Sunday, February 20, 2011

आजादी-ए-निस्वॉ

आजादी म्हणजे काय? आपली आजादीची/स्वातंत्र्याची व्याख्या काय? अशा काही व्याख्या बघूयात?

पावसात मनमुराद भिजण्याचं स्वातंत्र्य, पोटभर खाण्याचं स्वातंत्र्य, लहान भावंडांना सांभाळायला न लागता भरपूर खेळण्याचं स्वातंत्र्य, इंग्लिश शिकण्याचं स्वातंत्र्य, शाळेत जाण्याचं स्वातंत्र्य, चित्रं काढण्याचं स्वातंत्र्य, पुस्तकं वाचण्याचं-नवीन कपडे घालण्याचं-धुणंभांडी न करण्याचं-मैत्रिणींशी गप्पा मारण्याचं स्वातंत्र्य इ.
ही आहे व्याख्या स्वातंत्र्याची, १२-१३ ते १६-१७ वयोगटातल्या मुलींची. या मुली आहेत हैदराबादमधल्या. निमित्त होतं जमीला निशातयांना भेटण्याचं. कामानिमित्ताने मी हैदराबादला गेले होते आणि संध्याकाळी हाताशी मोकळा वेळ होता. जमीलाजींचा आणि माझ्या नवऱ्याचा चांगला परिचय आहे. त्यांच्या काही कविता आधी वाचल्या होत्याच. त्यामुळे भेटायची उत्सुकता होती आणि भेटीचा योग जुळून आला.
शाहीनया त्यांच्या संस्थेच्या centre मधे मी गेले. मला receive करायला प्रीतीच आली होती, शाहीनची तरुण, चुणचुणीत कार्यकर्ती. जमीलाजींशी गप्पा नि त्यांच्या कामाशी ओळख हा माझा हेतू होता. शाहीन परिवाराला या निमित्ताने भेटता आलं. हैदराबादेतल्या दूरच्या वस्तीतून आपल्या शिक्षिकांसोबत किशोरवयीन मुलींचा गट आला होता. घट्ट हिजाबमधल्या मुली पाहून कसंतरीच वाटत होतं. या मुलींबरोबरच आजादीविषयी झालेली चर्चा सुरुवातीला दिली आहे. (निस्वॉ म्हणजे तरुण मुली, आजादी-ए-निस्वॉ म्हणजे तरुण मुलींचं स्वातंत्र्य)
शाहीनच्या कार्यकर्त्या त्यांची नि कामाची ओळख करून देत होत्या. आवश्यक तिथे जमीलाजी नेमके तपशील सांगत होत्या. यातून शाहीनचं काम उलगडलत गेलं. शाहीन म्हणजे भराऱ्या घेणारं पाखरू. शाहीनचं centre फार वैशिष्टयपूर्ण ठिकाणी आहे. चारमिनार जवळचा सुलतानशाही भाग. एका बाजूला मुस्लिम वस्ती, दुसरीकडे दलित वस्ती आणि तिसऱ्या बाजूला हरियाणातून स्थलांतरित झालेले एका समाजाचे लोक जे निजामाच्या काळात सफाई कामासाठी तिथे गेले. तिन्ही समाजात बाईचं स्थान खालच्या पातळीवर. मुस्लिम समाजात लवकर लग्न, सततची असुरक्षितता. दलित समाजात बाया-मुली कमावतात आणि तरुण मुलं त्यांच्यावर policing करतात. तिसऱ्या समाजात बिरादरीचं (जात पंचायत) खूप वर्चस्व आहे नि ती खाप पंचायतीसारखीच आहे. स्त्रियांवरच्या हिंसाचाराचा प्रश्न या वस्तीत मोठा आहे. याच बाबतीत शाहीन कार्यरत आहे. समुपदेशन, पोलीस, वैदयकीय मदत, निवारा हे थेट काम आहेच. त्याबरोबरच सतत करावं लागणारं प्रबोधनाचं काम शाहीन करत आहे.
पैशासाठी गरीब घरातल्या कोवळ्या मुलींची प्रौढ किंवा वृद्ध अरबांशी लग्न लावून दिली जातात. अशी rackets हैदराबादमध्ये आहेत. यासंदर्भातही शाहीनचा लढा सुरू आहे. शाहीनच्या कार्यकर्त्या याविरुद्धच्या एका sting operation मधे नुकत्याच सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी एका अरबाला पकडूनही दिलं. यामध्ये त्यांचाबरोबर स्थानिक मशिदीतले मौलवी सहभागी झाले होते, हे विशेष. मात्र यासाठी स्थानिक टोळ्यांचा बंदोबस्त आवश्यक आहे, ज्यात पोलिसांची भूमिका महत्वाची आहे.
या सगळ्या संवादातून जाणवली ती शाहीनच्या कार्यकर्त्यांची समज आणि त्यांच्यात आलेलं धाडस. जमीलाजींनी अशा कार्यकर्त्यांची फळी घडवली आहे. सामाजिक कामाबरोबर त्यांचं साहित्यातलं योगदान महत्वाचं आहे. त्या समकालीन उर्दू साहित्यातील महत्वाच्या कवयित्री आहेत. त्यांच्याच कवितेचा काही भाग देऊन या पोस्टचा समारोप करते.....
बुर्खा पहनकर निकली, डिग्री भी मैने ले ली
कम्प्युटरभी मैने सिखा, और दुसरोंके आगे खुद को पाया
अम्मी भी खुश थी, अब्बा भी बहुत खुश
हर सांस ने पुकारा, मौज मस्ती मै करने निकली
थियेटरमें ज्यों ही पहुंची, डंडेने मुझे रोका
बुर्खा मना है लडकी
काली नकाबसे काला धुऑ सा उठा
उस वक्त वही पर
मैने बुर्खा उतार फेका

ही कविता जमीलाजींच्या 'लावा' या कवितासंग्रहातील आहे, ज्याच्या मुखपृष्ठाची प्रतिमा इथे दिली आहे.

