचा मुद्दाही मुख्य चर्चेत आला. दुर्देवाने offline मोहिमेला म्हणजे प्रत्यक्ष सुटकेच्या प्रयत्नांना मर्यादित यश मिळालं. २७६ पैकी १२५ मुली अजून सापडलेल्या नाहीत. (हा आकडाही अनेक रिपोर्टस मध्ये वेगवेगळा आहे.)  
Everyday Sexism: रोजच्या आयुष्यात दिसणार्‍या लिंगभेदाबाबत स्त्रियांनी बोलते व्हावे म्हणून लॉरा बेट्स यांनी एप्रिल २०१५ मध्ये हा हॅशटॅग सुरु केला. त्याचा वापर करून अनेकींनी आपले अनुभव मांडले. या संभाषणातून लिंगभेदाबाबतीतली चर्चा विस्तारली आणि अगदी सूक्ष्म पक्षपाती वर्तनापर्यंतचे मुद्दे विचारात आले. यापूर्वीच २०१३ मध्ये Every Day Sexism Project आणि Women, Action and Media या संस्थेने फेसबुकवरील स्त्रीविरोधी पोस्ट्स, पेजेस याविरोधात online campaign उभं केलं. फेसबुकला पाठवलेल्या अनावृत्त पत्रात त्यांनी स्त्रियांवरच्या अत्याचाराला, बलात्काराला चिथावणी देणार्‍या काही पेजेसचा उल्लेख केला होता, फेसबुकने असा आशय तपासण्याची मागणी करण्यात आली. या पाठपुराव्याचा परिणाम होऊन फेसबुकने अशा पेजेसवर कारवाई केली आणि आपली व्यवस्था Sexist Hate Speech ओळखण्यात कमी पडल्याचे मान्य केले. Controversial, Harmful and Hateful Speech on Facebook संदर्भातले फेसबुकचे निवेदन फेसबुकवर उपलब्ध आहे.
Questions for men‘या बाईला काही करून लक्ष वेधून घ्यायचं असतं’, अशा आशयाच्या प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियन लेखिका क्लेमेंटाइन फोर्ड हिला  एका लेखावर मिळाल्या. यावर तिने पुरुषांना प्रश्न ट्वीट केला, “जर तुम्ही इतरांना विवाद्य वाटणारा मुद्दा मांडला तर तुम्हाला ‘attention seeker’ असं म्हटलं जातं का?” यावर भराभर आलेल्या प्रतिक्रियांतून #Questionsformen या नवीन हॅशटॅगची सुरुवात झाली. जगभरातील स्त्रियांनी हा हॅशटॅग वापरून त्यांना येणार्‍या भेदभाव आणि लैंगिक छळाच्या अनुभवांबद्दल पुरुषांसाठी प्रश्न उपस्थित केले. उदा. तुम्हाला कामाच्या ठिकाणी ‘हनी, ‘स्वीटी’ असं कुणी म्हणतं का? जॉब इंटरव्ह्यूमध्ये घरची जबाबदारी आणि काम याचा ताळमेळ कसा राखणार हे कुणी पुरुषांना विचारतं का? इ.
असे अजूनही काही हॅशटॅग मीटू च्या पूर्वी वापरले गेलेले दिसतात, ज्यामुळे लिंगभावाविषयक अनेक महत्वाचे मुद्दे सोशल मीडियात चर्चिले गेले. #MeToo चा एक महत्वाचा परिणाम म्हणजे अनेकींना त्यातून धाडस मिळालं आणि त्या लैंगिक छळाच्या अनुभवाबद्दल लिहू लागल्या. एमिली जॉय हिने ट्वीटरवर आपली कहाणी मांडली. दहा वर्षापूर्वी चर्चमध्ये झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल तिने लिहिले आणि यातून #ChurchToo सुरु झाला.
#MeToo India - हे वादळ भारतात धडकलं ते राया सरकार हिच्या ‘नेम अँड शेम लिस्ट च्या रुपाने. या विद्यार्थिनीने सोशल मिडियावर टाकलेल्या यादीत भारत, अमेरिका आणि इंग्लंड मधल्या विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थातील लैंगिक छळाचे आरोप असलेल्या प्राध्यापकांची नावे होती. यामुळे शिक्षण क्षेत्रात उलथापालथ झाली. यावर खूप टीका झाली. अशा प्रकारे जाहीर बदनामी करणे योग्य नाही, अशी टीका स्त्रीवादी कार्यकर्त्यांनीही केली. मात्र या विद्यार्थिनींचं म्हणणं होतं की अनेकदा याबाबतीत तक्रार करुनही काहीच न झाल्याने नाईलाजाने हे पाऊल उचलावं लागलं. नवीन विद्यार्थिनींना सावध करण्यासाठी हे केल्याचं राया सरकारने म्हटलं होतं. या यादीबद्दल, त्यातल्या काही नावांबद्दल वृत्तपत्रातही बरंच काही छापून आलं. यातल्या काही आस्थापनांनी या घडामोडींची दखल घेऊन चौकशी केली आणि आरोपात तथ्य आढळल्यावर दोषींवर कारवाईही केली. ‘नेम अँड शेम’ लिस्टच्या निमित्ताने कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीवर झगझगीत प्रकाश पडला.  
