Showing posts with label संपूर्ण ग्रामीण स्वच्छता. Show all posts
Showing posts with label संपूर्ण ग्रामीण स्वच्छता. Show all posts

Wednesday, December 1, 2010

सकाळी उठून

ग्रामीण किंवा आदिवासी भागात फिरताना विशेषत: रहाताना, एका भीषण प्रश्नाला तोंड दयावं लागतं. कदाचित शहरात जन्मल्याने व वाढल्याने हा प्रश्न गंभीर वाटत असेल. पण गावकरी विशेषत: स्त्रियांना आणीबाणीच्या प्रसंगी तरी हा प्रश्न गंभीर वाटत असणार. मी बोलतेय ते संडास किंवा अलीकडचा शब्द (जरा सभ्य?) ‘शौचालयाच्याउपलब्धतेबद्दल. आता निर्मल ग्रामकिंवा संपूर्ण ग्रामीण स्वच्छतायासारख्या मोहिमांमुळे अनेक ठिकाणी संडास बांधले गेले आहेत. पण त्यातले वापरण्यालायक फारच कमी असतात हे नक्की.

सुरुवातीला मी ज्या भागात काम करत होते तिथे लोक दिवसभर शेती व उपजीविकेच्या अन्य कामात असायचे. त्यामुळे मीटिंग (बैठक म्हणलं तर कुणालाच कळत नाही) रात्रीच घेता येत असे. माझं रहाण्याचं ठिकाण होतं तालुक्याला म्हणजे ४० ते ५० कि. मी. अंतरावर. मीटिंग सुरू व्हायला साडेआठ वाजून जात. माणसं जमून चर्चा पूर्ण होईपर्यंत दीडदोन तास सहज जात. मीटिंग संपायला अकरा वाजून जात असत. गावकरी एकत्र आले म्हणजे मीटिंग झाल्यावर भजनाचा कार्यक्रम अनेकदा होई, त्यातून ताई रोज थोडयाच येतात त्यामुळे जास्तीत जास्त भजनं ऐकवायची चढाओढ लागे. अर्थात मी हे खूप enjoy केलं. काही भजनं मला अजूनही पाठ आहेत. तर सांगायचा मुद्दा म्हणजे एवढा उशीर झाल्याने मुक्काम गावातच असे.

आदिवासी घरात क्वचितच गुरांचा वेगळा असा गोठा असतो. गुरे घरातच किंवा ओटीवर बांधतात. त्यामुळे घरात पिसवा असतातच. त्यांच्या चाव्यांना तोंड देत झोपायचं म्हणजे..............!!! त्यातून रात्रभर गुरांचे आवाज, वीज असली तर लाईट रात्रभर सुरूच नाहीतर मिट्ट काळोख. पण खरी कसरत असते ती सकाळी झाड्याला म्हणजे सकाळी परसाकडे जायची. संडास नसल्याने निव्वळ वाच्यार्थाने नव्हे तर खरोखरच परसाकडे म्हणजे हागंदरीकडे (मळमळायला लागलं ना?) जायला लागतं. एक नोंद करायलाच हवी ती म्हणजे ग्रामीण भागापेक्षा आदिवासी गावे खरोखरच स्वच्छ असतात आणि रान असल्याने आडोशाचीही बरी सोय असते. पण तरीही माझ्यासारख्या शहरी मुलीला पहाटे उजाडायच्या आत असं लपूनछपून जायचं म्हणजे शिक्षाच वाटायची. घरातली एखादी बाई सोबत करायची. मग वस्तीपासून थोडं दूर, थोडा आडोसा पण तरीही सुरक्षित जागा शोधण्याची कसरत करायची. कोणी येत तर नाही ना या ताणाखाली चाहूल घेत कसाबसा तो विधी उरकायचा. साप किरडू याचंही भय वाटायचं. कधी आडवेळेलाम्हणजे दिवसाढवळ्या किंवा संध्याकाळी जावं लागलं तर फारच कठीण प्रसंग ओढवे. एकतर अशा वेळी माणसांचा वावर ही मुख्य अडचण. दुसरी भीती वाटायची ती प्राण्यांची. आपण बसलो आणि एकदम शेळ्या किंवा गुरांचा कळप अंगावर आला तर? एकदा अशा वेळी गुरं धावत येताहेत असे आवाज यायला लागले. पटकन उठून बाजूला थांबले. एक कळप निघून गेला. म्हटलं आता निवांत तर परत तेच आवाज. असा प्रकार दोनतीनदा झाल्यावर नाद सोडला. ती वेळ (आणि त्यावेळी ती जागा) गुरं परतण्याची असते ही गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवली.

बिलकुल खाजगीपणा नसणे (म्हणजे त्यावेळी सुद्धा) म्हणजे काय याचा अनुभव घेत होते. घरातली बाई सोबतीला असली तर आधार वाटायचा पण लाजही वाटायची. तेव्हा पक्का संडास म्हणजे जिथे कोणत्याही व्यत्ययाविना जाता येणे ही किती अत्यावश्यक बाब आहे हे लक्षात आलं आणि ती सुविधा आपल्याला सहज मिळत असल्याने नशीबवान असल्यासारखेही वाटले.

आज ग्रामीण भागात संडास ही गोष्ट खूप चर्चेचा, राजकारणाचा आणि निधी मिळवायचा विषय झाली आहे. अलीकडे शासकीय योजनांत शौचालय हा शब्द वापरला जातो जो ग्रामीण भागात सगळेच शच्छालयकिंवा स्वच्छालयअसा उच्चारतात. संडासापेक्षा सभ्य शब्द म्हणून शौचालय निवडला का असं म्हणावं तर दुसरीकडे हागणदारीमुक्ती’(!) सारखे शब्दही शासकीय वापरात दिसतात. अनेक ठिकाणी संडास बांधले गेले असले तरी त्याचा वापर कुठे फाटी (सरपण) भरून ठेवण्यासाठी, कुठे बाथरूम म्हणून होताना दिसतो तर कुठे देखभालीचं तंत्र माहीत नाही वा देखभाल करायचीच नाही त्यामुळे बांधलेले संडास वापराविना तसेच पडून असतात. संडास नसल्याने बायांची किती कुचंबणा होते हे बायांकडून अनेकदा ऐकले आहे. (स्वानुभवही आहेच) तसेच अंधार पडल्यावरच जायची सोय असल्याने पोटाचे अनेक विकार होतात असंही अनेक अभ्यासातून दिसतं.

गावात वर्गणी काढून जत्रा-उरूस होतात. oil paintच नव्हे तर संगमरवर बसवलेली मंदिरेही उभी राहतात, गावच्या प्रवेश कमानीसाठी लाखो रुपये खर्च होतात मात्र स्वच्छतेचा प्रश्न जिथल्या तिथे राहतो. कधी कुणी मंत्री वा कलेक्टर गाव पाहायला येणार असेल तर गावातल्या बायांची सगळ्यांना हटकून आठवण होते ती गाव स्वच्छ करायला आणि VIPs ना ओवाळायला. पण बायांच्या सुविधांचा प्रश्न कुणाच्याच अजेंड्यावर येत नाही.