Sunday, February 6, 2011

पूल

दृश्य १

मोठया शहरातील प्रथितयश कॉलेजचं कॅम्पस, मध्यम-उच्चमध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचा गट. गप्पा धमाल चालू आहे.
"Guys listen, let's bunk the lecture."
"हो रे, चला MacD त चक्कर टाकू."
"अगं मलाही shopping करायचंय, high heels, accessories. I want to recharge also. काय पटकन balance संपतो गं. काल खूपच calls, sms झाले. Mom ने कृपा करून 2000/- दिलेत.
"काय रे FB वर नव्हतास काल? it's more than 24 hours now, no status update?"
"अरे यार, Dad ने recharge केलंच नाही. आठवण केली तर, फार वेळ घालवतोस त्याच्यात म्हणून बोलणी खाल्ली. आता रोज ४-५ तास net surfing म्हणजे काय जास्त आहे का? but these people ना?”

दृश्य २
कल्याण स्टेशन परिसर. चहाची टपरी, एक छोटया चहा द्यायला धावपळ करतोय. अर्ध्या तासात सहा-सात तरी चकरा मारल्या त्याने, जड गरम किटली आणि ग्लास घेऊन. किती वय असेल त्याचं? १०-११ एखादं वर्षं जास्त. मधेच चहा ओतताना हातावर सांडला, भाजल्याने चेहरा कळवळलेला, मात्र हातावर पाणी ओतून पुन्हा धावपळीला तयार.

दृश्य ३
मुंबई-वाराणसी ट्रेन. गाडीत कचरा साफ करायला आलेली मुलं, १०-१२ वर्षाचा मुलगा - ६-७ वर्षाची त्याची धाकटी बहिण. कष्ट नि गरीबीमुळे हडहडलेली, पोटं खपाटीला गेलेली. काय भोगलं असेल त्या जीवांनी. कुठे बघावं ते कळेना इतकी शरम मनात दाटून आली.

दृश्य ४
मध्य प्रदेशातील मागास भागातील दुर्गम गाव. गावातल्या महिलांबरोबर मीटिंग सुरू आहे. काही जणी लांब घूंघट घेतलेल्या. गप्पांमुळे वातावरण सैल झाल्याने घूंघट बाजूला होऊन दिसू लागले, त्याआडचे कोवळे चेहरे, १३-१४ वर्षाच्या मुली. कालपरवा पर्यंत शाळेत जात असतील. थोडया वेळाने 'कामाची वेळ' झाल्याने त्या छोट्या मुली उठून गेल्या.

दृश्य ५
विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्हा. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं कुटुंब. मुलगा १८-१९ वर्षाचा, त्याची आई असेल फार तर चाळीशीची. मुलाने यातून कष्ट करून वर येण्याची जिद्द धरलेय. हरेक प्रयत्न तो करतोय. बाहेरून पदवीची परीक्षा देतोय.

दृश्य ६
माझ्या नवऱ्याने त्याच्या कामासंदर्भात सांगितलेला प्रसंग.
पुण्याच्या उपनगरातलं B.Ed कॉलेज. अल्प उत्पन्न गटातल्या अनेक तरुण मुली, अनेकजणी दिवसा कॉलेज करून संध्याकाळी/रात्री अर्ध/पूर्ण वेळ काम करणाऱ्या. आरोग्य प्रशिक्षण सुरू होतं. एक मुलगी मोबाईलवर काही करत होती. sms, games वगैरे चालू असेल असं वाटलं पण मग लक्षात आलं की ती lecture record करतेय. त्याबद्दल विचारलं असता तिनी जे सांगितलं ते ऐकून तिचं कौतुक वाटलं. तिच्या घरची परिस्थिती फार बरी नाही पण त्यातल्या त्यात बचत करून तिनी हव्या त्या सुविधा असलेला handset घेतला. lecture सुरू असताना नोट्स घेताना महत्वाचे मुद्दे निसटतात त्यामुळे ते record करून मग ती नीट लिहून काढते. तिच्या आईची इच्छा असूनही आईला शिकता आलं नाही. मग हे सारं ती आईलाही दाखवते. sms/chat/games/surfing साठी mobile phone चा वापर करणाऱ्यांच्या तुलनेत तिचा विचार मोठा होता, तंत्रज्ञानाच्या योग्य वापराचा होता.

आपल्या समाजातल्या विविध स्तरांतल्या माणसांच्या आयुष्याच्या ह्या झलकी. काही जणांना आयुष्य मजेत काढण्याचं भाग्य तर अनेकांच्या पुढे गरिबी, कष्ट, शोषण, वंचितता वाढून ठेवलेली. काहींना बऱ्याच अंशी हक्क्प्राप्ती तर काहींची आयुष्यं कामालाच बांधलेली.
सुस्थापित घरातली तरुणाई आपल्याच समाजातल्या वंचितांकडे संवेदनशीलतेने पाहील का?
कसे बनतील पूल; एकाच समाजातल्या भिन्न जगांना साधणारे?

Saturday, January 1, 2011

आत्मज्ञान

“नर्मदे हर! परिकम्माबासी हो?”

या प्रश्नासाठी सनातन किती आतूर होता? आता आपण खरे फक्कड असं त्याला वाटलं. त्याच्या shorts, jeans shirt मुळे त्याला कोणी परिक्रमावासी समजत नव्हते असं त्याला वाटत होतं. टुरीस्ट कंपन्या सध्या वाहनाने २१ दिवसात परिक्रमा घडवत असूनही तो पायीच निघाला होता. किती वर्षं तो यासाठी धडपडत होतं पण कधी रजा नाही म्हणून कधी घरची अडचण म्हणून जमलं नव्हतं. मात्र यावेळी त्याने चंगच बांधला, चार नाहीतर चांगला सहा महिन्याचा वेळ हाताशी ठेवला होता. त्याच्या पत्नीची तब्येत जरा ठीक नव्हती. मग तिला आणि मुलींना तिच्या माहेरी सोडून तो निघाला. आईवडील घुश्शातच होते पण तरी तो निघाला.

मजल दरमजल करत पायपीट चालू झाली आणि आला शूलपाणेश्वर या अरण्याचा टप्पा. आपल्याच नादात चालत असताना सनातन भानावर आला या प्रश्नाने, “नर्मदे हर! परिकम्माबासी हो?”