#MeToo वरील आक्षेप यावरचा प्रमुख आक्षेप म्हणजे स्त्रिया इतक्या उशीरा का बोलत आहेत? याबाबतीत अमेरिकेतलं एक महत्वाचं उदाहरण द्यायलाच हवं. जुलै २०१८ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सुप्रीम कोर्ट जजसाठी ब्रेट कव्हानो यांचं नामांकन केलं. डॉ. ख्रिस्तीन फोर्ड या अमेरिकन प्राध्यापिकेने कव्हानो यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले, ही छळाची घटना १९८२ मधली होती. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट केले की डॉ. फोर्ड यांनी तेव्हाच कायद्याची मदत का घेतली नाही? एवढेच नाही तर कव्हानो यांना पाठिंबा देणारी अनेक tweets त्यांनी केली आणि जाहीर सभेत डॉ. फोर्ड यांचा उपहासही केला. याला तत्काळ प्रतिसाद आला तो #WhyDidn’tIReport. या हॅशटॅग खाली अनेकजणी लिहू लागल्या आणि स्त्रिया लगेच का बोलू शकत नाहीत याची अनेक कारणे पुढे आली, ती अशी; कारण मी वयाने लहान होते, तो काका-मामासारखाच होता, मला कोणाचाच पाठिंबा नव्हता, तो कामाच्या ठिकाणी बॉस होता, माझ्यावर कोणी विश्वास ठेवला असता का? एकदा तक्रार केली तर मलाच ‘trouble maker’ म्हणून हिणवलं गेलं, तक्रार केली पण माझीच नोकरी गेली, माझे सहकारी म्हणाले त्याचं आयुष्य उध्वस्त होईल, तुझी बदनामी होईल इ. जेव्हा स्त्रिया याबद्दल लिहू लागल्या, त्यावर आलेल्या अनेक असंवेदनशील कॉमेंट्स हेच स्त्रिया तक्रार का करत नाहीत या प्रश्नाचं उत्तर आहे. राष्ट्राध्यक्ष या जबाबदार पदावरील व्यक्तीचं वर्तन ही त्यावरील कडी होती.
भारतातही अनेक क्षेत्रातल्या स्त्रियांनी आरोप केले तेव्हा हाच आक्षेप घेतला गेला. वर नमूद केलेल्या कारणांबरोबर मला आणखी एक कारण वाटते ते म्हणजे सामाजिक पर्यावरणाचे. पंधरा-वीस वर्षापूर्वी आपली मानसिकता काय होती? सार्वजनिक जागी होणार्‍या छळाला छेडछाड म्हटलं जाई इतकं त्याचं मामुलीकरण झालं होतं. मी कॉलेजमध्ये असण्याच्या काळात (म्हणजे साधारण वीस-पंचवीस वर्षापूर्वी) बाहेर पडायचे आहे ना, मग काही गोष्टी सहन करायलाच हव्यात ही मानसिकता होती आणि नाईलाजाने ते मान्य करावे लागत होते. कारण तक्रार केली तर आधी मुलगी कुठे गेली होती? किती वाजता? कुणाबरोबर? काय कपडे होते? असा जाब पीडितेलाच विचारला जाई. आज ही मानसिकता पूर्णपणे बदलली नसली तरी आता ज्याने अत्याचार केला त्याचीच चूक आहे इथपर्यंत लोकमानस काही अंशी, विशेषत: निर्भया घटनेनंतर बदलल्याचे जाणवते आहे.
