Saturday, May 21, 2011


   रोजच्याप्रमाणे दादा फिरायला बाहेर पडले. उन्हं उतरू लागली होती. ही नेहमीची फेरी दादा शक्यतो चुकवत नसत. रमत गमत ते चालू लागले. खिशात सहज हात घातला तर पाकीट लागलं नाही. विसरलं असेल असा विचार करत ते निघाले. फार लांब न जाता ते जवळच फिरून आले. चहापाणी झाल्यावर कपडे बदलताना त्यांना पाकीटाची आठवण झाली. कपाट, drawer, सारं शोधून झालं. शेवटी त्यांनी माईंना सांगितलं. इतरत्र शोधल्यावर माईंना  दादांच्या खिशाची आठवण झाली. फिरायला जाताना घातलेल्या pant च्या खिशातच, मात्र दादांनी न पाहिलेल्या खिशात पाकीट होते. "अलीकडे फार विसरभोळेपणा करता हं तुम्ही" असं पुटपुटत त्या गेल्या. दादांना आता आश्चर्य वाटत होतंपाकिटासाठी नेहमीचा खिसा न बघता आपण दुसरा खिसा का चाचपडत होतोते जरा गोंधळले.
एकदा पाकीट सापडलं की निवांतपणे पेपर मधले काही लेख वाचायचं त्यांनी ठरवलं होतं. पेपर हातात घेतला पण आपल्यला काय वाचायचं होतं हेच त्यांना आठवेना. "असा मनाचा गोंधळ का उडतोयहिने अजून चहा का नाही दिला?" त्यांनी माईंना चहा द्यायला सांगितलं. माई जरा गोंधळल्या पण परत हवा असेल असं वाटून त्यांनी फार काही न बोलता चहा केला. अलीकडे हे जरा जास्तच गोंधळतात. वय झालंविसरभोळेपणा होणारच" असं म्हणत त्या कामाला लागल्या. 
   दिवस जात होते. दादांचं गोंधळलेपण वाढत होतं. माईही थकत चालल्या होत्या. त्यांचा मुलगा श्री आणि त्याचं कुटुंब नोकरीनिमित्ताने बाहेरगावी होतं. नातवाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पुढल्या महिन्यात श्री येईल तेव्हा ह्यांचं नीट check up करून घ्यायचं माईंनी ठरवलं. 
   दुपारचं जेवण झालं की माई थोडा वेळ झोपत आणि मग आजूबाजूच्या मैत्रिणींकडे गप्पा मारायला जात. ५ पर्यंत त्या परत येत आणि मग दादा बाहेर पडत. आज अशाच त्या ५-५.१५ ला घरी आल्या. दादा बाहेरच खुर्चीत बसले होतेविचारात दिसत होते. माईंना पाहिल्यावर ते म्हणाले, "अगं चंद्रकांत आला होतामाझा वर्गमित्र." मग त्याला थांबवलं का नाही वगैरे माई विचारू लागल्या. त्याकडे दादाचं लक्षच नव्हतंचंद्रकांत पैशाच्या अडचणीत आहे मुलगा बघत नाहीत्याला पैशाची खूप गरज आहे असं ते सांगत राहिले. "परत आले की आपण त्यांना मदत करू" माईंनी सुचवलं.
   दादा फिरायला गेले ते आठ वाजून गेले तरी परतले नाहीत. माई काळजी करत होत्या पण तेवढ्यात ते आले. वाटेत त्यांना चंद्रकांत भेटला होताखूप काय बोलत होता, रडत होता असे ते म्हणाले. ते खूप चिडलेले होते, चंद्रकांतच्या मुलाला शिव्या देऊ लागले. त्याला ५००रु. दिल्याचे त्यांनी माईंना सांगितले. माईंनी पाकीट पाहिलं५००ची एक नोट कमी होती.
   दादा हिशोब लिहायला बसलेअलीकडे हातही थरथर करायचेविशेषत: लिहिताना. त्यांनी दिलेला एक चेकही नुकताच परत आला होतासही जुळत नाही म्हणून. आता मात्र सगळे व्यवहार आपल्याला हातात घ्यावे लागणार हे माईंनी ओळखलंश्री आल्यावर joint account चं काम करून घ्यायचं त्यांनी ठरवलं. 