त्याने प्रश्नकर्त्याकडे पाहिलं. खूपच मळकट कपड्यातला, अगदी कंटाळलेला वाटणारा माणूस समोर उभा होता. सनातनला वाटलं, बरी सोबत मिळाली जंगलातून जाताना. त्याने होकारार्थी उत्तर दिलं. भूक लागली होतीच. फराळाचे पदार्थ काढले, त्या माणसालाही काही दिलं. त्या माणसाने निर्विकारपणे ते स्वीकारलं. एका झाडाखाली बसून ते फराळ करू लागले. त्या माणसाने डोक्याला फडकं गुंडाळलं होतं, त्यातून उग्र वास येत होता. जखम वगैरे आहे की काय असा विचार करतानाच सनातन शहारला. “थोडं तेल आहे तुझ्याकडे? जरा जखमेवर लावायचंय” स्वत:च्या डोक्याकडे हात दाखवत तो विचारात होता. सनातन थरथरू लागला, धक्क्याने पडायला आला. “तू... तुम्ही अश्वत्थामा तर नाही?” तो कसबसं बोलला, तोंडाला कोरड पडली होती.

तो माणूस हसायला लागला. “हो, तुझ्यासारखे लोक म्हणजे विरंगुळा रे जरा, नाहीतर इतका कंटाळा येतो.” सनातन अजूनही धक्का बसलेल्या स्थितीतच होता. “तू, तुम्ही खरंच अमर आहात? हे विचारताना त्याची दृष्टी सहजच फराळाकडे गेली.

“हो. पण खाण्याचं म्हटलास तर जगायला मला त्याची गरज नाही, नाहीतर अन्नपाणी त्यागून मी जीवन संपवलं नसतं का? हं, पण खाण्यापिण्याची कमी मात्र कधी कधी जाणवते, मग परिक्रमावासी, मठातले फक्कड किंवा गावकरी यांच्याकडून काहीतरी मिळतं.” आता सनातन सावरायला लागला होता. हा खरंच अश्वत्थामा असेल? हा आपली खेचत तर नसेल. पण संभाषणात मजा वाटू लागल्याने त्याने ते चालू ठेवायचे ठरवले.

“तुम्हाला माझी भाषा कशी येते?”

“इथे ज्या प्रांतातून लोक येतात त्या बहुतेक भाषा मला येतात. नाहीतरी टाईमपास काय करणार रे? अरे हुशार आहे आहे मी, पटकन शिकतो. काही भाषा तर आठवड्यातही आत्मसात केल्यात मी.”

“तुम्ही इथे रहायचं का ठरवलं?” सनातनचा आणखी एक उत्सुक प्रश्न.

“खूप फिरलो. जग खूप बदललं. आता तर आधुनिक व्यवस्थेत हवं तिथे फिरता येत नाही, लगेच ID मागतात. मग म्हटलं बरंय रानातच राहावं. हवं तेव्हा माणसांचा संपर्क नाहीतर विजनवास. परिक्रमावासी सोडून फार कोणी येतही नाही इथे.”

“तुम्ही माझी चेष्टा तर करत नाही ना? हे ID, टाईमपास तुमच्या तोंडून ऐकून..म्हणजे...”

“अरे असं काय करतोस? आजूबाजूला काय चाललंय हे माहित आहे मला. मागे एकदा बुऱ्हाणपूरला गेलो होतो तेव्हा सिनेमापण पहिला होता एक. एकदा रेल्वेनेही प्रवास केलाय पण तिकीट चेकरने उतरवून दिलं, तिकीट नव्हतं ना? पैसेही नव्हते. पण माणसांनी खूप बदल घडवले हं, तंत्रज्ञानामुळे कष्ट किती कमी झाले! प्रवासाची, संपर्काची साधनं किती वेगवान, कधी कधी टी. व्ही. पाहतो गावात, एकाचा सेलफोनही पहिला होता, छान छान!” खूप दिवसांनी बोलायला मिळाल्यासारखं तो बोलत होता.

“आधुनिक काळात कसं वाटतंय? म्हणजे तुमचा काळ खूप जुना ना?” सनातनची भीड चेपू लागली होती.

“अरे, आधुनिक हा शब्द तुला कळावं म्हणून वापरला. मला काय सारं सारखंच. आजचा दिवस उद्या भूतकाळात जमा होणार, भूत-वर्तमान-भविष्य सारंच अनंत.”

“तुम्हाला खरंच शाप मिळाला? म्हणजे.. ते... काय घडलं नेमकं?” जरा चाचरतच पण तो माणूस मोकळेपणी बोलतोय म्हणून सनातनने विचारलं.

“एकूणच technology, खरंच विलक्षण आहे, मला शिकवशील हा कसा वापरायचा?” सनातनच्या कॅमेऱ्याकडे बघत तो जरा तुच्छतेने, थोडं विस्मयाने म्हणाला. सनातनच्या प्रश्नाकडे लक्ष नव्हतं की तो तसं दाखवत होता कोण जाणे? सनातनने त्याला फोटो कसे काढायचे दाखवलं. digital camera असल्याने लगेच ते फोटोही दाखवले. त्या माणसानेही फोटो काढले, आता battery संपत आली होती. सनातनच्या मनात विलक्षण कल्पना आली “तुमचा कुणी फोटो काढलाय, मी काढू?” त्याने धीर करून विचारलं. निर्विकारपणे त्या माणसाने होकार दिला. सनातनने क्लिक केलं आता फोटो बघणार, इतक्यात कॅमेरा बंद झाला, battery संपलीच. सनातनला आपल्या भावनांवर ताबा ठेवायला फार धडपड करायला लागली. नंतर बघू असा विचार करून त्याने मनाची समजूत काढली. आता मघापासून छळणारा प्रश्न सनातनने विचारला, “तुम्ही इथे प्रत्येकाला भेटता?” “नाही, मला हवं त्यालाच. तुला मी भेटलो त्याला खास कारण आहे.” आपण खास असल्याचं वाटून, न राहवून त्याने कारण विचारलं.

“मी सध्या अभ्यास करतोय आणि प्रयोगही.” Technology बद्दलच्या त्याच्या भावना सनातनच्या लक्षात आल्या होत्याच. तो उत्सुकतेने कान देऊन ऐकू लागला.