मीटूवरची आणखी एक प्रतिकूल प्रतिक्रिया म्हणजे पुरुषांना आता जपूनच राहायला हवं, त्यांना खोट्या तक्रारीत अडकवलं जाऊ शकतं. महिला सर्रास खोट्या तक्रारी करतात असा बर्‍याजणांचा समज असतो. लैंगिक छळ झाला असला तरी महिला तक्रार करत नाहीत असा सर्वसाधारण अनुभव आहे. त्याची कारणे आधी आली आहेतच. काही प्रमाणात कायद्याच्या गैरवापराची शक्यता गृहित धरतानाही एक लक्षात घ्यायला हवे की खोटी तक्रार करणे सोपे नाही. विशेष म्हणजे तक्रार खोटी आहे असं चौकशीत दिसलं तर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्यानुसार तक्रारदारावरही कारवाई करण्याची शिफारस समिती देऊ शकते. अर्थात पुरावा नाही म्हणजे तक्रार खोटी असा निष्कर्ष काढणेही योग्य नाही. तक्रार केल्याप्रमाणे गैरवर्तन झाले आहे का याची संभाव्यता बघणे गरजेचे आहे. यासाठी समितीने अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने, कोणताही पूर्वग्रह न ठेवता काम करणे गरजेचे आहे.
Genpact या नोईडामधील कंपनीत लैंगिक छळाची तक्रार झाल्यावर प्रतिवादीने आत्महत्या केली, त्यानंतर समितीच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. मीटू मुळे एका माणसाचा जीव गेला अशीही प्रतिक्रिया आली. त्या केसबाबतच्या वार्तांकनावरुन असं दिसतं की कंपनीतल्या दोन महिला कर्मचार्‍यांनी सहाय्यक उपाध्यक्षाविरोधात तक्रार केली. कंपनीने चौकशी कालावधीसाठी त्याला ताबडतोब निलंबित केले, त्यानंतर त्याने आत्महत्या केली. खरंतर तक्रार अंतर्गत समितीकडे जाऊन, प्रतिवादीला तक्रारीची प्रत देऊन त्याचा लेखी खुलासा घेणे आवश्यक होते पण त्या आधीच व्यवस्थापनाने त्याला निलंबित केले. तेव्हा याबातीत कायद्याचे योग्य पालन केले नाही असे दिसते आहे.
नारी समता मंच या मुद्द्यावर विशाखा आदेश आल्यापासून कार्यरत आहे. चौकशी योग्य प्रकारे होत नसल्याने अनेक महिला आमच्याशी सल्लामसलत करायला येतात. अंतर्गत समिती सदस्यांना प्रशिक्षण नसल्याने तक्रार आल्यावर नेमके काय करायचे याविषयी संभ्रम असलेला आम्हाला दिसतो.
कायद्याची गरज आणि महत्व : मीटू मध्ये आरोप झालेल्यापैकी बहुतेक घटना या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या असल्यने संबंधित कायद्याबद्दल बोलणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) हा कायदा २०१३ मध्ये लागू झाला. महिलांचा लैंगिक छळ होण्याची शक्यता जास्त असल्याने हा कायदा महिलांसंदर्भात आहे. या कायद्याची बलस्थाने थोडक्यात पाहू;
कामाच्या ठिकाणचा लैंगिक छळ महिलेच्या प्रगतीतला अडथळा असून त्याचा कौटुंबिकव्यावसायिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेऊन हा कायदा आला आहे. म्हणजेच हा कायदा पुरुषविरोधी नाही तर लैंगिक छळाच्या विरोधात आहे.
लैंगिक छळ विरोधी धोरण: कायद्यानुसार १० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत अशा ठिकाणी कार्यालयाचे लैंगिक छळविरोधी धोरण असायला हवे.
प्रतिबंध: हा कायदा सुधारणावादी आहे, शिक्षाकेंद्रित नाही. म्हणूनच प्रतिबंधाचा विचार हा कायदा करतो. यासाठी प्रबोधनाचे कार्यक्रम घेणे बंधनकारक आहे.
अंतर्गत समिती: तक्रार निवारणासाठी अंतर्गत समिती नेमायला हवी. ज्यात किमान ५०% सदस्य महिला असाव्यात तसेच एक बाह्य सदस्य असणे गरजेचे आहे. समितीची माहिती सर्वांना कळेल अशी लावणे बंधनकारक आहे.
व्यापक व्याख्या: कायद्यातील लैंगिक छळाची व्याख्या व्यापक आहे, स्त्रियांना येणार्‍या सर्व प्रकारच्या अनुभवांची दखल घेणारी आहे. तसेच तक्रारदाराच्या व्याख्येत कायम असलेल्या महिला कर्मचारीच नव्हे तर कंत्राटी कामगार, अर्धवेळ, स्वयंस्फूर्तीने काम करणार्‍या, काही कारणाने कार्यालयाला भेट देणार्‍या अशा सर्व महिलांचा समावेश आहे. कामाचे ठिकाण म्हणजे फक्त कार्यालयीन इमारत नसून कामाच्या निमित्ताने भेट द्यावी लागणारी ठिकाणे, कार्यालयीन सहली किंवा अगदी कर्मचार्‍यांचे what’s app/email/message हेही या कक्षेत येतात.