   चंद्रकांत दादांना भेटतच होता. अधून मधून दादा त्याला पैसे देत होते. पण तो नेमका आपण नसतानाच का दादांना भेटतो हे माईंना कळेना. त्यांनी दादांना खूप छेडलं पण ते काही नीट बोलेनात. एकदा तर दादांनीच माईंना ‘कोण चंद्रकांत’ म्हणून विचारलं. मग मात्र माई दुसऱ्या दिवशी त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेल्या. डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांची दादांनी व्यवस्थित उत्तरं दिली पण माईंच्या अनुभवावरून त्यांनी neuro physician कडे जाऊन काही तपासण्या करायला सांगितल्या. ते ठिकाण लांब होतं  आणि तपासण्या खर्चिकत्यामुळे ८-१० दिवसात श्री आल्यावर तिकडे जायचं ठरलं. 
   दुपारी दादा जोरजोरात कुणाशी तरी बोलत होते त्यामुळे माईंना जाग आली. दादा एकटेच कुणाशी तरी गप्पा मारल्यासारखे बोलत होते. "अगं चंद्रकांत आलायतुला भेटायचं होतं नाजरा चहाही कर." असे म्हणून त्यांनी 'चंद्रकांतआणि माईची ओळख करून दिली. "चंद्रकांतला थोडे पैसे हवेत" असं म्हणत ते हजार रुपये पुढे करू लागले. आता मात्र माई हादरल्यात्यांनी दादांना गदागदा हलवलेभानावर आणण्याचा प्रयत्न केला. हळूहळू दादा भानावर आलेपण माईंच्या प्रश्नांनी चांगलेच गोंधळलेत्यांना काही सुचेचना. हळूहळू ते आत गेले आणि पडून राहिले. "ह्यांना वेडबिड तर लागलं नाही ना?" माई चिंता करत होत्या. 
    दुसऱ्या दिवशी रात्री दादांनी जोरात आरडाओरडा केला, खिडकीवर चोर आहे म्हणून. माईंनी कशीबशी समजूत घातलीलाईट लावून त्यांना नीट सारं काही दाखवलं तेव्हा ते शांत झाले. श्री सकाळी येणारच आहे तेव्हा काय ते बघावं असं म्हणून त्या दादांचं डोकं चोळू लागल्या. दादा झोपले, हळूहळू माईंनाही झोप लागली.  
   पहाटे माई जोराच्या आवाजाने धसकून जाग्या झाल्या. दादा जोरजोरात बोलत होतेत्या बाहेर आल्या. दारातच मुलगासून नि नातू उभे होते आणि दादा त्यांना जोरात शिव्या देत होते. आजूबाजूची मंडळीही डोकावू लागली होती. माईंना काही कळेना. "आईवडलांना सांभाळायला नकोआपल्यातच मश्गुल असताबापाचे problems काय कळणार तुला? उद्या तुझा मुलगाही मोठा होईलच ना, तेव्हा कळेल." या माऱ्याने सारेच स्तंभित झालेश्री त्यांना काही समजावू लागला. माईही पुढे झाल्याआधी घरात चला म्हणू लागल्या. सगळे कसेबसे घरात आले पण दादांचा पट्टा काही थांबेना. मुलाचं नि आपलं सारं काही बरं असताना हे असं काय बडबडतायत ते माईंना कळेना. श्रीलाही हाच प्रश्न पडला होता. 
   "तुझ्या बापाची काय स्थिती झाल्ये जाऊन बघ एकदापैसे उसने घेऊन घर चालवतोय तो. मी दिलेत त्याला अनेकदा पैसे. हिला विचारइथेही आला होता तो." 
   आता मात्र श्री खूपच चिडलासून कावरीबावरी झालीनातू तर घाबरून रडायला लागला. श्रीने जरा दरडावूनच दादांना गप्प बसायला सांगितलं. त्यामुळे दादा आणखीनच चिडले. त्या गोंधळातही  माईंच्या थोडं थोडं लक्षात येऊ लागलंदादा श्रीला चंद्रकांतचा मुलगा समजतायत की काय? त्या पुढे होऊन श्रीला सांगण्याचा प्रयत्न करू लागल्या. तेवढ्यात दादांना हातोडी दिसली आणि बेभानपणे त्यांनी श्रीवर वार केला. माईंनी त्यांना निकराने ढकलून दिलं. घाव वरवरच बसला तरी श्रीच्या डोक्यातून रक्ताची धार लागली. 
   दादा थकून खाली पडले होते तरी त्यांची बडबड चालूच होती. दादांना ढकलल्यावर माईंच्या पायातलं बळ गेलं. डोळ्यातून घळघळ येणारी आसवं वाहू देत त्या शून्य नजरेने तिथेच बसून राहिल्या.  