“मला अमरत्वाचा शाप आहे हे तुला माहीतच आहे. हा शाप किती भयानक आहे याची तुला कल्पना नसेल. कधीही न संपणारं हे रखरखीत एकसुरी जीवन. विचार कर, सुटकाच नाही यातून. मग मी माझ्यासारखी माणसं शोधतोय.”

सनातनला काही बोध होईना. तो जरा गोंधळला, “तुमच्यासारखी म्हणजे?”

“मला हा अमरत्वाचा शाप का मिळाला? झोपलेल्या पांडव शिबिरावर मी हल्ला केला. पांडवांवर चालवलेल्या ब्रह्मास्त्राने मी उत्तरेच्या गर्भातल्या जीवाची हत्या केली. पश्चात्ताप झाला मला पण व्हायचं ते होऊन गेलं होतं. आता विचार करतोय हाच शाप पुढे कुणावर चालेल का? पण अट एकच तो माणूस माझ्यासारखा हवा. माझे काही प्रयोग यशस्वी झालेत.” अर्धवट उमजलेल्या, अर्धवट गोंधळलेल्या स्थितीत सनातन त्याच्याकडे पाहू लागला. “इतकी वर्षं मी माझ्या सोबतीला कुणी मिळेल का, कसं म्हणून धडपडत होतो. पण आता तुमच्या technologyमुळे कळलं की माझ्यासारखी माणसं आहेत जगात. तुम्ही मुलीचा गर्भ शोधून मारता. ते बघ तिकडे.” सनातनने तिकडे पाहिलं. काही शे पुरुष तिथे होते. “हे सारे आता माझ्याबरोबर आहेत, कायमचे. मलाही काहीतरी कारण असं अंतहीन जगायला.”

सनातन नीट पाहू लागला. त्यातले अनेक जण थकलेले दिसत होते. अनेक जण मानसिक स्वास्थ्य हरवलेले, जीवनरस संपलेले पण तरीही जगणारे होते. तो भयानक समूह पाहून सनातन हादरला. “यात स्त्रिया का नाहीत असा प्रश्न तुला पडेल, मी तो विचार केला होता पण बारकाईने पाहिल्यावर लक्षात आलं की त्यातल्या अनेकींचं जगणं शापितच आहे. त्यामुळे वाटलं की मरू दे त्यांना शांतपणे.” तो सांगत राहिला. आता सनातनला घाम फुटला. “मी... नाही... मला... गर्भपात बायकोच्या तब्येतीसाठी... मला जाऊ दे.”

“खोटं बोलू नकोस, खरं तर तंत्रज्ञान आरोग्यासाठीच आहे पण तुम्ही.., महिन्यापूर्वी तू जे बायकोला करायला लावलंस, तिसरी मुलगीही होती म्हणूनच ना? आता तुला, तुझ्या आईवडीलांना मुलगा हवाय. तोपर्यंत तू तिला छळणार. हो की नाही? आता तुझी सुटका नाही. तुला यावंच लागेल.” त्या माणसाने सनातनचा हात धरला. बाकीचे पुरुषही त्याच्याकडे सरकू लागले. तो धडपड करू लागला, ओरडायला तोंडातून आवाज फुटेना. एका धक्क्यासरशी तो खाली पडला आणि त्याला जाग आली. विलक्षण घाबरलेल्या अवस्थेत, स्वत:वर ताबा मिळवत तो बसून राहिला. सकाळ होत होती. परिक्रमा संपवून तो रेल्वेने परत चालला होता. काही वेळाने तो हुशारला, तोंड धुवून आला. सहप्रवाशांनी चौकशी केली, चहापाणी दिलं. त्यानंतर डोळे मिटून तो शांत बसून राहिला. राहूनराहून त्याच्या नजरेसमोर पत्नीचा चेहरा येत होता. खूप विचारांती त्याने मनाशी काही ठरवले.

त्याच्या गावी स्टेशनवर मित्र आले होते. त्याला उतरवून घेतल्यावर साहजिकच मित्रांनी विचारलं, “मग काय मिळालं परिक्रमेत?” त्या स्वप्नानंतर प्रथमच मोकळेपणाने हसत सनातन उत्तरला, “आत्मज्ञान!”

Sunday, December 19, 2010

मुक्काम लातूर

प्रसंग १

एका घरासमोर मी उभी आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वीपर्यंत हे घर होतं. आता दगडमातीचा एक ढिगारा, त्यातच घरातल्या वस्तू विखुरलेल्या. चिल्ल्यापिल्ल्यांचे फोटो, फाटलेली वह्यापुस्तकं,खेळणी. काही दिवसांपूर्वीचं नांदतं, गजबजलेलं घर. डोळे कधी वहायला लागले ते कळलंच नाही..........

प्रसंग २

भूकंपामुळे झालेल्या नुकसानाचा अभ्यास चालू आहे. भूकंपग्रस्त कुटुंबांकडून प्रश्नावल्या भरून घ्यायचं काम आमचा गट करतोय. मनावर प्रचंड ताबा ठेवायला लागतोय. एका भूकंपग्रस्त कुटुंबातला पुरुष समोर बसलाय. जरा हरवल्यासारखा दिसतोय. जवळचं कुणीतरी गेलं असणार. आमचे टीम लीडर त्याला समजावत आहेत. माहिती देण्यास त्याने होकार दिल्यावर मी पुढे सरसावलेय, लिहून घ्यायला. नाव, गाव इ. झाल्यावर कुटुंबातल्या माणसांची नावं व त्यांची माहिती मी त्याला विचारतेय. मीही विचारताना धास्तावलेली कारण कुटुंबातलं कुणी मृत्युमुखी पडलं असल्याची शक्यता आहेच. एक एक नाव तो सांगतोय. एकत्र मोठं कुटुंब दिसतंय. बारावं नाव लिहून झालं आणि तो धिप्पाड, उंचनिंच माणूस ढसाढसा रडत कोसळला.बारा जणांच्या कुटुंबातला हा एकमेव माणूस वाचला, कुठे बाहेरगावी गेला होता म्हणून. त्याचं सगळं कुटुंब संपलंय. मी जागच्या जागी थिजलेली.........