कालबद्ध चौकशी प्रक्रिया: तक्रार आल्यावर सात दिवसाच्या आत प्रतिवादीकडे तक्रारीची प्रत पाठवून लेखी खुलासा समितीने मागणे अपेक्षित आहे. यासाठी त्याला दहा दिवसाची मुदत द्यायला हवी. यानंतर चौकशी करून ती तक्रारीच्या तारखेपासून नव्वद दिवसात पूर्ण करणे बंधनकारक आहे. यानंतर दहा दिवसात समितीने अहवालासह शिफारसी देणे गरजेचे आहे आणि त्या शिफारसी अमलात आणणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. यासाठी व्यवस्थापनाला साठ दिवसांची मुदत आहे.
संवेदनशील हाताळणी अपेक्षित: तक्रारीकडे काय कटकट आहे म्हणून बघणे किंवा प्रतिवादीकडे गुन्हेगार म्हणून बघणे किंवा चौकशीदरम्यान आक्षेपार्ह प्रश्न विचारणे हे होता कामा नये. दोघांनाही कायद्याचे नियम आणि प्रक्रिया समजून सांगणे गरजेचे आहे तसेच दोघांनाही आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी मिळायला हवी.
कायद्याचे पालन न झाल्यास दंड तसेच परवाने रद्द होण्यापर्यंतच्या कारवाईची तरतूद आहे पण अजून कायदापालनाच्या तपासणीबाबत यंत्रणा नाही. मात्र बंधनकारक असूनही ज्या ठिकाणी कायदा पाळला जात नाही अशा ठिकाणी कर्मचारीही विचारणा करू शकतात. मीटू चा परिणाम म्हणून या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार जागे झाले आहे. तीन केंद्रीय मंत्र्यांचा गट स्थापन झाला असून सरकारी आस्थापनांतील कायद्याच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी माहिती मागवायला सुरुवात केली आहे. अगदी अलीकडच्या काळात राष्ट्रीय महिला आयोगाने या कायद्याबाबत विभागीय चर्चासत्रे आयोजित केल्याचे दिसते आहे.
हा सारा आढावा घेताना मला जाणवणारी सकारात्मक बाब म्हणजे याबाबत काही एक वातावरण निर्मिती निश्चित झाली आहे. आमच्या अंतर्गत समितीवर तुमचा प्रतिनिधी येईल का अशी विचारणा करणारे फोन नारी समता मंचाच्या ऑफिसमध्ये आता वारंवार येतात. मीही अशा काही आस्थापनांच्या समितीवर काम करते. कर्मचार्‍यांसाठी प्रबोधनपर सत्रे घेताना MeToo बाबतच्या  उत्सुकतेमुळे सकस चर्चा घडवता आल्या. अशा अनेक ठिकाणचे प्रशासनही MeToo मुळे सतर्क झालेले अनुभवास आले. लैंगिक छळाच्या तक्रारी संवेदनशीलतेने हाताळल्या जातात, हा विश्वास निर्माण झाला तर पीडित स्त्रिया पुढे येतील. कामाच्या ठिकाणी लिंगभाव संवेदनशीलतेचे कार्यक्रम घेण्यातून स्त्री-पुरुष कर्मचार्‍यांत परस्पर आदराची, विश्वासाची भावना निर्माण होईल, ते समान भागीदार म्हणून छळमुक्त आणि भयमुक्त वातावरणात वावरतील. समाज म्हणून आपले अंतिम उद्दिष्ट हेच असायला हवे.  
-     प्रीती करमरकर
प्रसिद्धी: मिळून सार्‍याजणी, मार्च २०१९  



[1] ढोबळमानाने असं मानलं जातं की मतदानाच्या हक्कासाठी स्त्रियांनी केलेली चळवळ ही पहिली लाट, १९२० साली हा हक्क मिळाला. त्यानंतर १९६० पासून दुसरी लाट ज्यामध्ये स्त्रियांच्या हक्कांबाबत अनेक आंदोलने झाली, स्त्रीवादी सिद्धांकन जोरकसपणे पुढे आले. १९९१ मध्ये अमेरिकन सुप्रीम कोर्ट जजसाठी नामांकन झालेल्या क्लेरन्स थॉमस यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले, त्यातून जे आंदोलन उभं राहिलं त्यातून तिसर्‍या लाटेची सुरुवात झाल्याचं मानलं जातं.