   आज नाना खूप उशिराने घरी परतले. नानी अगदी कंटाळून गेल्या होत्या. त्यांनी घुश्शातच जेवणाचं ताट आदळलं आणि त्या झोपायला निघून गेल्या.

   “हल्ली ह्यांचा लहरीपणा फार वाढायला लागलाय. नानीचं विचारचक्र सुरु झालं. किती सरळमार्गी माणूस. घराची काळजी घेणारा, आपल्यालाही घरकामात मदत करणारा. अधून मधून सिनेमा दाखवणारा, मुलांकडे नीट लक्ष देणारा. पण हल्ली जरा विक्षिप्त वागतात. संधी मिळाली की बाहेर पडतात. परवा फोनवर कुणाशी बोलत होते, पण काय ते कळलंच नाही. कधी न ऐकलेली नावं, माहीत नसलेले संदर्भ. काही विचारायला गेलं तर धड बोलत नाहीत. हे काय चाललंय याची नानी चिंता करत होत्या.
   नाना सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर पुन्हा गावाकडे रहायला आले. मुलं शहरात स्थिरावली होती. नानीलाही शहरातलं जीवन आवडत नव्हतंच. त्यामुळे दोघं सुखानी परतले. रहस्यकथा, गुन्ह्यावरील कथा-कादंबऱ्या नानांना फार आवडत. बाकी त्यांना कुठलाच शौक नव्हता. दक्षता किंवा पोलीस टाईम्स ते आवडीने वाचत. तेवढ्या वाचनाच्या नादाबद्दल नानी कधीकधी तक्रार करत. पण बाकी सारं छान चाललं होतं.
   सकाळी नानी जरा तणतण करतच होत्या. नाना जवळ आले नी एकदम इंग्लिशमधे काहीतरी बोलू लागले. बिचाऱ्या आठवी पास नानींना काही कळेना. खूप वेळ इंग्लिशमधे बोलल्यावर ते शांत झाले. नानी गप्पच झाली होती. दोन तीन दिवसात ती येईल, काम नीट केलं पाहिजे.” असं ते पुटपुटत होते. कोण येणार आहे, जेवायला येणार असेल तर आधी सांगा वगैरे नानींनी चालू केलं पण त्यांच्याकडे नानांनी एक विचित्र नजर टाकली. चहा पिऊन ते बाहेर पडले.  
   रात्री ते नानीजवळ बोलत होते, नानी अर्धवट झोपेत, नानाचं इंग्लिश–मराठीत बोलणं सुरु होतं. यावरून नानींना थोडंसं कळलं ते असं; कोणीतरी कोट्याधीश माणूस आहे. त्याने वयाने खूप तरुण मुलीशी लग्न केलं आहे. तिचा कोणी प्रियकर आहे आणि ते दोघं मिळून त्याचा काटा काढणार आहेत. नानी उठून बसल्या आणि त्यांच्या अंगावर ओरडल्या, तुमचा काय संबंध याच्याशी? नाही त्या भानगडीत पडू नका. नाना गडबडून उठले आणि एक रहस्य कादंबरी खाली पडली. नाना गोष्ट सांगत होते तर, नानीनी नि:श्वास टाकला.
   पण हळूहळू नानांचं असंबध्द बोलणं वाढत होतं. कधी कधी ते आपल्यालाही ओळखत नाहीत की काय असं नानींना वाटे. ते तिच्याकडे जळजळीत नजरेने पाहत. अशा वेळी नानी घाबरून जाई, तिने मुलांना फोन केला. त्यांना यायला सांगितलं, ते आल्यावर काय ते करायचं ठरलं. काही बाहेरचं असेल म्हणून नानींनी नारळ फोडणं, अंगारे धुपारे चालू केले.
   “दोघं लोणावळ्याला गेली आहेत, मजा मारायला माझ्या पैशावर. त्यांच्या मागावर रहा. Report me every minute. Shoot her if possible, but take care, nobody should see you. नाना जोरात बोलत होते. नानी धावत आल्या. त्यांना हाका मारू लागल्या. पण नाना म्हणाले, कोण तू? इथे कशाला आलीस? चल चालायला लाग. त्यांनी नानींना घराबाहेर काढलं. नानींनी जोरात गळा काढला. बराच वेळ नानी मुसमुसत बाहेरच थांबल्या. नाना बाहेर आले, नानींना पाहून म्हणाले, कुठे गेली होतीस? मला भूक लागल्ये. खायला दे. नानींनी खायला दिलं, आता मात्र त्यांचा धीर सुटला. ताबडतोब त्यांनी थोरल्या मुलाला फोन केला आणि थोडक्यात काय ते सांगून लगेच निघून यायला सांगितलं. तोही लगेच निघतो म्हणाला. तेवढ्यात बाहेर काही आवाज आला म्हणून त्या धावल्या. नाना कपाटं, टेबलाचे खण हुडकत होते, काहीतरी शोधत होते. सुपारी सुपारी असं बडबडत होते. इथे त्यांच्या सुपारी शोधण्याचे नवल करत नानींनी आतून त्यांना सुपारी आणून दिली. त्यावर त्यांच्याकडे एक अनोळखी कटाक्ष टाकून नाना बाहेर निघून गेले.   
   त्यांनी केलेला पसारा आवरताना नानींना नोटांच्या दोन जाड गड्ड्या सापडल्या, एवढे पैसे पाहून त्यांची छातीच दडपली. "काय व्यवहार चालतात यांचे", आल्यावर नानांशी नीट बोलायचं त्यांनी ठरवलं. त्यांना मुलाबाळांची शपथ घालायची, आणि प्रेमानी सारं त्यांच्याकडून काढून घायचं त्यांनी ठरवलं. या विचारांनी नानींना बळ आलं, त्यांनी नानांच्या आवडीचा स्वयंपाक केला.
   नाना आले ते त्यांच्या नादातच होते. पण पोटभर जेवले. जेवण झाल्यावर नानी जवळ येऊन बसल्या. त्या मुलगा येणार असल्याचे सांगू लागल्या. बाहेर कुणाला भेटता, इतका वेळ कुठे जाता? असे अगदी सौम्यपणे त्या विचारू लागल्या. नानांनी रुद्रावतार धारण केला. तोंडाचा अमर्याद पट्टा सुरु झाला. तू कोण मला विचारणारी? एवढं गोडधोड केलंस, पैसे कुठून आणलेस? माझ्या जिवावर मजा मारतेस आणि कोण मुलगा? कोण येणारे? त्याची भर करतेस होय?
   नानी हतबुध्द झाल्या, काय करावं त्यांना सुचेना. एकदम त्यांना दुपारी सापडलेल्या नोटांची आठवण झाली.  त्यांनी नोटांच्या गड्ड्या नानांसमोर टाकल्या आणि काही बोलणार तोच नाना गरजले, माझे पैसे चोरतेस? तुझ्याशी लग्न करतानाच मी विचार करायला हवा होता. एवढ्या संपत्तीला वारस मिळेल म्हणून तुला घरात आणलं तर तुझे हे उलटे धंदे. माझ्याच जिवावर उठलीस, त्या साल्याला सुपारी देऊनही लोणावळ्यातच काम उरकायला जमलं नाही. थांब मीच धडा शिकवतो तुला.
नानींना या गोष्टीचा अर्थ थोडाथोडा लक्षात यायला लागला होता. नाना स्वत:ला तो ‘कोट्याधीश तर समजत नाहीत? या विचारांनी त्यांना धस्स झालं. त्या जिवाच्या कराराने नानांना  समजावू लागल्या, त्यांनी नानांचे पाय धरले. त्यांना ढकलून नाना बाहेर आले. अंगणात एक जड लोखंडी गज पडला होता. क्षणात तो उचलून ते आत गेले आणि त्यांनी नानींवर हल्ला केला. बेभानपणे ते घाव घालत राहिले. काही वेळाने दमून बाजूला बसून राहिले. नानींनी कधीच या जगाचा निरोप घेतला होता. त्याचवेळी मुलगा घरात शिरला. रक्ताच्या थारोळ्यात निश्चेष्ट पडलेली आई आणि तिच्याकडे भ्रमिष्टासारखे बघणारे वडील हे दृश्य त्याचं स्वागत करत होतं.         