प्रसंग ३

एका गावाच्या बाहेर माळरानावर भूकंपग्रस्तांसाठीचे तात्पुरते निवारे उभे केले आहेत. बाजूलाच एका धार्मिक संस्थेचा डेरा लागलाय ज्यांनी लोकांच्या जेवणाची जबाबदारी घेतलेय. वेळ संध्याकाळी पाच सव्वापाचची. सत्संग चालू आहे. मागील बाजूला शिबिरात स्वयंपाकाची तयारी चालू आहे. सत्संग संपल्यावर लोक उठायला लागले तोच कानावर दवंडीचा आवाज येतोय. तालुक्याच्या सरकारी हॉस्पिटलतर्फे सांगण्यात येतंय, कुणी एक सात वर्षाची मुलगी तिथे मरून गेलेय, कुणी शोधात असेल तर ओळख पटवून अमुक दिवसात ताब्यात घ्यावं नाहीतर.........

प्रसंग ४

एका गावातलं काम पूर्ण झालंय. संध्याकाळचे सहा-साडेसहा, हवा थोडी थंड आहे. गावच्या रस्यावरून फिरताना अंगावर काटा येतोय. जिकडेतिकडे उद्धस्त घरं. गावातली मंडळी आसऱ्याला गावाबाहेर माळरानावर. पण हे काय? दहा बारा कुत्री गावात येतायत. ढिगाऱ्यात काहीबाही उकरतायत. गावातच राहणारी ही कुत्री. भुकेसाठी त्यांनाही माळरानावर जावं लागलंय. सोबतचा गावकरी सांगतोय, रोज दिवसातून दोनतीन वेळा कुत्री गावात येतात.सगळीकडे फिरतात, आपल्या धन्यांची घरं बघत, ढिगारे उकरत.

तेवढयात त्यातल्या एका कुत्र्याने जोरात रडायला सुरूवात केली. कातरवेळ आणखी कातर होत गेली..........

प्रसंग ५

भूकंपग्रस्त गावांना जागतिक पातळीवर मदत सुरू झालेय. गावागावात STD booth लागलेत.त्याचा ताबा सरपंच किंवा गावातल्या प्रबळ लोकांकडे. ताबा म्हणजे अक्षरश: ताबा. गेले चार तास इथे सर्व्हेचं काम चाललंय, सरपंचांनी त्यात लक्ष घालणं अपेक्षित आहे. पण इथले सरपंच फोनपासून हलतच नाहीयेत. काही वेळाने मात्र ते आले आणि जातीने लक्ष घालू लागले. जरा नीट विचार केल्यावर लक्षात आलं की इतका वेळ दलित कुटुंबांची माहिती घेण्याचं काम सुरू होतं, आता सरपंचाच्या भावकीतल्या कुटुंबांबरोबर काम चालू आहे. चर्चा काय चाललेय त्यांच्यामधे, ह्या xxx चं (म्हणजे दलितांचं) काय नुकसान झालंय? साध्या गवताच्या घरात तर राहतात. खरं नुकसान पक्क्या घरात राहणाऱ्यांचंच झालंय पण कसा फायदा करून घेतायत बघा इ. इ.

सवर्णांपैकीच एक बाईही आलेय. पण ती काहीच बोलत नाहीये. तिच्यावर कसलंतरी दडपण असावं. आता ही गुंतागुंत आम्हाला थोडी कळायला लागलेय. मी सहकाऱ्याला खुणेनेच सांगून,काहीतरी बहाणा करून त्या बाईला बाहेर घेऊन आलेय. आता मात्र ती पटापटा बोलतेय. गावच्या एका पुढाऱ्याची ती भावजय. मला माहीत आहेत ते, सकाळी त्यांनीच गाव दाखवलं होतं. यांची प्रॉपर्टी वादात आहे. दिरांनी तिच्या नवऱ्याला फसवून धोत्र्याच्या बिया खायला घातल्या होत्या,त्यातून तो वाचला. ती सांगतेय, जेवढं शक्य असेल तेवढं नुकसान दाखवा आमचं; काही मिळालं तर आत्ताच मिळेल, कज्जेदलालीला मी कुठवर पुरणार?

प्रसंग

भूकंपाचं संकट पुरेसं नाही की काय म्हणून आत्ता संध्याकाळी उशीरा जोरात पाऊस आलाय.आमच्या रहायच्या जागेचा बंदोबस्त बरा आहे पण तात्पुरत्या निवाऱ्यातल्या माणसांचं काय झालं असेल? दिवसभराच्या अनुभवामुळे आणि पावसामुळे सगळे चिडीचूप बसलेत. दिवसभर मन आवरताना केवढी धडपड होते. संध्याकाळी कुणाचा तरी बांध फुटतोच.

तेवढयात एक बातमी येते, पुण्यात मोठा भूकंप झालाय. आम्ही सगळे पुण्याचेच. एकच हलकल्लोळ चाललाय. एकदोघी जोरजोरात रडायला लागल्यात. सगळ्यांची मन:स्थिती इतकी नाजूक की तर्काने विचार करायची शक्तीच नुरल्यासारखं झालंय. इथे भूकंपाने माजवलेला हा:हाकार पाहिल्यावर मनाचा एकच धोशा आपल्या माणसांचं काय?

काही जणांनी भानावर येऊन बातमीची शहनिशा केली तेव्हा तसं काही नसल्याचं कळलं आणि निश्वा:स सुटले. पण त्या अर्ध्या तासाने चरचरून दाखवून दिलं की आपत्तीत सापडलेल्यांची मन:स्थिती काय होत असेल?

Friday, December 10, 2010

रावेरी, गहू आणि सीता

कामानिमित्ताने मी फिरत असते. विदर्भात तर अनेक वेळा जाणे होते. नुकतीच यवतमाळमध्ये राळेगाव तालुक्यात मी गेले होते. राळेगावमध्ये रावेरी गावात काम होतं. काम पार पडल्यावर मला निघायला थोडा वेळ होता त्यामुळे जरा गावात फेरफटका मारायला सहकाऱ्यांसोबत निघाले. गावात सीतेचं मंदिर आहे ते पहायचं ठरवलं. मंदिराचा विषय निघाल्यावर सगळेच काही माहिती सांगायला लागले. हे सीतेचं भारतातील एकमेव मंदिर, इथे वाल्मिकींचा आश्रम होता, लवकुशासोबत सीता इथे राहिली असा त्या बोलण्याचा गोषवारा होता. माझी उत्सुकता चाळवली गेली. आधी अनेकदा इथे येऊन याचा उल्लेख कसा आला नाही याचं आश्चर्य वाटत होतं.