Friday, February 3, 2017

पार्च्ड आणि पिंक


पार्च्ड आणि पिंक हे दोन्ही सिनेमे स्त्री-मुक्तीचा उद्गार म्हणून चांगलेच चर्चेत आले. एकतर ते साधारण एकाच वेळेत सिनेमाघरात होते आणि दोन्ही चित्रपटात काही वरवरची साम्ये दिसतात. दोन्ही चित्रपटात तीन नायिका (Protagonist) आहेत. दोन्ही चित्रपटातल्या नायिकांना पुरुषी अत्याचाराला सामोरं जावं लागलं आहे. पार्च्डमधल्या तीन स्त्री व्यक्तीरेखांचा दर्जा वेगवेगळा आहे, म्हणजे पुरुषांशी असलेल्या नात्यासंबंधात वेगवेगळा आहे, अर्थात त्यावर आजही स्त्रीचा सन्मान ठरतो हे खरे आहेच. रानी विधवा आहे, लाजो विवाहित पण मूल नसलेली आणि बिजली ही नर्तकी आणि वेश्याव्यवसाय करणारी आहे. चित्रपट म्हणून पार्च्ड, मला फारसा आवडला नाही. या चित्रकथेत काही बलस्थाने आहेत, जी पूर्वार्धात थोड्याफार प्रमाणात फुलतात. या भागात सिनेमा उत्सुकता चांगलीच टिकवून ठेवतो. मध्यंतर होताना रानी (तनिष्ठा बॅनर्जी) आपल्या मुलाला सांगते, “मर्द बादमे बन, पहले इन्सान बनने की कोशिश कर।” हे सरप्राइज वाटलं तरी ते सकारात्मक आहे. पार्च्ड मधल्या तिघींमध्ये मला त्यातल्या त्यात रानी ही व्यक्तिरेखा सशक्त वाटली. जीवनाच्या अनुभवातून तिला आलेलं शहाणपण परिपक्वतेकडे जातं. यामध्ये अर्थातच सुनेला, सासूच्या टिपिकल मानसिकतेतून वागवण्यासारखे टप्पे आहेतच. तरीही शेवटी ही रानी सुनेला, तिच्या प्रियकरासोबत रवाना करण्यासारखा निर्णय घेते, हे पाहणे फार ह्रद्य  आहे.
रानी-बिजलीसोबत मनसोक्त फिरणारी, अगदी चावट बोलणारी, बसमध्ये बसल्यावर खिडकीबाहेर डोके काढून मोकळी हवा चाखणारी लाजो (राधिका आपटे) स्वातंत्र्याकांक्षी वाटते, पण अत्याचारी नवऱ्याला मात्र कधीच विरोध करत नाही. पुरुषी अत्याचाराला कधीच प्रतिकार न करणारी लाजो, मूल हवे म्हणून अनोळखी माणसाशी संग करते ही बाब त्या व्यक्तिरेखेचा स्वाभाविक विकास वाटत नाही. रानीची १५ वर्षाची सूनही लग्न मान्य नाही म्हणून स्वत:चे केस बारीक कापून आपल्या परीने प्रतिकार करते. पण वयाने प्रौढ, भरतकामात प्रवीण आणि त्यातून कमावणारी लाजो मात्र नवऱ्याचा मार खातच रहाते.
बिजली (सुरवीन चावला) ही नौटंकीमध्ये नाचणारी आहे. पुरुषांच्या भावना चाळवणारे नृत्य करणे आणि जास्त पैसे देणाऱ्या गिऱ्हाईकांची शय्यासोबत करणे हा तिचा पेशा आहे. रानीच्या नशेत असलेल्या नवऱ्याला बिजली घरी पोचवायला जाते तेव्हा रानी तिच्याशी माणुसकीने वागते, तिला जेवायला देते. तेव्हापासून रानी आणि बिजली खास मैत्रिणी होतात (अर्थात हे बिजलीच्या बोलण्यातून कळते). रानी आणि लाजोही शेजारणी. एकमेकीशी सुखदु:ख, बहुधा दु:खच शेअर करणाऱ्या. मग या तिघी घट्ट मैत्रिणी होत जातात. त्यांच्या मजेदार सहलीत त्या रानीच्या सुनेलाही सहभागी करून घेतात तेव्हा खरेच माझ्या डोळ्यात पाणी आले.