Friday, April 29, 2011

स्वयंघोषित देवाचा मृत्यू

Finally god had died due to cardiac arrest disqualifying his own prophecy.

सत्य साईंचं एक चित्र जे त्यांच्या मृत्यूनंतर ठळकपणे दिसलं;
लाखो भाविक, त्यांची अपरंपार श्रद्धा, अनेकांच्या तोंडून त्यांच्या कृपेच्या अनुभवाचे वर्णन, साईंनी आपले कल्याण केले-योग्य मार्ग दाखवला अशी अनेक सामान्य भाविकांची भावना, दर्शनासाठी सामान्य भाविकांची अलोट गर्दी. लोककल्याणासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या.
VIPs चे तर ते खास गुरु. अनेक राजकारणी, खेळाडू, film stars त्यांचे भक्त होते. सचिनला अश्रू ढाळताना तर आपण पहिलंच. बहुतेक राजकारणी नेतेही तिथे उपस्थित होते. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधीही दर्शनासाठी गेले होते. सरकारी इतमामात साईंवर अंत्यसंस्कार झाले.
दुसरं चित्र काय होतं?
सत्य साईबाबांवर अनेक आरोप झाले. कोणताही जादूगार करतो त्या पद्धतीने हवेतून सोनसाखळ्या काढणे, HMT घड्याळे काढणे वगैरे उद्योग ते करत. HMT घड्याळे त्यांनी लवकरच बंद गेली, (बहुधा त्यावरील manufacturing date मुळे) त्यांना याबाबतीत अनेकांनी आव्हान दिलं होतं. त्यांच्या tricks दाखवणाऱ्या films ही उपलब्ध आहेत. त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले, आश्रमातील एका खुनानंतर ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. पण याची चौकशी एका मर्यादेनंतर झाली नाही असं म्हणतात. त्यांच्या high profile राजकारणी भक्तांनी ती व्यवस्था केली असावी असंही बोललं जातं.
९६ वर्षे आपण जिवंत राहणार ही त्यांची भविष्यवाणी खरी ठरली नाही. ‘देव’ असूनही त्यांच्यावर लौकिक जगातले उपचार करावे लागलेच, ज्याला त्यांच्या शरीरानी प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या भविष्यवाणीनुसार ते २०२२ ला हा देह ठेवणार होते आणि २०२३ ला त्यांच्याच एका सहकाऱ्याच्या पोटी जन्म घेणार होते.(??)
आणखी एक मुद्दा म्हणजे त्यांच्या trust कडे असलेल्या अलोट संपत्तीचा. शिर्डीचे साईबाबा फकीर होते आणि तसेच राहिले. मात्र त्यांचा अवतार म्हणवणारे सत्यसाई सोन्याच्या सिंहासनावर बसत होते.
दुसऱ्या चित्राच्या अशा अजून अनेक छटा आहेत.
एकाच माणसाच्या या दोन चित्रांची सांगड मला घालता येत नाहीये.

Monday, March 21, 2011

Celebration

आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस नुकताच साजरा झाला. आता मार्चची अखेर आली आहे, एव्हाना सारे विसरलेही असतील. गेली काही वर्षे महिला दिन जोरदार साजरा होऊ लागला. एका दृष्टीने हे चांगलं अशासाठी की याला मान्यता मिळू लागली. पण हळूहळू त्यातला संघर्षाचा आशय हरवला आणि उत्सवीकरण चालू झाले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला दिन वाजत गाजत पार पडला. वृत्तपत्रे रंगली, अन्य माध्यमांनीही ताल धरला. सगळ्यांचाच होता ‘स्त्री’त्वाला सलाम, स्त्री ‘शक्ती’ ला प्रणाम, स्त्रीच्या गुणांना (super woman असली तरच) अभिवादन. मग यशस्वी स्त्रियांच्या नावांची जंत्री वगैरे.......... मग काही celebrities चे interviews……. बहुतेकांची सुरूवात “मी feminist वगैरे नाही” किंवा “feminist भूमिकेतून मी बोलत नाही” म्हणजे मुद्दा मांडण्याआधीच सारवासारवीची घाई.
तर Post-Feminist उत्सवी समाजातले असे हे महिला दिन;
  • स्त्रियांच्या संघर्षाचा इतिहास अनुल्लेखाने मारणारे
  • सामाजिक रचितातील विषमतेबद्दल काही न बोलता, आपसुख निसर्गदत्त आहे त्याचाच उदो उदो करणारे, उदा. मातृत्व
  • निव्वळ ‘income generation’ म्हणजे सबलीकरण मानणारे उदा. बचतगट
  • वैयक्तिक यशाला महत्व देणारे, careerist, महात्वाकांक्षी स्त्रियांचे कौतुक करणारे
  • Celebrity महिलांच्या ‘मायलेक’ ष्टाईल मुलाखती छापणारे
आठ मार्चचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे. यावेळी तर हा १०० वा महिला दिन साजरा झाला पण त्याची खबर Opinion makers ना नसावी बहुधा.
Celebrities च्याही बोलण्यात “आपण मनापासून परिश्रम केले की सारं मिळतं, विशेष सवलतींची काय गरज?” अशी विधाने वारंवार दिसतात. त्यांच्या शहरी, सुशिक्षित, मोकळ्या कुटुंबाच्या पातळीवर हे खरे असेलही. पण छोट्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या, मूलभूत सुविधांसाठी झगडणाऱ्या, शिक्षणासाठी कष्ट सोसणाऱ्या बायामुलींचे काय, शहरी वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांचे काय?
लिंगभावाच्या संदर्भात अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत.
पण थांबा हो, सध्या celebration चा मूड आहे!