मंदिर दिसायला लागल्यावर लक्षात आलं, जुनं हेमाडपंथी मंदिर, आधी ढासळलेल्या स्थितीत होतं, आता जीर्णोद्धार सुरू आहे. बोलताना कळलं की शेतकरी संघटनेने भूमिकन्या सीतेच्या या स्थानाचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं. अगदी नुकताच याचा लोकार्पण सोहळा झाला, ज्यावेळी हजारोंच्या संख्येने महिला जमल्या होत्या. त्यामुळेच स्थानिक पातळीवर सध्या हे मंदिर चर्चेत आहे. पुण्यामुंबईकडे अर्थातच ही बातमी नव्हती.

मंदिराची देखभाल करणाऱ्या तरुणाने मंदिर उघडून दाखवलं. गाभाऱ्यात शिवलिंग, वर समोर काळ्या पाषाणातली सीतेची म्हणून दाखवण्यात येणारी छोटेखानी मूर्ती. गाभाऱ्यात तसा अंधारच होता आणि ग्रामीण भागातील नियमाप्रमाणे वीज नव्हती तरी flash वापरून mobile camera ने फोटो काढला. बाहेर आले पण यामागील कथेचा नीट उलगडा होत नव्हता. तिथे लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने केलेला banner होता. त्यावरून कळलेली कथा अशी; गरोदर सीतेला रामाने वनात सोडून दिलं. ती वाल्मिकींच्या आश्रमात राहू लागली. लवकुशाचा जन्म झाल्यावर (म्हणजे हे लवकुशाचे जन्मस्थान?) सीतेने स्थानिक लोकांकडे गहू मागितले. पण तिला कोणी ते दिले नाहीत. मग रागावून सीतेने ‘इथे कधीही गहू पिकणार नाही’ असा शाप दिला. (शाप? आणि सीतेने? Banner वर लिहिल्याप्रमाणे आधुनिक काळात हायब्रीड गहू येईपर्यंत इथे गहू पिकत नव्हता.) पुढे रामाने अश्वमेघ योजला. त्या यज्ञाचा घोडा लवकुशानी इथेच अडवला. त्यासाठी हनुमानालाही त्यांनी बांधून ठेवलं. जवळच हनुमानाचं मंदिर आहे. मूर्ती हातपाय बांधलेल्या अवस्थेत आडव्या स्थितीत आहे. अशी सारी रोचक कथा माहित झाली.

रामसीता वनवासात असतानाची अनेक स्थानं भारतभरात दाखवली जातात. पण उत्तर रामायणाशी निगडित स्थानाबद्दल मी प्रथमच ऐकत होते. अर्थात हा माझ्या अल्प ज्ञानाचाही परिणाम असेल. पण या साऱ्या कथेने काही प्रश्न मनात उभे राहिले. सीतेचं मंदिर म्हणताना गाभाऱ्यात शिवलिंग आहे ते कसं काय? क्षमाशील सीतेच्या शापाची कथा तर फारच विस्मयजनक वाटली कारण संपूर्ण रामायणात तिने फक्त सोसलेलंच दिसतं. ज्यांनी सीतेवर अन्याय केले त्यांना तिनी शापले नाही मग गहू दिले नाहीत या कारणावरून शाप? हे पटत नाही. की तिच्याही क्षमाशीलतेचा अंत झाला होता? रामाने सीतेचा त्याग केला याचा आपल्यालाही राग येतो आणि तिने मुकाटपणे सोसले याचाही. लोकपरंपरेतही हा सल आहे म्हणून तर सहज ओव्या बनतात;

राम गं म्हणू राम, नाही सीतेच्या तोलायाचा, हिरकणी सीतामाई, राम हालक्या दिलायाचा

आख्ख्या भारतात सीतेचं हे एकमेव मंदिर हेही खरं नाही. हरयाणातलं सीतामाई मंदिर, बंगळुरूजवळचं सीतेचं मंदिर, बिहारमधलं सीतामढी तशी आणखीही काही असतीलच. नवल म्हणजे रावेरीला सीता मंदिरात यात्राही भरते, कधी? तर रामनवमीला. मनातल्या मनात कपाळाला हात लावला.

शेजारच्या मंदिरात कोटीच्या कोटी उड्डाणे करणाऱ्या त्या महाबली हनुमानाची बंदिस्त मूर्ती (मुळात लवकुशानी बांधलेली आणि सध्या कडी कुलुपात असलेली) पाहून गंमत वाटली आणि वाईटही. शक्तीमान मारुतीनी बापलेकाची भेट व्हावी म्हणून लवकुशाकडून हे बंधन घालून घेतलं असणार असं वाटलं. सीतेचं आणि मारुतीचंही हार्दिक नातं आहेच. लोकपरंपरेत मारुती स्त्रियांना रक्षणकर्ता वाटत आला आहे. “राजा मारबती उभा पहाऱ्याला, जीव माझा थाऱ्याला” यासारख्या ओव्यांवरून हे स्पष्ट दिसतं. प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर असतंच.

तर मनात असे असंख्य विचार उमटवून गेलेली ही रावेरीची भेट, अजून खूप काही वाचायला, समजून घ्यायला हवं याची जाणीव करून देणारी.......

Wednesday, December 1, 2010

सकाळी उठून

ग्रामीण किंवा आदिवासी भागात फिरताना विशेषत: रहाताना, एका भीषण प्रश्नाला तोंड दयावं लागतं. कदाचित शहरात जन्मल्याने व वाढल्याने हा प्रश्न गंभीर वाटत असेल. पण गावकरी विशेषत: स्त्रियांना आणीबाणीच्या प्रसंगी तरी हा प्रश्न गंभीर वाटत असणार. मी बोलतेय ते संडास किंवा अलीकडचा शब्द (जरा सभ्य?) ‘शौचालयाच्याउपलब्धतेबद्दल. आता निर्मल ग्रामकिंवा संपूर्ण ग्रामीण स्वच्छतायासारख्या मोहिमांमुळे अनेक ठिकाणी संडास बांधले गेले आहेत. पण त्यातले वापरण्यालायक फारच कमी असतात हे नक्की.