किशन हा त्या गावातला तरुण, वेगळी वाट चालतो आहे. गावातल्या स्त्रियांना काही प्रशिक्षण/काम देऊन सक्षम करायचा प्रयत्न करतो आहे, त्याची पत्नी मणिपूरची आहे. तिला स्थानिक लोक विदेशी समजतात, स्थानिक तरुण ज्यात रानीचाही मुलगा आहे ते तिला कायम त्रास देत रहातात. पुरुषी अत्याचारी मानसिकता अधिक गडद करण्यासाठी या व्यक्तिरेखेची योजना केल्यासारखे वाटते. किशन ही एकमेव पुरुष व्यक्तिरेखा समंजस आहे. बाकी सगळे पुरुष अत्याचारी, बाईच्या मनाचा बिलकुल विचार न करणारे आहेत. लाजोच्या नवऱ्याला आपण मूल जन्माला घालू शकत नाही हे माहीत आहे. तरीही तो लाजोला वांझ म्हणून मारहाण करतो. तिला दिवस गेल्यावरही रांड म्हणून निर्दयपणे मारहाण करतो. त्यामुळे अत्याचारी पुरुष आणि बळी स्त्री अशाच घिस्यापिट्या प्रतिमा दिसत राहतात. लाजोचा अत्याचारी नवरा घरात अपघाताने जळून मरतो तेव्हा बाहेर रावणदहन सुरु असते ही अशीच गुळगुळीत प्रतिमा.
बिजली बिनधास्त आहे मात्र तिलाही स्पर्धा, पुरुषी अत्याचाराची भीती आहेच. तिला सामान्य आयुष्य जगावेसे वाटते. तिच्यासोबत काम करणारा राजू तिला जीवनात सोबत करेल असे वाटत असतानाच तो तिचा दलाल होऊ पाहतो. ‘खुदकी कदर करना सीख’ असे बिजलीला सांगणारा राजू, तिच्या शरीराच्या सौद्यातच रस दाखवतो तेव्हा इथेही शेवटी सगळे पुरुष असेच, हा विचार दिसतो.
या तीन स्त्रियांमधील सशक्त आणि एकमेकीना बळ देणारे नाते ही या कथेची जमेची बाजू. पण तरीही चित्रपटाचा शेवट अतिरंजित वाटतो. शेवटी तिघीजणी आपला मार्ग शोधायचे ठरवून एकमेकींच्या सोबतीने मोठ्या जगात (मुंबईत) जायचे ठरवतात. ही ही स्वातंत्र्याची एक गुळगुळीत प्रतिमा. या तीनही व्यक्तिरेखा, त्यांची सामाजिक-भौतिक परिस्थिती पहाता, खरेतर प्रतिकाराच्या किंवा अगदी स्वातंत्र्याच्या दिशेने जाणाऱ्या काही जागा त्यांच्या भवतालात आहेत, त्यांचा शोध या स्त्रियांसाठी स्वाभाविक ठरला असता. मात्र त्या निघून जायचे ठरवतात आणि त्याचे रानीच्या तोंडी येणारे स्पष्टीकरण फारच लंगडे वाटते. ‘किशनने आपल्याला कौशल्य शिकवले आहे त्याच्या बळावर कुठेही काम करून राहू’ हे रानीचे म्हणणे फार भाबडे वाटते, त्या व्यक्तिरेखेच्या शहाणपणाशीही ते जुळत नाही. अशा या ढोबळपणामुळे, गुळगुळीत प्रतिमांमुळे आणि व्यक्तीरेखांच्या अस्वाभाविक वर्तनामुळे पार्च्ड बेगडी वाटतो.   
आता पिंककडे बघू. पिंक मधल्या तिघी तरुणी शहरी, कमावत्या, स्वतंत्र विचारांच्या आणि बाईच्या पारंपारिक प्रतिमेत अजिबात न बसणाऱ्या आहेत. एकदा मीनल (तापसी पन्नू), फलक (कीर्ती कुल्हारी) आणि अँड्रीया (अँड्रीया तरीयांग) रात्री रॉकशो पहायला जातात. तिथे ओळखीच्या तरुणाबरोबर आलेल्या, त्याच्या मित्रांशी त्यांचा परिचय होतो. ते या तरुणींना डिनरला बोलावतात, सगळे ड्रिंक घेतात. ते तरुण चतुराईने तिघींना वेगवेगळ्या रूममध्ये घेऊन जातात. तिथे त्यांच्यावर जबरदस्ती करू पाहतात. बळजबरी करू पहाणार्‍या तरुणाच्या डोक्यात मीनल बाटली फोडते, तो गंभीर जखमी होतो. त्या पोलीस तक्रार करू पाहतात पण पोलीस त्यांना परावृत्तच करतात. त्यानंतर या मुलींवरच खुनाचा प्रयत्न, वेश्याव्यासाय यासारखे गुन्हे दाखल होतात. आधी घाबरलेल्या पण प्रतिकार केल्याशिवाय ही छळवणूक थांबणार नाही याची जाणीव झालेल्या त्या लढतात. यात एक अनुभवी निवृत्त वकील, दीपक सहगल (अमिताभ बच्चन) त्यांचं वकीलपत्र घेतो.