Sunday, February 20, 2011

आजादी-ए-निस्वॉ

आजादी म्हणजे काय? आपली आजादीची/स्वातंत्र्याची व्याख्या काय? अशा काही व्याख्या बघूयात?

पावसात मनमुराद भिजण्याचं स्वातंत्र्य, पोटभर खाण्याचं स्वातंत्र्य, लहान भावंडांना सांभाळायला न लागता भरपूर खेळण्याचं स्वातंत्र्य, इंग्लिश शिकण्याचं स्वातंत्र्य, शाळेत जाण्याचं स्वातंत्र्य, चित्रं काढण्याचं स्वातंत्र्य, पुस्तकं वाचण्याचं-नवीन कपडे घालण्याचं-धुणंभांडी न करण्याचं-मैत्रिणींशी गप्पा मारण्याचं स्वातंत्र्य इ.
ही आहे व्याख्या स्वातंत्र्याची, १२-१३ ते १६-१७ वयोगटातल्या मुलींची. या मुली आहेत हैदराबादमधल्या. निमित्त होतं जमीला निशातयांना भेटण्याचं. कामानिमित्ताने मी हैदराबादला गेले होते आणि संध्याकाळी हाताशी मोकळा वेळ होता. जमीलाजींचा आणि माझ्या नवऱ्याचा चांगला परिचय आहे. त्यांच्या काही कविता आधी वाचल्या होत्याच. त्यामुळे भेटायची उत्सुकता होती आणि भेटीचा योग जुळून आला.
शाहीनया त्यांच्या संस्थेच्या centre मधे मी गेले. मला receive करायला प्रीतीच आली होती, शाहीनची तरुण, चुणचुणीत कार्यकर्ती. जमीलाजींशी गप्पा नि त्यांच्या कामाशी ओळख हा माझा हेतू होता. शाहीन परिवाराला या निमित्ताने भेटता आलं. हैदराबादेतल्या दूरच्या वस्तीतून आपल्या शिक्षिकांसोबत किशोरवयीन मुलींचा गट आला होता. घट्ट हिजाबमधल्या मुली पाहून कसंतरीच वाटत होतं. या मुलींबरोबरच आजादीविषयी झालेली चर्चा सुरुवातीला दिली आहे. (निस्वॉ म्हणजे तरुण मुली, आजादी-ए-निस्वॉ म्हणजे तरुण मुलींचं स्वातंत्र्य)
शाहीनच्या कार्यकर्त्या त्यांची नि कामाची ओळख करून देत होत्या. आवश्यक तिथे जमीलाजी नेमके तपशील सांगत होत्या. यातून शाहीनचं काम उलगडलत गेलं. शाहीन म्हणजे भराऱ्या घेणारं पाखरू. शाहीनचं centre फार वैशिष्टयपूर्ण ठिकाणी आहे. चारमिनार जवळचा सुलतानशाही भाग. एका बाजूला मुस्लिम वस्ती, दुसरीकडे दलित वस्ती आणि तिसऱ्या बाजूला हरियाणातून स्थलांतरित झालेले एका समाजाचे लोक जे निजामाच्या काळात सफाई कामासाठी तिथे गेले. तिन्ही समाजात बाईचं स्थान खालच्या पातळीवर. मुस्लिम समाजात लवकर लग्न, सततची असुरक्षितता. दलित समाजात बाया-मुली कमावतात आणि तरुण मुलं त्यांच्यावर policing करतात. तिसऱ्या समाजात बिरादरीचं (जात पंचायत) खूप वर्चस्व आहे नि ती खाप पंचायतीसारखीच आहे. स्त्रियांवरच्या हिंसाचाराचा प्रश्न या वस्तीत मोठा आहे. याच बाबतीत शाहीन कार्यरत आहे. समुपदेशन, पोलीस, वैदयकीय मदत, निवारा हे थेट काम आहेच. त्याबरोबरच सतत करावं लागणारं प्रबोधनाचं काम शाहीन करत आहे.
पैशासाठी गरीब घरातल्या कोवळ्या मुलींची प्रौढ किंवा वृद्ध अरबांशी लग्न लावून दिली जातात. अशी rackets हैदराबादमध्ये आहेत. यासंदर्भातही शाहीनचा लढा सुरू आहे. शाहीनच्या कार्यकर्त्या याविरुद्धच्या एका sting operation मधे नुकत्याच सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी एका अरबाला पकडूनही दिलं. यामध्ये त्यांचाबरोबर स्थानिक मशिदीतले मौलवी सहभागी झाले होते, हे विशेष. मात्र यासाठी स्थानिक टोळ्यांचा बंदोबस्त आवश्यक आहे, ज्यात पोलिसांची भूमिका महत्वाची आहे.
या सगळ्या संवादातून जाणवली ती शाहीनच्या कार्यकर्त्यांची समज आणि त्यांच्यात आलेलं धाडस. जमीलाजींनी अशा कार्यकर्त्यांची फळी घडवली आहे. सामाजिक कामाबरोबर त्यांचं साहित्यातलं योगदान महत्वाचं आहे. त्या समकालीन उर्दू साहित्यातील महत्वाच्या कवयित्री आहेत. त्यांच्याच कवितेचा काही भाग देऊन या पोस्टचा समारोप करते.....
बुर्खा पहनकर निकली, डिग्री भी मैने ले ली
कम्प्युटरभी मैने सिखा, और दुसरोंके आगे खुद को पाया
अम्मी भी खुश थी, अब्बा भी बहुत खुश
हर सांस ने पुकारा, मौज मस्ती मै करने निकली
थियेटरमें ज्यों ही पहुंची, डंडेने मुझे रोका
बुर्खा मना है लडकी
काली नकाबसे काला धुऑ सा उठा
उस वक्त वही पर
मैने बुर्खा उतार फेका

ही कविता जमीलाजींच्या 'लावा' या कवितासंग्रहातील आहे, ज्याच्या मुखपृष्ठाची प्रतिमा इथे दिली आहे.