सुरुवातीला मी ज्या भागात काम करत होते तिथे लोक दिवसभर शेती व उपजीविकेच्या अन्य कामात असायचे. त्यामुळे मीटिंग (बैठक म्हणलं तर कुणालाच कळत नाही) रात्रीच घेता येत असे. माझं रहाण्याचं ठिकाण होतं तालुक्याला म्हणजे ४० ते ५० कि. मी. अंतरावर. मीटिंग सुरू व्हायला साडेआठ वाजून जात. माणसं जमून चर्चा पूर्ण होईपर्यंत दीडदोन तास सहज जात. मीटिंग संपायला अकरा वाजून जात असत. गावकरी एकत्र आले म्हणजे मीटिंग झाल्यावर भजनाचा कार्यक्रम अनेकदा होई, त्यातून ताई रोज थोडयाच येतात त्यामुळे जास्तीत जास्त भजनं ऐकवायची चढाओढ लागे. अर्थात मी हे खूप enjoy केलं. काही भजनं मला अजूनही पाठ आहेत. तर सांगायचा मुद्दा म्हणजे एवढा उशीर झाल्याने मुक्काम गावातच असे.

आदिवासी घरात क्वचितच गुरांचा वेगळा असा गोठा असतो. गुरे घरातच किंवा ओटीवर बांधतात. त्यामुळे घरात पिसवा असतातच. त्यांच्या चाव्यांना तोंड देत झोपायचं म्हणजे..............!!! त्यातून रात्रभर गुरांचे आवाज, वीज असली तर लाईट रात्रभर सुरूच नाहीतर मिट्ट काळोख. पण खरी कसरत असते ती सकाळी झाड्याला म्हणजे सकाळी परसाकडे जायची. संडास नसल्याने निव्वळ वाच्यार्थाने नव्हे तर खरोखरच परसाकडे म्हणजे हागंदरीकडे (मळमळायला लागलं ना?) जायला लागतं. एक नोंद करायलाच हवी ती म्हणजे ग्रामीण भागापेक्षा आदिवासी गावे खरोखरच स्वच्छ असतात आणि रान असल्याने आडोशाचीही बरी सोय असते. पण तरीही माझ्यासारख्या शहरी मुलीला पहाटे उजाडायच्या आत असं लपूनछपून जायचं म्हणजे शिक्षाच वाटायची. घरातली एखादी बाई सोबत करायची. मग वस्तीपासून थोडं दूर, थोडा आडोसा पण तरीही सुरक्षित जागा शोधण्याची कसरत करायची. कोणी येत तर नाही ना या ताणाखाली चाहूल घेत कसाबसा तो विधी उरकायचा. साप किरडू याचंही भय वाटायचं. कधी आडवेळेलाम्हणजे दिवसाढवळ्या किंवा संध्याकाळी जावं लागलं तर फारच कठीण प्रसंग ओढवे. एकतर अशा वेळी माणसांचा वावर ही मुख्य अडचण. दुसरी भीती वाटायची ती प्राण्यांची. आपण बसलो आणि एकदम शेळ्या किंवा गुरांचा कळप अंगावर आला तर? एकदा अशा वेळी गुरं धावत येताहेत असे आवाज यायला लागले. पटकन उठून बाजूला थांबले. एक कळप निघून गेला. म्हटलं आता निवांत तर परत तेच आवाज. असा प्रकार दोनतीनदा झाल्यावर नाद सोडला. ती वेळ (आणि त्यावेळी ती जागा) गुरं परतण्याची असते ही गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवली.

बिलकुल खाजगीपणा नसणे (म्हणजे त्यावेळी सुद्धा) म्हणजे काय याचा अनुभव घेत होते. घरातली बाई सोबतीला असली तर आधार वाटायचा पण लाजही वाटायची. तेव्हा पक्का संडास म्हणजे जिथे कोणत्याही व्यत्ययाविना जाता येणे ही किती अत्यावश्यक बाब आहे हे लक्षात आलं आणि ती सुविधा आपल्याला सहज मिळत असल्याने नशीबवान असल्यासारखेही वाटले.

आज ग्रामीण भागात संडास ही गोष्ट खूप चर्चेचा, राजकारणाचा आणि निधी मिळवायचा विषय झाली आहे. अलीकडे शासकीय योजनांत शौचालय हा शब्द वापरला जातो जो ग्रामीण भागात सगळेच शच्छालयकिंवा स्वच्छालयअसा उच्चारतात. संडासापेक्षा सभ्य शब्द म्हणून शौचालय निवडला का असं म्हणावं तर दुसरीकडे हागणदारीमुक्ती’(!) सारखे शब्दही शासकीय वापरात दिसतात. अनेक ठिकाणी संडास बांधले गेले असले तरी त्याचा वापर कुठे फाटी (सरपण) भरून ठेवण्यासाठी, कुठे बाथरूम म्हणून होताना दिसतो तर कुठे देखभालीचं तंत्र माहीत नाही वा देखभाल करायचीच नाही त्यामुळे बांधलेले संडास वापराविना तसेच पडून असतात. संडास नसल्याने बायांची किती कुचंबणा होते हे बायांकडून अनेकदा ऐकले आहे. (स्वानुभवही आहेच) तसेच अंधार पडल्यावरच जायची सोय असल्याने पोटाचे अनेक विकार होतात असंही अनेक अभ्यासातून दिसतं.

गावात वर्गणी काढून जत्रा-उरूस होतात. oil paintच नव्हे तर संगमरवर बसवलेली मंदिरेही उभी राहतात, गावच्या प्रवेश कमानीसाठी लाखो रुपये खर्च होतात मात्र स्वच्छतेचा प्रश्न जिथल्या तिथे राहतो. कधी कुणी मंत्री वा कलेक्टर गाव पाहायला येणार असेल तर गावातल्या बायांची सगळ्यांना हटकून आठवण होते ती गाव स्वच्छ करायला आणि VIPs ना ओवाळायला. पण बायांच्या सुविधांचा प्रश्न कुणाच्याच अजेंड्यावर येत नाही.