मला पार्च्डपेक्षा पिंक आवडला आणि तो महत्वाचा वाटतो ते दोन-तीन कारणांसाठी.....
·      तरुणींचे/स्त्रियांचे’ स्वातंत्र्य पिंक अधोरेखित करतो, ते करताना साचेबद्ध प्रतिमांना तो आव्हान देतो. उदा. अमिताभच्या व्यक्तिरेखेच्या तोंडी असलेले सेफ्टी मॅन्युअलबाबतचे संवाद; एखादी तरुणी रात्री बाहेर असेल, तरुणांबरोबर डिनरला गेली असेल, ड्रिंक घेतलं असेल तर जणू काही ती शरीरसंबंधासाठी उपलब्ध आणि तयार आहे असे गृहित धरणाऱ्या मानसिकतेवर पिंक प्रश्नचिन्ह लावतो. असे पुरुषाने केले तर त्यात फारसे वावगे ठरत नाही या दुटप्पीपणावरही नेमकेपणाने बोट ठेवतो. वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीनेही पैसे घेतले पण नंतर तिने संमती मागे घेतली तर तो अधिकार तिला असायला हवा इथपर्यंत पिंक पोचतो.
·      म्हणजेच पिंक तथाकथित नैतिकतेच्या घोळात; स्त्रीचे चारित्र्य आदि अडकत नाही, तर व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि निवडीचा अधिकार हा मुद्दा प्रमाण धरून सिनेमातली अर्ग्युमेंटस पुढे जातात. इथे नाट्यमय पद्धतीने हा वकीलच, मीनलला तिच्या कौमार्यासंबंधी प्रश्न विचारतो. त्या प्रश्नोत्तरातून तिचे आधी झालेले शरीरसंबंध हे तिच्या संमतीने झाले आहेत, तिच्या इच्छेविरुद्ध नाहीत हे फार स्पष्टपणे पुढे येतं आणि ‘नो’ म्हणजे ‘नो’ च, तो नकारच आहे आणि पुरुषांनी तो मान्य करायलाच हवा हे ही. 
·      मेट्रोसिटी मध्ये स्वतंत्र रहाणाऱ्या तरुणींपुढचं गुंतागुतीचं वास्तव सिनेमा प्रभावीपणे दाखवतो. तिन्ही तरुणी या वेगळ्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेल्या आहेत. त्यातली एक हिंदू, एक मुस्लिम आणि एक ख्रिश्चन आहे. मीनल दिल्लीची, दिल्लीत कुटुंब असूनही स्वतंत्र राहणारी. फलक लखनौची, बऱ्याच आर्थिक विवंचना असलेली आणि अँड्रीया मेघालयची आहे ज्याला आपण सरसकट नॉर्थइस्ट म्हणतो. तिच्या निमित्ताने तिकडच्या तरुणींना अन्य भारतीय तरुणींपेक्षा पुरुषी छळाचा अधिक सामना करावा लागतो हे चित्र पुढे येतं. सुनावणीतही इतर कोणाला त्यांचे राज्य विचारले जात नाही फक्त मेघालयाच्या तरुणीला विचारले जाते, हेही वास्तव पुढे येतं. 
·   त्या तिघी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी, स्वातंत्र्यासाठी लढायचं ठरवतात किंबहुना त्यांना कायदेशीर लढाई लढावीच लागते. अर्थातच हा प्रतिकार कायद्याच्या मार्गाने जाणारा वैयक्तिक प्रतिकार आहे.