Sunday, February 6, 2011

पूल

दृश्य १

मोठया शहरातील प्रथितयश कॉलेजचं कॅम्पस, मध्यम-उच्चमध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचा गट. गप्पा धमाल चालू आहे.
"Guys listen, let's bunk the lecture."
"हो रे, चला MacD त चक्कर टाकू."
"अगं मलाही shopping करायचंय, high heels, accessories. I want to recharge also. काय पटकन balance संपतो गं. काल खूपच calls, sms झाले. Mom ने कृपा करून 2000/- दिलेत.
"काय रे FB वर नव्हतास काल? it's more than 24 hours now, no status update?"
"अरे यार, Dad ने recharge केलंच नाही. आठवण केली तर, फार वेळ घालवतोस त्याच्यात म्हणून बोलणी खाल्ली. आता रोज ४-५ तास net surfing म्हणजे काय जास्त आहे का? but these people ना?”

दृश्य २
कल्याण स्टेशन परिसर. चहाची टपरी, एक छोटया चहा द्यायला धावपळ करतोय. अर्ध्या तासात सहा-सात तरी चकरा मारल्या त्याने, जड गरम किटली आणि ग्लास घेऊन. किती वय असेल त्याचं? १०-११ एखादं वर्षं जास्त. मधेच चहा ओतताना हातावर सांडला, भाजल्याने चेहरा कळवळलेला, मात्र हातावर पाणी ओतून पुन्हा धावपळीला तयार.

दृश्य ३
मुंबई-वाराणसी ट्रेन. गाडीत कचरा साफ करायला आलेली मुलं, १०-१२ वर्षाचा मुलगा - ६-७ वर्षाची त्याची धाकटी बहिण. कष्ट नि गरीबीमुळे हडहडलेली, पोटं खपाटीला गेलेली. काय भोगलं असेल त्या जीवांनी. कुठे बघावं ते कळेना इतकी शरम मनात दाटून आली.

दृश्य ४
मध्य प्रदेशातील मागास भागातील दुर्गम गाव. गावातल्या महिलांबरोबर मीटिंग सुरू आहे. काही जणी लांब घूंघट घेतलेल्या. गप्पांमुळे वातावरण सैल झाल्याने घूंघट बाजूला होऊन दिसू लागले, त्याआडचे कोवळे चेहरे, १३-१४ वर्षाच्या मुली. कालपरवा पर्यंत शाळेत जात असतील. थोडया वेळाने 'कामाची वेळ' झाल्याने त्या छोट्या मुली उठून गेल्या.

दृश्य ५
विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्हा. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं कुटुंब. मुलगा १८-१९ वर्षाचा, त्याची आई असेल फार तर चाळीशीची. मुलाने यातून कष्ट करून वर येण्याची जिद्द धरलेय. हरेक प्रयत्न तो करतोय. बाहेरून पदवीची परीक्षा देतोय.

दृश्य ६
माझ्या नवऱ्याने त्याच्या कामासंदर्भात सांगितलेला प्रसंग.
पुण्याच्या उपनगरातलं B.Ed कॉलेज. अल्प उत्पन्न गटातल्या अनेक तरुण मुली, अनेकजणी दिवसा कॉलेज करून संध्याकाळी/रात्री अर्ध/पूर्ण वेळ काम करणाऱ्या. आरोग्य प्रशिक्षण सुरू होतं. एक मुलगी मोबाईलवर काही करत होती. sms, games वगैरे चालू असेल असं वाटलं पण मग लक्षात आलं की ती lecture record करतेय. त्याबद्दल विचारलं असता तिनी जे सांगितलं ते ऐकून तिचं कौतुक वाटलं. तिच्या घरची परिस्थिती फार बरी नाही पण त्यातल्या त्यात बचत करून तिनी हव्या त्या सुविधा असलेला handset घेतला. lecture सुरू असताना नोट्स घेताना महत्वाचे मुद्दे निसटतात त्यामुळे ते record करून मग ती नीट लिहून काढते. तिच्या आईची इच्छा असूनही आईला शिकता आलं नाही. मग हे सारं ती आईलाही दाखवते. sms/chat/games/surfing साठी mobile phone चा वापर करणाऱ्यांच्या तुलनेत तिचा विचार मोठा होता, तंत्रज्ञानाच्या योग्य वापराचा होता.

आपल्या समाजातल्या विविध स्तरांतल्या माणसांच्या आयुष्याच्या ह्या झलकी. काही जणांना आयुष्य मजेत काढण्याचं भाग्य तर अनेकांच्या पुढे गरिबी, कष्ट, शोषण, वंचितता वाढून ठेवलेली. काहींना बऱ्याच अंशी हक्क्प्राप्ती तर काहींची आयुष्यं कामालाच बांधलेली.
सुस्थापित घरातली तरुणाई आपल्याच समाजातल्या वंचितांकडे संवेदनशीलतेने पाहील का?
कसे बनतील पूल; एकाच समाजातल्या भिन्न जगांना साधणारे?

Saturday, January 1, 2011

आत्मज्ञान

“नर्मदे हर! परिकम्माबासी हो?”