Wednesday, November 17, 2010

जेवण (Dinner)









कामाच्या निमित्ताने मी महाराष्ट्राच्या व महाराष्ट्राबाहेरच्याही ग्रामीण-आदिवासी भागात जात असते. अशा प्रकारच्या कामाला माझी सुरूवात झाली ती गेल्या १३-१४ वर्षांपासून. शहरातच जन्मल्याने आणि वाढल्याने ग्रामीण भागाशी फारशी ओळख नव्हती. कधी कॉलेजच्या अभ्यास सहलीला, सुट्टीला अधूनमधून कोकणात, पण चार आठ दिवसांच्यावर राहायचा प्रसंग फारसा आलं नव्हता. नाही म्हणायला लातूरच्या भूकंपात मदतकार्यासाठी १० दिवस गेले होते पण तो आपत्तीचा अनुभव होता नि माणुसकी असल्याचा आणि नसल्याचाही. पण त्यावर पुन्हा कधीतरी. तर आत्ता लिहिते आहे ते ग्रामीण-आदिवासी भागातल्या माझ्या सुरुवातीविषयी.

पुणे जिल्ह्याचाच आदिवासी भाग. काही एक काम सुरू करण्याच्या दृष्टीने पहिल्यांदाच काही गावं पाहायला गेले होते. बरोबर दोन तीन सहकारी होते. त्यातला एका ताईंचा या भागाशी चांगला परिचय होता. तशी नवखी मीच होते. एका गावाहून दुसरीकडे पोचायला public transport मुळे उशीर झाला आणि मग एका गावातच मुक्काम करायचे ठरले. त्यातल्या त्यात परिचिताचे घर शोधले. वेळ संध्याकाळची होती. म्हणजे रात्रीचे जेवण त्या कुटुंबात होणार हे त्यांनीही सहज (!) गृहीत धरले. आम्ही घरात गेल्यापासून मी बघत होते, घरातला छोटा मुलगा एका खेकड्याच्या पायाला दोरा बांधून खेळत होता. त्याला इजा होईल अशी मला भीती वाटली पण खेकड्याची नांगी मोडल्याचे कळले. घरातल्यांनी नंतर जेवणाविषयी विचारले. जे कराल ते चालेल असे सांगितले कारण आपल्यासाठी त्यांना वेगळे काही करायला लागू नये हा विचार होता. आमच्या ताईंनी दूधभात चालेल असे सांगितले कारण घरात दुभती दोन जनावरे होती आणि भात तर काय आदिवासींचे मुख्य अन्न. तेव्हा ही दृष्टी अर्थातच मला नव्हती. (आता त्या मानाने बरं कळतं पण तरीही कधीकधी विकेट उडतेच.)

थोडया वेळाने ताटे आली. बघते तर काय? 'तो' खेकडा, ज्याच्याशी काही वेळापूर्वी तो मुलगा खेळत होता, 'तो' जणू माझ्या पोटात जायची वाट पाहत असल्यासारखा माझ्यासमोरच्या ताटात पडलेला, अर्थात मरून! 'त्या' ला बांधलेल्या दोऱ्याचे टोकही तसेच होते; त्यावरून तर 'तो' च हा खेकडा हे मला ओळखता आले. माझ्या पंजाच्या आकाराचा अख्खा खेकडा, त्यासोबत थोडा रस्सा. हा कसा खायचा आता, आपल्याला तर खेकडा कसा खातात माहीत नाही, काय करावे? (आताही मी मासेखाऊ झाले असले तरी अजून खेकडा नाही खाऊ शकत) माझा चेहरा पडल्याचे माझ्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले. माझी पंचाईत नक्की उघड उघड दिसत असणार. त्यांनी मला काही विचारायला सुरूवात केली. मी कसंबसं सांगितलं की मला खेकडा नको पण थोडा भात आणि रस्सा चालेल. रस्साभाताचा एक घास घेतला मात्र, तिखटजाळ रश्शाने जीभ जणू जळायला लागली. आणखी प्रदर्शन नको म्हणून तिखटाने आलेला ठसका पाण्याने कसाबसा थांबवला. चपळाईने दूधभातासाठी आणलेल्या दुधातलं थोडं दूध भातावर घेतलं. दूधभातावर साखर घेऊन खाण्याच्या पद्धतीचं त्या क्षणी मनोमन कौतुक करत त्यात साखरही घातली आणि जेवण साजरं केलं.

हा प्रसंग घडला जूनच्या सुरुवातीला. एक पाऊस पडून गेला होता. अशा वेळी जमिनीतल्या बिळातून खेकडे (किरवं) वर येतात. ते पकडून खातात. त्यामुळे त्या दिवशी जेवणात 'तो' होता. तिथे भाजीपाला उपलब्ध नसतोच त्यामुळे कोरडयास असं काही करतात. त्यातून आधीचं धान्य संपत आलेलं असतं, पुढचं घरात येण्यासाठी अख्खा खरीप हंगाम सरायचा असतो. जेवण तिखट. त्यामुळे पाणी प्यायला लागून पोट लवकर भरतं. अन्नाच्या तुटवडयाच्या काळात याचा उपयोग (?) होतो असं आदिवासी बायांनीच एका चर्चेत सांगितलं होतं.

एरवी भातात साखर या प्रकाराला मी नाक मुरडलं असतं पण त्या दिवशी दूध आणि साखर होती म्हणूनच माझ्या पोटात दोन घास गेले आणि पचले. ते पचले नसते तर काय झालं असतं? नको नको, तो विचारही नको वाटतोय पण त्याविषयीही कधीतरी लिहायला हवं.

तर सुरुवातीच्या काळात माझी फजिती करणारे असे प्रसंग अनेकदा आले त्यावर मी लिहिनच. अशा प्रसंगातून जे उलगडायचं ते कधी निखळ आनंद देणारं (म्हणजे इतरांना. कारण फजिती माझी झालेली असायची), बऱ्याचदा आपल्या स्वत:च्या मर्यादा दाखवणारं तर कधी फार भेदक, डोळे झडझडून उघडायला लावणारं असे.