इथे मला Third wave feminism च्या वैयक्तिक प्रतिकाराच्या नीतीची आठवण येते. पाश्चिमात्य जगात स्त्रीवादी चळवळीच्या तीन लाटा किंवा टप्पे दिसतात. पहिला टप्पा होता स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा या लढ्याचा. चळवळीच्या दुसर्‍या टप्प्यात लिंगभावाच्या सत्तासंबंधांचे भान आले. ‘जे जे वैयक्तिक ते ते राजकीय’ हा वाक्प्रयोग यावेळी आला म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यातले प्रश्न हे निव्वळ ‘वैयक्तिक’ नसून ते ‘व्यवस्थात्मक’ पातळीवरील सत्तासंबंधाचे प्रश्न आहेत हे भान या टप्प्यावर आले. त्यानंतर नव्वदच्या दशकात स्त्रीवादाची तिसरी लाट आली असे सर्वसाधारणपणे मानले जाते. भारतातील स्त्री-वादी चळवळीचे असे टप्पे होतात का हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. मात्र पिंकमधल्या तिघी, त्यांची जीवनशैली आणि त्यांची प्रतिकाराची नीती ही तिसऱ्या लाटेतील स्त्रीवादाच्या नीतीसारखी आहे, त्याची मला वाटणारी कारणे अशी......
·      पहिल्या व दुसर्‍या लाटेतल्या स्त्री-वादी, ज्या बदलांसाठी लढल्या ते तिसर्‍या लाटेतील स्त्री-वाद्यांना जन्मजात मिळाले आहेत, त्यामुळे त्या स्वत:कडे सक्षम आणि खंबीर म्हणून पहातात. हा स्त्री-वाद ‘अधिक संधी आणि कमी लिंगभेद’ अशा आत्मविश्वासावर उभा राहिला. पिंक मधल्या मुली दिल्लीसारख्या शहरात स्वतंत्रपणे रहात आहेत. साहजिकच त्या सक्षम आणि खंबीर आहेतच. आजच्या तरुणींना त्यांच्या आई-आजीपेक्षा निश्चितच जास्त संधी मिळाली आहे, कमी भेदभाव वाट्याला आले आहेत म्हणूनच त्या हवे ते शिकून, मनाजोगतं काम करू शकत आहेत.
·      हा स्त्री-वाद स्त्रियांमधील भिन्नता आणि बहुविधतेकडे, बहुविध अस्मिता असलेल्या स्त्रियांच्या  अधिकारांकडे तो सजगपणे बघतो. पिंक मधील तिघीही अशा वेगवेगळी ओळख असलेल्या आहेत. या स्त्रीवादाच्या मते ‘राजकीय’ हे अपरिहार्यपणे ‘वैयक्तिक’ आहे. त्यामुळे बहुविध अस्मिता घेऊन वैयक्तिक संघर्ष करण्यावर इथे भर आहे. पिंक मधील तिघींचा लढा वैयक्तिक आहे, त्यांच्यामागे ना मिडिया आहे ना त्या कुठल्या संस्था-संघटनेकडे गेल्या आहेत. जरी हा लढा वैयक्तिक असला तरी तो समस्त स्त्रियांच्या दृष्टीने प्रस्तुत आहे. पुन्हा अमिताभ यांच्या व्यक्तिरेखेच्या तोंडी असलेले सेफ्टी मॅन्युअलबाबतचे संवाद पाहावेत. ते समस्त मुली/स्त्रियांकडे पुरुषी नजर कशी बघते हे प्रभावीपणे दाखवतात आणि तितक्याच जोरकसपणे त्याचा विरोध करतात.
पिंक पहाताना जाणवलेल्या अन्य काही बाबींचा उल्लेख करणे महत्वाचे वाटते. अमिताभ बच्चन वकीलाच्याच भूमिकेतच दाखवले आहेत हे विशेष, नाहीतर त्यांच्या महानायक प्रतिमेमुळे त्यांची व्यक्तिरेखा ‘स्त्रियांचा तारणहार’ अशी झुकू शकली असती, जे या सिनेमात होत नाही हे नोंदवायला हवे. सिनेमात काही समजदार, संवेदनशील पुरुष व्यक्तिरेखा आहेत आणि असंवेदनशील स्त्री व्यक्तिरेखाही. उदा. त्या तरुणी रहात असतात तो घरमालक, न्यायाधीश आणि अर्थातच मुलींची बाजू लढवणारा वकील तर स्त्री पोलीस अधिकारी मुलींच्या विरोधात backdated तक्रार दाखल करून घेते आणि खोटी साक्षही देते. यामुळे संवेदनशीलता ही लिंगावर अवलंबून नसते हे दाखवत हा सिनेमा वास्तवाच्या अधिक जवळ जातो. या सर्व कारणांसाठी, आज शिकून-कमावत्या होऊन स्वतंत्रपणे जगू पाहणाऱ्या तरुणींसाठी पिंक महत्वाचा आहे आणि हे बदल समजून घ्यायला तरुणांसाठीही.

प्रसिद्धी: मिळून सार्‍याजणी, फेब्रुवारी २०१७