या प्रश्नासाठी सनातन किती आतूर होता? आता आपण खरे फक्कड असं त्याला वाटलं. त्याच्या shorts, jeans shirt मुळे त्याला कोणी परिक्रमावासी समजत नव्हते असं त्याला वाटत होतं. टुरीस्ट कंपन्या सध्या वाहनाने २१ दिवसात परिक्रमा घडवत असूनही तो पायीच निघाला होता. किती वर्षं तो यासाठी धडपडत होतं पण कधी रजा नाही म्हणून कधी घरची अडचण म्हणून जमलं नव्हतं. मात्र यावेळी त्याने चंगच बांधला, चार नाहीतर चांगला सहा महिन्याचा वेळ हाताशी ठेवला होता. त्याच्या पत्नीची तब्येत जरा ठीक नव्हती. मग तिला आणि मुलींना तिच्या माहेरी सोडून तो निघाला. आईवडील घुश्शातच होते पण तरी तो निघाला.

मजल दरमजल करत पायपीट चालू झाली आणि आला शूलपाणेश्वर या अरण्याचा टप्पा. आपल्याच नादात चालत असताना सनातन भानावर आला या प्रश्नाने, “नर्मदे हर! परिकम्माबासी हो?”

त्याने प्रश्नकर्त्याकडे पाहिलं. खूपच मळकट कपड्यातला, अगदी कंटाळलेला वाटणारा माणूस समोर उभा होता. सनातनला वाटलं, बरी सोबत मिळाली जंगलातून जाताना. त्याने होकारार्थी उत्तर दिलं. भूक लागली होतीच. फराळाचे पदार्थ काढले, त्या माणसालाही काही दिलं. त्या माणसाने निर्विकारपणे ते स्वीकारलं. एका झाडाखाली बसून ते फराळ करू लागले. त्या माणसाने डोक्याला फडकं गुंडाळलं होतं, त्यातून उग्र वास येत होता. जखम वगैरे आहे की काय असा विचार करतानाच सनातन शहारला. “थोडं तेल आहे तुझ्याकडे? जरा जखमेवर लावायचंय” स्वत:च्या डोक्याकडे हात दाखवत तो विचारात होता. सनातन थरथरू लागला, धक्क्याने पडायला आला. “तू... तुम्ही अश्वत्थामा तर नाही?” तो कसबसं बोलला, तोंडाला कोरड पडली होती.

तो माणूस हसायला लागला. “हो, तुझ्यासारखे लोक म्हणजे विरंगुळा रे जरा, नाहीतर इतका कंटाळा येतो.” सनातन अजूनही धक्का बसलेल्या स्थितीतच होता. “तू, तुम्ही खरंच अमर आहात? हे विचारताना त्याची दृष्टी सहजच फराळाकडे गेली.

“हो. पण खाण्याचं म्हटलास तर जगायला मला त्याची गरज नाही, नाहीतर अन्नपाणी त्यागून मी जीवन संपवलं नसतं का? हं, पण खाण्यापिण्याची कमी मात्र कधी कधी जाणवते, मग परिक्रमावासी, मठातले फक्कड किंवा गावकरी यांच्याकडून काहीतरी मिळतं.” आता सनातन सावरायला लागला होता. हा खरंच अश्वत्थामा असेल? हा आपली खेचत तर नसेल. पण संभाषणात मजा वाटू लागल्याने त्याने ते चालू ठेवायचे ठरवले.

“तुम्हाला माझी भाषा कशी येते?”

“इथे ज्या प्रांतातून लोक येतात त्या बहुतेक भाषा मला येतात. नाहीतरी टाईमपास काय करणार रे? अरे हुशार आहे आहे मी, पटकन शिकतो. काही भाषा तर आठवड्यातही आत्मसात केल्यात मी.”

“तुम्ही इथे रहायचं का ठरवलं?” सनातनचा आणखी एक उत्सुक प्रश्न.

“खूप फिरलो. जग खूप बदललं. आता तर आधुनिक व्यवस्थेत हवं तिथे फिरता येत नाही, लगेच ID मागतात. मग म्हटलं बरंय रानातच राहावं. हवं तेव्हा माणसांचा संपर्क नाहीतर विजनवास. परिक्रमावासी सोडून फार कोणी येतही नाही इथे.”

“तुम्ही माझी चेष्टा तर करत नाही ना? हे ID, टाईमपास तुमच्या तोंडून ऐकून..म्हणजे...”

“अरे असं काय करतोस? आजूबाजूला काय चाललंय हे माहित आहे मला. मागे एकदा बुऱ्हाणपूरला गेलो होतो तेव्हा सिनेमापण पहिला होता एक. एकदा रेल्वेनेही प्रवास केलाय पण तिकीट चेकरने उतरवून दिलं, तिकीट नव्हतं ना? पैसेही नव्हते. पण माणसांनी खूप बदल घडवले हं, तंत्रज्ञानामुळे कष्ट किती कमी झाले! प्रवासाची, संपर्काची साधनं किती वेगवान, कधी कधी टी. व्ही. पाहतो गावात, एकाचा सेलफोनही पहिला होता, छान छान!” खूप दिवसांनी बोलायला मिळाल्यासारखं तो बोलत होता.

“आधुनिक काळात कसं वाटतंय? म्हणजे तुमचा काळ खूप जुना ना?” सनातनची भीड चेपू लागली होती.

“अरे, आधुनिक हा शब्द तुला कळावं म्हणून वापरला. मला काय सारं सारखंच. आजचा दिवस उद्या भूतकाळात जमा होणार, भूत-वर्तमान-भविष्य सारंच अनंत.”

“तुम्हाला खरंच शाप मिळाला? म्हणजे.. ते... काय घडलं नेमकं?” जरा चाचरतच पण तो माणूस मोकळेपणी बोलतोय म्हणून सनातनने विचारलं.

“एकूणच technology, खरंच विलक्षण आहे, मला शिकवशील हा कसा वापरायचा?” सनातनच्या कॅमेऱ्याकडे बघत तो जरा तुच्छतेने, थोडं विस्मयाने म्हणाला. सनातनच्या प्रश्नाकडे लक्ष नव्हतं की तो तसं दाखवत होता कोण जाणे? सनातनने त्याला फोटो कसे काढायचे दाखवलं. digital camera असल्याने लगेच ते फोटोही दाखवले. त्या माणसानेही फोटो काढले, आता battery संपत आली होती. सनातनच्या मनात विलक्षण कल्पना आली “तुमचा कुणी फोटो काढलाय, मी काढू?” त्याने धीर करून विचारलं. निर्विकारपणे त्या माणसाने होकार दिला. सनातनने क्लिक केलं आता फोटो बघणार, इतक्यात कॅमेरा बंद झाला, battery संपलीच. सनातनला आपल्या भावनांवर ताबा ठेवायला फार धडपड करायला लागली. नंतर बघू असा विचार करून त्याने मनाची समजूत काढली. आता मघापासून छळणारा प्रश्न सनातनने विचारला, “तुम्ही इथे प्रत्येकाला भेटता?” “नाही, मला हवं त्यालाच. तुला मी भेटलो त्याला खास कारण आहे.” आपण खास असल्याचं वाटून, न राहवून त्याने कारण विचारलं.

“मी सध्या अभ्यास करतोय आणि प्रयोगही.” Technology बद्दलच्या त्याच्या भावना सनातनच्या लक्षात आल्या होत्याच. तो उत्सुकतेने कान देऊन ऐकू लागला.

“मला अमरत्वाचा शाप आहे हे तुला माहीतच आहे. हा शाप किती भयानक आहे याची तुला कल्पना नसेल. कधीही न संपणारं हे रखरखीत एकसुरी जीवन. विचार कर, सुटकाच नाही यातून. मग मी माझ्यासारखी माणसं शोधतोय.”

सनातनला काही बोध होईना. तो जरा गोंधळला, “तुमच्यासारखी म्हणजे?”

“मला हा अमरत्वाचा शाप का मिळाला? झोपलेल्या पांडव शिबिरावर मी हल्ला केला. पांडवांवर चालवलेल्या ब्रह्मास्त्राने मी उत्तरेच्या गर्भातल्या जीवाची हत्या केली. पश्चात्ताप झाला मला पण व्हायचं ते होऊन गेलं होतं. आता विचार करतोय हाच शाप पुढे कुणावर चालेल का? पण अट एकच तो माणूस माझ्यासारखा हवा. माझे काही प्रयोग यशस्वी झालेत.” अर्धवट उमजलेल्या, अर्धवट गोंधळलेल्या स्थितीत सनातन त्याच्याकडे पाहू लागला. “इतकी वर्षं मी माझ्या सोबतीला कुणी मिळेल का, कसं म्हणून धडपडत होतो. पण आता तुमच्या technologyमुळे कळलं की माझ्यासारखी माणसं आहेत जगात. तुम्ही मुलीचा गर्भ शोधून मारता. ते बघ तिकडे.” सनातनने तिकडे पाहिलं. काही शे पुरुष तिथे होते. “हे सारे आता माझ्याबरोबर आहेत, कायमचे. मलाही काहीतरी कारण असं अंतहीन जगायला.”

सनातन नीट पाहू लागला. त्यातले अनेक जण थकलेले दिसत होते. अनेक जण मानसिक स्वास्थ्य हरवलेले, जीवनरस संपलेले पण तरीही जगणारे होते. तो भयानक समूह पाहून सनातन हादरला. “यात स्त्रिया का नाहीत असा प्रश्न तुला पडेल, मी तो विचार केला होता पण बारकाईने पाहिल्यावर लक्षात आलं की त्यातल्या अनेकींचं जगणं शापितच आहे. त्यामुळे वाटलं की मरू दे त्यांना शांतपणे.” तो सांगत राहिला. आता सनातनला घाम फुटला. “मी... नाही... मला... गर्भपात बायकोच्या तब्येतीसाठी... मला जाऊ दे.”

“खोटं बोलू नकोस, खरं तर तंत्रज्ञान आरोग्यासाठीच आहे पण तुम्ही.., महिन्यापूर्वी तू जे बायकोला करायला लावलंस, तिसरी मुलगीही होती म्हणूनच ना? आता तुला, तुझ्या आईवडीलांना मुलगा हवाय. तोपर्यंत तू तिला छळणार. हो की नाही? आता तुझी सुटका नाही. तुला यावंच लागेल.” त्या माणसाने सनातनचा हात धरला. बाकीचे पुरुषही त्याच्याकडे सरकू लागले. तो धडपड करू लागला, ओरडायला तोंडातून आवाज फुटेना. एका धक्क्यासरशी तो खाली पडला आणि त्याला जाग आली. विलक्षण घाबरलेल्या अवस्थेत, स्वत:वर ताबा मिळवत तो बसून राहिला. सकाळ होत होती. परिक्रमा संपवून तो रेल्वेने परत चालला होता. काही वेळाने तो हुशारला, तोंड धुवून आला. सहप्रवाशांनी चौकशी केली, चहापाणी दिलं. त्यानंतर डोळे मिटून तो शांत बसून राहिला. राहूनराहून त्याच्या नजरेसमोर पत्नीचा चेहरा येत होता. खूप विचारांती त्याने मनाशी काही ठरवले.

त्याच्या गावी स्टेशनवर मित्र आले होते. त्याला उतरवून घेतल्यावर साहजिकच मित्रांनी विचारलं, “मग काय मिळालं परिक्रमेत?” त्या स्वप्नानंतर प्रथमच मोकळेपणाने हसत सनातन उत्तरला, “आत्मज्ञान!”